निसर्ग कोपला तर मराठी निबंध | Nisarg Kopla tar Essay in Marathi

निसर्ग कोपला तर मराठी निबंध  | Nisarg Kopla tar Essay in Marathi

निसर्ग कोपला तर मराठी निबंध  | Nisarg Kopla tar Essay in Marathi


निसर्ग कोपला तर मराठी निबंध  | Nisarg Kopla tar Essay in Marathi


  माणूस हा स्वतःला बुद्धिमान प्राणी समजतो. सर्व प्राण्यांत श्रेष्ठ समजतो ! होय, हे खरे आहे. माणूस सर्व प्राण्यांमध्ये बुद्धिमान आहे. त्याने बुद्धीच्या जोरावर प्रचंड प्रगती केली आहे, यात शंका नाही. अनेकदा निसर्गाच्या नियमांना वाकवून स्वतःचा फायदा केला आहे, आपल्याला अनुकूल अशा गोष्टी केल्या आहेत. वेगवेगळ्या रोगांवर विजय मिळवला आहे. पंख नाहीत, पण अवकाशात भरारी मारत आहे. माणसाचे शरीर दुबळे आहे. पण प्रलयाची ताकद असलेली अस्त्रे त्याने निर्माण केली आहेत. निसर्गाशी टक्कर देत देत तो इथवर आला आहे. त्यामुळे माणसाने निसर्गावर फार मोठा विजय मिळवला आहे, असेच तो समजत आहे. अनेक भाषणांतून, काव्यांतून याचे आपल्याला प्रत्यंतर येते. माणसाचा हा गर्व बघून निसर्गाला राग आला तर? तो कोपला, तर काय होईल? माणूस निसर्गाच्या रागाला तोंड देऊ शकेल काय ? निसर्गाशी लढाई करू शकेल काय? समजा निसर्गाने ठरवले की, माणसाला सूर्याचे ऊन यायचेच नाही, तर? समजा निसर्गाने ठरवले, पाऊस पाडायचाच नाही, तर? तसे पाहिले, तर या कल्पना करीत बसण्याची गरजच नाही. माणूस प्रगतीच्या कितीही वल्गना करो, निसर्ग त्याला सदोदित आपली ताकद दाखवत असतोच, आठवून पाहा - काही वर्षांपूर्वी लातूरला भूकंप झाला, कच्छला भूकंप झाला.

    हजारो माणसे गाडली गेली. हजारो घरे जमीनदोस्त झाली. असंख्य माणसे कायमची अपंग बनली. रस्ते उखडले गेले. झाडे जमीनदोस्त झाली, रोगराई पसरली. निसर्ग कोपला, तर काय हेच होणार. हा निसर्गाचा कोपच आहे. मोठमोठी धरणे बांधून विशिष्ट ठिकाणच्या जमिनीवरचा भार पराकोटीचा वाढला की समतोल नष्ट होतो. जमीन थरथरते. भूकंप होतो. हा निसर्गाचा संतापच आहे. काही काळापूर्वी आलेली त्सुनामीची लाट ही निसर्ग कोपला तर काय करू शकतो, याचे प्रत्यंतर जगाला आलेच आहे. शंभर शंभर फूट उंचीची उभ्या भिंतीसारखी पाण्याची लाट प्रचंड वेगाने जमिनीवर येऊन आदळते, तेव्हा किनाऱ्यालगतची गावेच्या गावे वाहून जातात. माणसाने या संकटाला तोंड देणे सोडाच, पण दूर पळून जाणेही अशक्य बनते. भूकंप, त्सुनामी यांच्या पूर्वसूचना मिळवणे अदयापही माणसाला शक्य झालेले नाही. म्हणजे निसर्गापुढे माणूस क्षुद्रच आहे. 

     निसर्ग कोपला, तर? अशी कल्पना करण्याचीही गरज नाही. कारण निसर्ग कोपलेलाच आहे. सध्या जगभर 'ग्लोबल वॉर्मिंग'ची चर्चा चालू आहे. जगभरातील पृथ्वीवरचे तापमान वाढत आहे. हा निसर्गाच्या संतापाचाच आविष्कार आहे. ही तापमानवाढ चालूच राहिली, तर जगभरातील निम्मी जमीन येत्या २० - २५ वर्षांत समुद्र गिळंकृत करणार आहे. शिवाय जगभरातील भौगोलिक परिस्थिती बदलेल. त्याचा पिकांवर, रोगराईवर परिणाम होईल. यामुळे मानव या संकटात होरपळून निघणार आहे. प्रदूषणांमुळे व अतिरिक्त हव्यासामुळे माणसाने पृथ्वीवरील पर्यावरण पार बिघडवून टाकले आहे. यामुळे निसर्ग आपला राग अधूनमधून व्यक्त करतच असतो. बदललेल्या वातावरणात काही जीवजंतू नष्ट होतात. पण नवीन वातावरणात जगू शकणारे नवीन जीवजंतू निर्माण होतात. 

     माणसाला हे आव्हान नवीन असल्यामुळे तो त्यांना तोंड देऊ शकत नाही आणि मग 'बर्ड फ्ल्यू', 'चिकन गुनिया' किंवा 'डोंबिवली फिव्हर' अशी नावे देऊन माणूस हताशपणे जे जे होईल ते बघत राहतो. थोडक्यात, माणसाने उन्मत्तपणे पर्यावरणावर निसर्गावर आक्रमण करून स्वतःच्या नाशाचा मार्ग प्रशस्त करून ठेवला आहे. निसर्ग कोपला, तर? नव्हे, निसर्ग कोपलाच आहे आणि तो माणसाला शिक्षा करतच आहे. पण माणूस काही सुधारण्याची चिन्हे दिसत नाही. तेव्हा निसर्ग याहीपेक्षा जास्त कोपला, तर माणसाचा त्यात समूळ नाश होईल !

निसर्ग कोपला तर मराठी निबंध  | Nisarg Kopla tar Essay in Marathi

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post