आजचा आदर्श विद्यार्थी मराठी निबंध (Adarsh Vidyarthi Essay in Marathi)

 आजचा आदर्श विद्यार्थी मराठी निबंध (Adarsh Vidyarthi Essay in Marathi)


आजचा आदर्श विदयार्थी किंवा आजचा विदयार्थी बेशिस्त आहे का?

आजचा आदर्श विदयार्थी किंवा आजचा विदयार्थी बेशिस्त आहे का?


   मागच्या पिढीतील लोकांना आजच्या विदयार्थ्यांचे सगळेच वागणे गैर वाटते. त्यांना त्यांचे आधुनिक कपडे आवडत नाहीत, त्यांची आधुनिक पद्धतीची केशरचना आवडत नाही; त्यांचे चित्रपटांचे वेड आवडत नाही, पुरुषी पोशाख करण्याची मुलींची फॅशन त्यांना रुचत नाही, मुलामुलींचे परस्परांशी मोकळे वागणे त्यांना बिलकूल पसंत नाही. एकूण आजचा हा विदयार्थी जेव्हा आंदोलन उभारतो, तेव्हा तर त्याच्या बेशिस्तपणाचा कळसच होतो, असे या टीकाकारांना वाटते. पण कोणी असा विचार कधीच करीत नाही की, विदयार्थी शिस्त का मोडतात? त्याला काही अंशी विदयार्थ्यांशी संबंधित अशी ही मोठी माणसेच जबाबदार नाहीत का? काही दिवसांपूर्वी विदयार्थ्यांचा एक मोर्चा निघाला होता. कशासाठी? काय मागणी होती त्यांची? तर 'आमच्या परीक्षा वेळेवर घ्या.' 

    आता सांगा, अशी मागणी करणारे विदयार्थी बेशिस्त कसे? महाविदयालयांकडून विदयार्थ्यांना योग्य प्रकारे शिक्षण दिले जाते का? कित्येकदा प्रश्नपत्रिकेतील प्रश्न हे अभ्यासक्रमाच्या बाहेरील असतात. म्हणून मग विदयार्थी या प्रश्नपत्रिकांची होळी करतात. कित्येक वेळा चार-चार महिने लोटले, तरी परीक्षांचे निकाल लागत नाहीत. मग विदयार्थी अस्वस्थ होतात. अशा वेळी त्यांच्यावर बेशिस्त वर्तनाचा ठपका ठेवला, तर ते त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे नाही का? परीक्षा म्हटली म्हणजे पेपर फुटण्याचा धोका संभवतो. एके वर्षी एका परीक्षेतील एकच पेपर दोन वेळा फुटला ! अशा प्रसंगी विदयार्थ्यांनी संयमाने कसे वागावे? कित्येक वेळा परीक्षेचा रिझल्ट जाहीर करताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गडबड केलेली आढळते. आजचा विदयार्थी हा अधिक प्रगल्भ आहे, कर्तबगार आहे, विचारवंत आहे, महत्त्वाकांक्षी आहे. 

   आपल्या हक्कांविषयी तो फार जागरूक आहे. तो आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मोर्चे, घेराव, संप हे मार्ग अनुसरतो. खरे पाहता, आजचा विदयार्थी बेशिस्त नाही. बेशिस्त आहे तो आजचा समाज ! वडीलधाऱ्या माणसांनी त्यांच्यापुढे चांगले ध्येय ठेवले आहे का? स्वातंत्र्यपूर्व काळातील पिढीपुढे स्वातंत्र्य-संपादनाचे निश्चित ध्येय होते. त्यांच्यासमोर एकाहून एक त्यागी ध्येयनिष्ठांचे आदर्श होते. असे उदात्त कार्य जर या आजच्या विदयार्थ्यांपुढे ठेवले गेले, तर ही युवा पिढी अफाट कर्तृत्व गाजवू शकेल. अनेक संकटप्रसंगी त्यांनी आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखवली आहे. देशावर नैसर्गिक संकट ओढवो वा परकीय आक्रमण येवो; अशा प्रसंगी हे विद्यार्थी आघाडीवर असतात. श्रमदान, रक्तदान करतात. जिवाची बाजी लावून अडचणींचे डोंगर पार करतात; तेव्हा तर त्यांच्या शिस्तबद्ध वर्तनाला तोड नसते. मात्र आपल्या गुणांचे, कष्टांचे चीज होत नाही, असे पाहिल्यावर हे विदयार्थी प्रक्षुब्ध होतात. याला जबाबदार अर्थातच आपला सारा समाजच आहे. म्हणजेच बेशिस्त कोण असेल, तर तो आजचा समाज ! आजचे विदयार्थी नव्हेत ! आजचे विदयार्थी हे आदर्श विदयार्थी आहेत. ते उदयाचे जागरूक नागरिक आहेत.

 आजचा आदर्श विद्यार्थी मराठी निबंध (Adarsh Vidyarthi Essay in Marathi)

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post