प्रदूषणाने केला घात सर्वत्र झाली वाताहात निबंध

प्रदूषणाने केला घात सर्वत्र झाली वाताहात निबंध

प्रदूषणाने केला घात सर्वत्र झाली वाताहात निबंध


            प्रदूषण हे एवढे मोठे संकट आहे की , सारे विश्व आता याबाबत खडबडून जागे झाले आहे . त्यामुळे दरवर्षी ' वसुंधरा दिन ' पाळून ' वसुंधरा बचाव ' हा संदेश सर्वांना दिला जातो . वसुंधरेमुळे आपण या जगात सुखासमाधानाने राहू शकतो , याचाच विसर या वसुंधरापुत्रांना पडला आहे आणि ते आपल्या प्रत्येक कृतीने वसुंधरेवरील प्रदूषण वाढवत आहेत . प्रदूषण हे मानवनिर्मित आहे ; पण या मानवाला त्याची जाणीवच नाही . माणूस आपल्या बुद्धीने नव्या नव्या गोष्टी सुरू करतो , पण त्याच वेळी आपली कृती प्रदूषणाला कारण होत आहे का , याचा विचार तो करीत नाही . उंच उंच इमारती बांधण्यासाठी त्याने जंगलतोड केली . त्यामुळे पावसाचे प्रमाण घटले . जमिनीची धूप वाढली .

              माणसाने आपल्या अचाट बुद्धिमत्तेने अनेक कारखाने सुरू केले , अनेक प्रकारची वाहने शोधून काढली . त्यामुळे वायुप्रदूषण वाढले . माणसाला अत्यंत आवश्यक असते ती शुद्ध हवा . दूषित हवेमुळे अनेक आजार वाढतात . माणसे , पशू , पक्षी मृत्युमुखी पडतात . कित्येक दुर्मीळ वनस्पती नष्ट होतात . गिरण्या कारखान्यांतील दूषित पाणी नदयांमध्ये सोडल्यामुळे पाणी प्रदूषित होते . अशा दूषित पाण्यामुळे गावेच्या गावे रोगग्रस्त होत आहेत . माणसाला आपले सर्वस्व वाहणाऱ्या नदीला दूषित करताना माणसाला मात्र थोडीही खंत वाटत नाही . माणसाने प्लास्टिकचा शोध लावला आणि त्याला स्वर्ग हाती आल्यासारखे वाटले . 

             अनेक गोष्टींसाठी त्याने प्लास्टिक आवरणांचा उपयोग सुरू केला ; पण त्यामुळे घनकचरा वाढू लागला . प्लास्टिक कुजत नसल्यामुळे हा कचरा नष्ट होऊ शकत नाही . त्यामुळे प्रदूषण वाढत आहे . शेतातील पिकांवर कीड पडू नये , म्हणून औषधे फवारली जातात . अशा या औषधांमुळे वातावरण प्रदूषित होतेच ; पण अशा अन्नधान्यांचा माणसाच्या प्रकृतीवरही अनिष्ट परिणाम होतो . हवा व पाणी यांच्या होणाऱ्या प्रदूषणाप्रमाणेच आणखी एक प्रदूषण आहे ते म्हणजे ध्वनिप्रदूषण . आपल्याभोवती सतत मोठमोठे कर्कश आवाज होत असतात . कर्कश आवाजात लावलेले कर्णे आसमंताची शांतता नष्ट करतात . त्यामुळे मनाची शांतताही नष्ट पावते . 

           अशा वातावरणात लोक कार्यक्षमतेने कामे करू शकत नाहीत . एवढेच नव्हे , तर त्यांच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होतो . त्यांची आयुर्मर्यादा घटते . या सर्व प्रकारच्या प्रदूषणांमुळे माणसाचे आरोग्य बिघडत आहे . एवढेच नव्हे , तर त्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे . माणसाला जिवंत राहायचे असेल , तर प्रदूषण नाहीसे करावेच लागेल .

प्रदूषणाने केला घात सर्वत्र झाली वाताहात निबंध

प्रदूषणाने केला घात सर्वत्र झाली वाताहात निबंध


Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post