वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार स्वाध्याय | Vandmayin lenyacha shilpkar 11th

वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार स्वाध्याय  | Vandmayin lenyacha shilpkari | Maharashtra State Board 11th Marathi Solution


वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार स्वाध्याय  | Vandmayin lenyacha shilpkar 11th


1. खालील कृती पूर्ण करा.

अ. टॉलस्टॉयच्या ज्ञानेंद्रियांच्या तल्लख संवेदनेची पाठातील उदाहरणे देऊन खालील तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
  
Solution

ज्ञानेंद्रियेसंवेदनांची उदाहरणे
डोळेदाईचे मोकळे हात दिसतात
कानपाण्याशी खेळताना पाण्याचा आवाज ऐकू येतो
नाकसुगंधी द्रव्याचा वास जाणवतो
त्वचाटबच्या आतील गुळगुळीत स्पर्श कळतो

2. आकृत्या पूर्ण करा.

प्रश्न 1.
  
Solution
  

प्रश्न 2.
  
Solution
  

प्रश्न 3.
  
Solution
  

प्रश्न 4.
  
Solution
  

इ. सूचनेप्रमाणे सोडवा.

प्रश्न 1. खालील शब्दांसाठी पाठात आलेल्या उपमा लिहा.
अ. मन:पटलावरील प्रतिमा [ ]
आ. ‘युद्ध आणि शांती’ ही कादंबरी [ ]
Solution
अ. शोभादर्शक
आ. न भूतो न भविष्यति अशा स्वरूपाचे कैलास लेणे

प्रश्न 2. ‘कादंबरी’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
Solution
‘युद्ध आणि शांती’ हे अवाढव्य लिखाण साहित्यातील कोणत्या प्रकारात मोडते?


2. खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

प्रश्न 1.
अ. मनाची कोरी पाटी.
आ. लोकोत्तर कल्पनाशक्ती.
इ. तपशिलांचा महासागर.
Solution
अ. मनाची कोरी पाटी : ज्या मनात कोणत्याही प्रकारचे विचार नसतात किंवा जे मन निरागस असते. चांगले किंवा वाईट यांचा विचार न करणारे मन म्हणजेच निर्विकार मन होय. लहान मुलांचे मन असे असते. जे समोर असते तेच त्यांच्यासाठी वास्तव असते. समोरचे वास्तव ते सहजपणे स्वीकारतात. त्यातल्या चांगल्या किंवा वाईट परिणामांचा विचार करण्याची त्यांची तयारी नसते किंवा त्यांचे मन तेवढे प्रगल्भ नसते. त्यामुळे त्या वयात त्यांच्याकडून झालेल्या चुकासुद्धा क्षम्य असतात. कारण त्यांच्या मनाची पाटी कोरी असते. जी गोष्ट त्यांच्यासमोर असते त्याच गोष्टीचा ते विचार करीत असतात. बालमन कधीही अमूर्तासंबंधी विचार करीत नसते. ज्या ठिकाणी बालमन जाईल त्या सर्व गोष्टींचा ते मनापासून आनंद घेते कारण त्यांच्या मनाची पाटी कोरी असते.

आ. लोकोत्तर कल्पनाशक्ती : लोकोत्तर कल्पनाशक्ती म्हणजे विलक्षण असामान्य, अलौकिक अशी कल्पनाशक्ती, सर्वसामान्य माणसांमध्ये अशी विचार करण्याची क्षमता नसते. तत्त्वज्ञ, कवी, शास्त्रज्ञ, लेखक इत्यादी असामान्य माणसेच वेगळा विचार करू शकतात. त्यांच्या कल्पनाशक्तीची धाव असीम असते. जिथपर्यंत आपण साधारण माणसे पोहचू शकत नाही, अशी विलक्षण, असामान्य, अलौकिक अशा कल्पनाशक्तीची टॉलस्टॉयला जणू देणगीच लाभलेली होती. म्हणूनच या अजरामर, उदात्त, कितीतरी वेगळ्या, श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली.

इ. तपशिलांचा महासागर : महासागर म्हणजे मोठा समुद्र. समुद्राच्या पाण्याची खोली किंवा व्याप्ती आपण मोजू शकत नाही. लेखिकेने टॉलस्टॉय यांनी लिहिलेल्या ‘युद्ध आणि शांती’ या अवाढव्य कादंबरीच्या लिखाणासाठी त्यांनी जे तपशील, संदर्भ गोळा केले त्यांना तपशिलांचा महासागर अशी उपमा दिली आहे. त्यावरून त्याने जमवलेल्या तपशिलांच्या माहितीची कल्पना येते. त्याने विविध प्रकारचे संदर्भ ग्रंथ रशियाचा इतिहास, रशियातील लोकांच्या जीवनपद्धतीचा अभ्यास केला मुलाखती घेतल्या. त्याने प्रवासातून, वाचनातून, लोकांच्या मनांतून, इतिहासातून इ. विविध माध्यमांतून तपशील गोळा केले व समुद्रमंथन करून एक अवाढव्य कलाकृती जगासमोर आणली.

3. व्याकरण.

अ. तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
  
Solution

विशेषणेविशेष्ये
अर्थपूर्णआठवण
अमर्यादशक्ती
वाङ्मयीनशिल्प
अजोडकलाकृती
 

आ. खालील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.

प्रश्न 1.
  1. न्यून असणे
  2. मातीशी मसलत करणे
  3. अवाक् होणे
  4. अभ्यासाचे डोंगर पेलणे
Solution

न्यून असणे : आई गेल्यावर रमेशच्या मनात काहीतरी न्यून असल्याची भावना निर्माण झाली.
मातीशी मसलत करणे : पाऊस पडल्यानंतर शेतकरी विविध कामांच्या आधारे मातीशी मसलत करतात.
अवाक होणे : गणेशला दहावीच्या परीक्षेत नव्वद टक्के गुण मिळल्याचे ऐकून घरातले सगळेच अवाक झाले.
अभ्यासाचे डोंगर पेलणे : डॉक्टर होण्यासाठी खूप अभ्यासाचे डोंगर पेलावे लागतात.

4. स्वमत.

प्रश्न अ. टॉलस्टॉयच्या तरल संवेदनेची सूचक आठवण तुमच्या शब्दांत वर्णन करा.
Solution
सत्य, शांती, त्याग, सेवा या मूल्यांचे उपासक असणारे थोर तत्वचिंतक, शिक्षणशास्त्रज्ञ आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक लिओ निकोल्विच टॉलस्टॉय हे विश्वशांतीचे मार्गदर्शक होते. लहानपणापासूनच त्यांच्या तरल संवेदनांची जाणीव लेखनातून स्पष्ट होते. त्यांची आई गेल्यानंतर त्यांच्या आत्याने त्यांचा संभाळ केला, त्यांना कुठेही आईची कमतरता जाणवू दिली नाही. त्यांनी त्यांच्या तान्हेपणाच्या दोन आठवणी लिहून ठेवल्या आहेत. त्यांच्या संवेदनांची आठवण सांगताना ते सांगतात की त्यांना दुपट्यात घट्ट गुंडाळून ठेवले आहे. त्यांना हतपाय हालवता येत नाहीत, त्यांना मोकळेपणा हवा आहे. म्हणून ते जोरजोरात रडत आहेत.

पण त्यांची व्यथा कोणीही समजू शकत नाही. दुसरी आठवण अशी की, पहिल्यांदाच त्यांना त्यांच्या चिमुकल्या देहाचे अस्तित्व जाणवले. त्यांना दाईचे मोकळे हात दिसतात, त्यांना सगंधी द्रव्याचा वास येतो, पाण्याची उष्णता जाणवते, पाण्याशी खेळताना पाण्याचा आवाज ऐकू येतो, टबच्या आतील मऊ स्पर्श कळतो इतक्या लहानपणी संवेदना कळून प्रत्यक्षात त्यांचे वर्णन करणारा टॉलस्टॉय हा कदाचित जगातील पहिला माणूस असेल. मऊ, काळाभोर लाकडाचा टब, बाहया मागे दुमडलेला दाईंचा हात, पाण्याच्या कढत वाफा, चिमुकल्या हातांनी पाण्याशी खेळताना होणारा आवाज या सर्व संवेदनांची संकलित जाणीव आनंद देणारी आहे. त्यांच्या या तरल संवेदनांमुळेच मोठेपणी त्यांच्या हातून लिखाणाचे महान कार्य घडत गेले. प्रत्येक ज्ञानेंद्रियाच्या त्यांच्या संवेदना लहानपणापासून खूप तल्लख असल्याचे त्यावरून स्पष्ट होते.

प्रश्न आ. ‘युद्ध आणि शांती’ ही कादंबरी लिहिण्यासाठी टॉलस्टॉयने केलेल्या अभ्यासाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
Solution
‘युद्ध आणि शांती’ ही कादंबरी लिहिण्यासाठी टॉलस्टॉय यांनी परिपूर्ण अभ्यास केला. कादंबरी दर्जेदार होण्यासाठी अनेक वेळा पुनर्लेखन केले. त्यामुळे ‘वॉर अण्ड पिस’ हे जगातील साहित्यातील वाङ्मयीन लेणे ठरले. लग्नानंतरची 15 - 16 वर्षे टॉलस्टॉयचा जीवनप्रवाह फारशी वळणे न घेता अनिरूद्धपणे वाहत राहिला. 1863 च्या अखेरीस ‘युद्ध आणि शांती’ या कादंबरीच्या लेखनास त्याने सुरुवात केली. ही कादंबरी लिहून पूर्ण करण्यासाठी त्यांना सहा वर्षे लागली, या कादंबरीच्या लिखाणासाठी टॉलस्टॉय यांनी प्रचंड कष्ट घेतले. वास्तवाच्या चारही बाजूंचा अभ्यास करून त्यांनी लिखाण केले, त्यांच्या अभ्यासाचा आवाका फारच मोठा होता. त्यासाठी त्यांनी अनेक संदर्भग्रंथांचा अभ्यास केला आणि हा अभ्यास त्यांनी लिखाण पूर्ण होईपर्यंत चालू ठेवला.

अधिकृत इतिहास, रशियन व फ्रेंच इतिहासकारांनी लिहिलेला, त्या कालखंडाचा परामर्श घेताना एकाच घटनेतून दोन विरुद्ध पक्षांचे लोक असा काय अर्थ काढतात त्याचे सबंध, अन्वयार्थ त्याने समजावून घेतले. नेपोलियनविषयी प्रसिद्ध झालेले अपरंपार लिखाण हे सारे काही त्याने अक्षरश: घुसळून काढले. जणू काही तो त्याच काळात जगत होता, इतका अभ्यास त्याने या कादंबरीच्या लिखाणासाठी केला.

या सगळ्या अभ्यासामुळेच कादंबरीतली पात्रे जणू देहधारण करून त्याच्याशी वार्तालाप करू लागली होती. कादंबरी लिखाणासाठी त्याने विविध तपशिलांचा अतिशय चिकित्सकपणे अभ्यास केला, ज्या जमिनीत कथाबीज पेरायचे तिची त्याने खूप कसून नांगरणी केली, म्हणजेच शेतकरी ज्याप्रमाणे जमिनीची खूप मशागत करतो व त्यानंतर पीक घेतो, त्याचप्रमाणे टॉलस्टॉयने कादंबरी लिखाणाअगोदर विविध संदर्भाचा व दाखल्यांचा प्रचंड अभ्यास केला.

प्रश्न इ. स्वत:चे लेखन परिपूर्ण होण्यासाठी टॉलस्टॉयने केलेले परिश्रम तुमच्या शब्दांत लिहा.
Solution
टॉलस्टॉयला स्वत:च्या सुप्तशक्तीवर विश्वास होता. लेखनवाचनाच्या बाबतीतही तो खूप चिकित्सक होता. त्याचे बालमनही त्या काळात प्रचंड व्यापक होते. विशेष म्हणजे त्याला दैनंदिनी लिहायची सवय लहानपणापासून होती. लहानपणापासूनच आपण इतरांसारखे सामान्य जीवन जगण्यासाठी जन्माला आलेलो नाही ही त्याला जाणीव होती.

‘युद्ध आणि शांती’ या कादंबरीच्या लिखाणासाठी टॉलस्टॉयने जी मेहनत घेतली, अभ्यास केला ते पाहून आश्चर्यचकित व्हायला होते. स्वतःचे लिखाण परिपूर्ण होण्यासाठी टॉलस्टॉयने कादंबरीचा मूळ आराखडाच तीन वेळा बदलला. कित्येक व्यक्तिरेखा मूळ आराखड्यात नव्हत्या. त्यांना नंतर प्रवेश मिळाला. त्यांच्या अभ्यासूवृत्तीमुळेच हे शक्य झाले. त्याने विविध ऐतिहासिक घटनांचा तपशीलवार अभ्यास करून एकाच घटनेतून दोन विरुद्ध पक्षाचे लोक कसा काय अर्थ काढतात त्याचे सर्व अन्वयार्थ त्याने समजावून घेतले.

युद्धाचे वर्णन प्रत्ययकारी होण्यासाठी त्याने बोरोडिनोच्या युद्धभूमीस भेट दिली. त्याने कादंबरी लिखाणाला सुरुवात केली आणि कमीत-कमी बारा - पंधरा वेळा लिखाण थांबवले. तो रोज दिवसभर लिखाण करायचा आणि संध्याकाळी तो पत्नीच्या टेबलवर आणून ठेवी, त्यातील तिने केलेल्या खाणाखुणांसह तो परत लिखाण करीत असे. त्यात खऱ्याखुऱ्या ऐतिहासिक घटनांच्या संदर्भात लिखाण करायचे होते त्यामुळेच त्याने ही दोन हजार पानांची कादंबरी 1869 साली पूर्ण केली. ‘युद्ध आणि शांती’ या कादंबरीच्या लिखाणासाठी त्याने अपार कष्ट घेतले, जणू काही तो 1863 ते 1869 या काळात नेपोलियनच्या काळातच जगत होता. त्याने या कादंबरीच्या लिखाणासाठी अगणित संदर्भग्रंथांचे वाचन केले. कदाचित त्याच्याएवढे कष्ट कादंबरी लिखाणासाठी खूप कमी लोकांनी घेतले असतील.

 

5. अभिव्यक्ती.

प्रश्न अ. ‘टॉलस्टॉय पहिल्या दर्जाचा कलावंत ठरतो, या विधानाची यथार्थता पटवून दया.
Solution
लेखिका सुमती देवस्थळे यांनी प्रसिद्ध साहित्यिक टॉलस्टॉय यांच्या संबंधी मराठीत लिखाण केले आहे आणि हे लिखाण पहिल्यांदा प्रसिद्ध करण्याचे श्रेयही त्यांना मिळाले आहे. कोणताही साहित्विक हा आत्मनिरीक्षण व आत्मपरीक्षणाच्या जोरावर साहित्यनिर्मिती करत असतो. साहित्यिकाला जर आपल्या लिखाणाबदद्ल समाधान वाटत नसेल तर अगदी मनाला समाधान मिळेपर्यंत वारंवार लिखाण करीत असतो. ‘युद्ध आणि शांती’ या कादंबरीच्या निर्मितीसाठी टॉलस्टॉय यांनी अपार कष्ट घेतले.

टॉलस्टॉयला मुळातच वाचनाची आवड होती. वाचनाची आवड असल्यामुळे त्याचे लिखाणही उत्तम दर्जाचे झाले. त्याच्या लिखाणात मानवतावाद दिसून येतो. टॉलस्टॉयने कादंबरी लिखाणाअगोदर असंख्य व्यक्तिरेखा अभ्यासल्या. अनेक लहान - मोठ्या घटनांचा भव्य विस्तार, नेपोनियनची रशियावर स्वारी, युद्धातील चित्तथरारक प्रसंग, तत्कालीन खानदानी रशियन लोकांचे आणि सामान्य लोकांचे वैयक्तिक जीवन, लष्करी कारवाया इ. बाबींचा त्याने चिकित्सक पद्धतीने अभ्यास केला. त्याने आपल्या मूळच्या आराखड्यातसुद्धा अनेक वेळा बदल केला.

सुरुवातीला जे चित्रित करायचे होते त्यापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ व उदात्त लिखाण होत गेले. त्याने अवतीभोवती राहणाऱ्या वयस्कर लोकांच्या अनौपचारिक मनमोकळ्या मुलाखती घेतल्या. युद्ध प्रत्यक्ष पाहिलेल्या माणसाला तो वेड्याच्या इस्पितळात जाऊन भेटला. ऐतिहासिक घटनांच्या पार्श्वभूमीवर मानवी जीवनदर्शन हा त्याच्या कादंबरीचा खरा विषय होता.

या कादंबरीत त्याने 500 पेक्षा जास्त व्यक्तिरेखा रंगवल्या आहेत, त्या व्यक्तिरेखांमध्ये प्रत्येकाला अगदी प्राण्यांनासुद्धा वेगवेगळे, स्वयंपूर्ण, सुस्पष्ट व्यक्तिमत्त्व आहे. केवळ आपण व्यक्तिचित्रणांकडे जरी दृष्टिक्षेप टाकला तरीसुद्धा या कादंबरीने फार मोठे यश साध्य केल्याचे आपणास दिसून येते. म्हणूनच टॉलस्टॉय हा पहिल्या दर्जाचा कलावंत ठरतो.


प्रश्न आ. ‘ज्या जमिनीत कथाबीज पेरायचे तिची खूप कसून नांगरणी चालली होती’, या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.
Solution
‘युद्ध आणि शांती’ या कादंबरीच्या लिखाणापूर्वी टॉलस्टॉय या महान साहित्यकाराने जी अपार मेहनत घेतली त्यांचे वर्णन या पाठात लेखिका सुमती देवस्थळे यांनी अत्यंत मार्मिकपणे केल्याचे दिसून येते. मोहरीएवढ्या बिजापासून प्रचंड अश्वत्थ वृक्ष उभा राहावा तशी ही कादंबरी वाढत गेली. या कादंबरीतील निसर्गवर्णने कादंबरीच्या पोतात अशी काही एकरूप झालेली आहेत की जणू काही त्यां या कादंबरीतील प्रसंगांना एक प्रकारचा जिवंतपणा आलेला आहे.

वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या ऐतिहासिक संदर्भात व्यक्तिमनाचा वेध घेण्यात टॉलस्टॉयने जी मानवी उकल केली आहे. ती केवळ आश्चर्यकारक म्हटली पाहिजे. कादंबरी लिखाणासाठी टॉलस्टॉयने अपार मेहनत घेतली. अभ्यासाचे डोंगर पेलले, अगणित संदर्भ ग्रंथांचा त्याने सतत अभ्यास केला. नेपोलियनविषयी प्रसिद्ध झालेले सर्व लिखाण त्याने अक्षरशः घुसळून काढले. 1863 ते 1869 या सहा वर्षांच्या काळा तो जणूकाही नेपोलियनच्या काळातच जगत होता असे वाटते.

ज्याप्रमाणे एखादा शेतकरी शेतात पीक घेण्याअगोदर अतिशय काळजीपूर्वक शेतीची मशागत करतो व त्यानंतर त्यात पेरणी करतो. व्यवस्थित मशागत केल्यानंतर येणारे पीकही चांगले येते, चांगले पीक आल्यानंतर शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान झळकते. त्याचप्रमाणे ‘युद्ध आणि शांती’ कादंबरी लिहिण्याअगोदर त्याने सर्व माहिती गोळा करण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले, असंख्य व्यक्तिरेखांचा अभ्यास केला, रशियातील त्या काळातील जीवनपद्धतीचा त्याने अभ्यास केला, अवतीभोवती राहणाऱ्या वयस्कर लोकांच्या अनौपचारिक मुलाखती घेतल्या. त्याला जे जे जमते ते त्याने सर्वकाही केले. कोणतीही कमतरता त्याने ठेवली नाही म्हणूनच असे म्हणता येईल की, ज्या जमिनीत कथाबीज पेरायचे तिची खूप कसून नांगरणी चालली होती.


प्रकल्प.

संगणकावर उपलब्ध असणाऱ्या ‘गुगल अॅप’चा वापर करून लिओ टॉलस्टॉय यांच्याविषयी अधिक माहिती मिळवून संपादित करा.

आकलन कृती

खालील पठित गदय उताऱ्याच्या आधारे सुचनेनुसार कृती करा.

प्रश्न 1.
  
उत्तर:
  

खालील घटनेचे परिणाम लिहा.

प्रश्न 1.
घटनापरिणाम
कादंबरीचा मूळचा आराखडा व नाव तीन वेळा बदलले………………………..

उत्तर:

घटनापरिणाम
कादंबरीचा मूळचा आराखडा व नाव तीन वेळा बदललेकित्येक व्यक्तिरेखांना मूळच्या आराखड्यात स्थान नव्हते नंतर प्रवेश मिळाला. जे चित्रित करण्याचे प्रांरभी ठरवले होते, त्याहून कितीतरी वेगळी, कितीतरी श्रेष्ठ, उदात्त अशी कलाकृती हळूहळू तयार होत गेली.

प्रश्न 2. 1869 च्या अखेरीस’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
Solution
‘युद्ध आणि शांती’ या कादंबरीच्या लिखाणास कोणत्या वर्षी सुरुवात झाली?

प्रश्न 3. स्टॅकॉव्हसारख्या तज्ज्ञ टीकाकाराचा ‘बुद्ध आणि शांती’ या कादंबरीवरील अभिप्राय म्हणजे - [ ]
Solution
स्टॅकॉव्हसारख्या तज्ज्ञ टीकाकाराचा ‘युद्ध आणि शांती’ या कादंबरीवरील अभिप्राय म्हणजे - कादंबरीच्या शिफारशीचा एक ताम्रपटच

उपयोजित कृती

प्रश्न 1. एखादे लिखाण वाचल्यानंतर स्वत:चे मत मांडणे या अर्थाचा उताऱ्यात आलेला शब्द
Solution
अभिप्राय

प्रश्न 2. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
प्रत्यक्ष लेखनास पुरी सहा वर्षे लागली.
Solution
सहा - संख्यावाचक विशेषण

प्रश्न 3. खालील शब्दांसाठी उताऱ्यात वापरलेले पर्यायी शब्द लिहा.
(अ) प्रचंड
(ब) ठिकाण
Solution
(अ) प्रचंड - भव्य
(ब) ठिकाण - स्थान

 

स्वमतः

प्रश्न 1. ‘युद्ध आणि शांती’ ही कादंबरी वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवते, तुमचे मत लिहा.
Solution
सत्य, शांती, त्याग, सेवा या मूल्यांची जोपासना करणारे थोर तत्त्वचिंतक, शिक्षणशास्त्रज्ञ आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक लिओ टॉलस्टॉय लिखित ‘युद्ध आणि शांती’ ही कादंबरी आहे. या कादंबरी लिखाणाअगोदर टॉलस्टॉय यांनी परिपूर्ण अभ्यास केला. कादंबरीचा दर्जा जपण्याचा त्याने अतोनात प्रयत्न केला. पूर्वीच्या काळी साम्राज्यवादाला महत्त्व असल्यामुळे जो बलवान असेल तो राज्य करीत असे, पण त्याच्यापुढेही साम्राज्य टिकवणे हे आव्हान होते. कारण त्या काळात वर्चस्वासाठी सैन्यातसुद्धा मोठ्या प्रमाणावर बंडाळी होत असे. अनेक साम्राज्ये उभी राहिल्याचा व ती साम्राज्ये जगासमोर आहेत. याचा सखोल अभ्यास टॉयस्टॉय यांनी केला. त्यांनी कादंबरी लिखाणाअगोदर लोकांची मते विचारून घतला. लिखाणात आवश्यक बाबी कोणत्या आहेत? हे त्याने जाणून घेतले.

प्रत्यक्ष युद्धभूमीला त्याने भेट दिली. त्याने ऐतिहासिक माफत लिखाणाला परिपूर्ण अशी सर्व माहिती गोळा केली. जवळजवळ तीन वेळा मूळ लिखाणाचा ढाचा व नाव बदलले. लिखाणात अतिशयोक्ती होणार नाही याची त्याने काळजी घेतली. मानवी जीवनदर्शन अगणित संदर्भ ग्रंथांचा त्याने अभ्यास केला. 1863 साली सुरू झालेले लिखाण 1869 साली पूर्ण झाले. या सहा वर्षांच्या काळात प्रत्यक्ष तो त्याच जगात वावरत होता. इतके परिपूर्ण लिखाण मानवी मनावर व्यापक परिणाम करते. यद्धाच्या माध्यमातून कोणतेही जगातील प्रश्न सुटत नाहीत हा कादंबरीचा मूळ विषय आहे. टॉलस्टॉयच्या लेखन शैलीमुळे वाचक कादंबरी वाचताना खिळून राहतो म्हणूनच ही कादंबरी वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवते असे आपल्याला म्हणता येईल.

आकलन कृती

खालील पठित गदव उताऱ्याच्या आधारे सुचनेनुसार कृती करा.

प्रश्न 1.
  
उत्तर:
  

प्रश्न 2. प्रत्यक्षात वावरणाऱ्या व्यक्तीपेक्षा कल्पनासृष्टीतली पाने त्याला अधिक जवळची वाटू लागली कारण ।
Solution
प्रत्यक्षात वावरणाऱ्या व्यक्तीपेक्षा कल्पनासृष्टीतली पात्रे त्याला अधिक जवळची वाटू लागली. कारण कादंबरीतील पात्रे जणू देहधारण करून त्याच्याशी बातचीत करत होती.

प्रश्न 3.
  
उत्तर:
  

आकृतिबंध पूर्ण करा.

प्रश्न 1.
  
Solution
  

उपयोजित कृती

वाक्यरूपांतर ओळखा.

प्रश्न 1. कल्पनासृष्टीमुळे उलगडलेला ऐतिहासिक काळ लवकरच बारीकसारीक तपशिलांसह जिवंत होऊ लागला. (विधानार्थी वाक्य)
सूचना : प्रश्नार्थी रूप ओळखा.
पर्याय : 1. कल्पनासृष्टीमुळे उलगडलेला ऐतिहासिक काळ लवकरच बारीकसारीक तपशिलांसह जिवंत होऊ लागला का?
2. कल्पनासृष्टीमुळे उलगडलेला ऐतिहासिक काळ लवकरच बारीकसारीक तपशिलांसह जिवंत होऊ लागला तर !
3. कल्पनासृष्टीमुळे उलगडलेला ऐतिहासिक काळ लवकरच बारीकसारीक तपशिलांसह जिवंत होऊ लागेलच असेही नाही.
Solution
कल्पनासृष्टीमुळे उलगडलेला ऐतिहासिक काळ लवकरच बारीकसारीक तपशिलांसह जिवंत होऊ लागला का?


प्रश्न 2. गटात न बसणारा शब्द ओळखा कादंबरी, कथासंग्रह, काव्यसंग्रह, संदर्भग्रंथ
Solution
संदर्भग्रंथ

प्रश्न 3. योग्य विरामचिन्हांचा पर्याय ओळखा.
निर्मितीची प्रक्रिया शक्य तेवढ्या वेगाने सुरू होती ; पण मूळच्या अति चोखंदळपणापायी रचलेला पुष्कळसा आकृतिबंध विस्कटून जात होता.
स्वल्पविराम, पूर्णविराम, दुहेरी अवतरणचिन्ह, पूर्णविराम, स्वल्पविराम, उद्गारचिन्ह., अर्धविराम पूर्णविराम
Solution
(अर्धविराम, पूर्णविराम)

स्वमतः

प्रश्न 1. लेखकाच्या अतिचोखंदळ वृत्तीमुळे रचलेला पुष्कळसा आकृतिबंध विस्कटून जातो, तुमचे मत लिहा.
Solution
लिखाण परिपूर्ण होण्यासाठी बरेच साहित्यिक चोखंदळ मार्गाचा अवलंब करतात. एखादा विषय जर अर्थपूर्ण किंवा व्यापक असेल तर त्या विषयाच्या मांडणी संदर्भात अतिशय काळजी घेतली जाते. आपल्या लिखाणाचा विषय किंवा अर्थ वाचकांच्या मनाला भिडणारा असावा असा प्रयत्ल लेखकाचा असतो. आपल्यासारखे लिखाण संबंधित विषयावर अजूनपर्यंत कोणीही केलेले नसावे व आपल्याला यश मिळावे हा त्यामागील हेतू असतो. लिखाणाअगोदर विविध गोष्टींचा परामर्श घ्यायचा त्यांचा प्रयत्न असतो. अभ्यासाचे डोंगर पेलायची त्यांची ताकद असते.

दंबरीचा विषय समजून घेताना लिखाणाचा मूळ ढाचा बदलण्याची त्यांची तयारी असते. प्रवास, मुलाखती, चर्चा, भेटीगाठी, विविध संदर्भ ग्रंथ इ. प्रकारच्या मार्गाचा अवलंब ते करतात. त्यामळे लिखाणाला सरुवात होण्यास वेळ ला पात्रे विषयाला अनुसरून असतील याची काळजी घेतली जाते. कल्पनेतले लिखाण वास्तववादी वाले परिणामकारक होण्यासाठी अनेक वेळा लिखाण केले जाते. या चोखंदळ वत्तीमळे रचलेला पुष्कळसा आकृतिबंध खरोखरच विस्कटन गेलेला दिसून येतो कारण मूळ लिखाणामध्ये अनेक बदल झालेले असतात, पण लिखाण मात्र परिणामकारक व वास्तववादाला स्पर्श करते.

वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार Summary in Marathi
प्रास्ताविकः

सुप्रसिद्ध लेखिका, चरित्रकार, ‘टॉलस्टॉय एक माणूस’, ‘मॅक्झिम गॉर्को’, ‘डॉ. अल्बर्ट श्वाइट्झर’, ‘एक विचारवंत’ (कार्ल मार्क्ससंबंधी) ‘छाया आणि ज्योती’ ही चरित्रे त्यांनी लिहिली. चरित्रलेखनाला आवश्यक असणारी मेहनत, विषयासंबंधीचा जिव्हाळा, समरसता आणि प्रवाही शैली या वैशिष्ट्यांमुळे त्यांच्या लेखनाला आगळेपण प्राप्त झाले आहे. टॉलस्टॉय आणि श्वाइट्झर यांच्यासंबंधी एवढे मार्मिक लेखन मराठीत पहिल्यांदा प्रसिद्ध करण्याचे श्रेयही त्यांना मिळाले आहे.

पाठ परिचयः

सत्य, शांती, त्याग, सेवा या मूल्यांचे उपासक असणारे थोर तत्त्वचिंतक, शिक्षणशास्त्रज्ञ आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक लिओ निकोल्विच टालस्टॉय हे विश्वशांतीचे मार्गदर्शक होते. सत्याग्रह, असहकार या शांततामय प्रतिकाराचे तत्त्वज्ञान त्यांनी सांगितले. टॉलस्टॉय यांच्या लेखक म्हणून बडणीचे आणि ‘वॉर अॅण्ड पिस’ या महान कादंबरीच्या निर्मिती प्रक्रियेचे प्रत्ययकारी चित्रण ‘टॉलस्टॉय एक माणूस’ या पुस्तकातून आले आहे. या कादंबरी लेखनासाठी टॉलस्टॉय यांनी परिपूर्ण अभ्यास करून कादंबरी दर्जेदार होण्यासाठी अनके वेळा पुनर्लेखन केले. त्यामुळे ‘वॉर अॅण्ड पिस’ हे जागतिक साहित्यातील वाङ्मयीन लेणे ठरले. मानवी जीवनातील गुंतागुतीचे प्रश्न युद्धाने सुटत नसून ते शांती आणि प्रेमाने सुटतात हे टॉलस्टॉय यांनी या कादंबरीत सांगितले आहे.
 

समानार्थी शब्द / पर्यायी शब्दः

  1. मातृविहीन - ज्याला माता नाही तो.
  2. न्यून - काहीतरी कमी असल्याचे जाणवणे.
  3. उणीव - (less, deficient).
  4. उत्तेजित - प्रोत्साहित.
  5. चिमुकले - छोटेसे - (very small, tiny).
  6. संकलित - एकत्रित - (collected).
  7. बालपण - लहानपण - (childhood).
  8. छंद - आवड - (liking, hobby).
  9. पिंजण - चक्र - (मनातले विचार).
  10. दैनंदिनी - रोजनिशी - (diary).
  11. सुप्त शक्ती - अंतर्गत शक्ती - (दडलेले ज्ञान).
  12. चिकित्सा - संशोधन - (minute examination).
  13. अभिप्राय - स्वत:चे मत (एखादया लिखाणावरचे) - (opinion).
  14. यातना - त्रास, दुःख - (great pains)
  15. बांडगुळ - झाडावरील वाढलेला अतिरिक्त भाग जो झाडाच्या वाढीवर परिणाम करतो - (a parasitical (living an another).
  16. मेहनत - कष्ट - (hard work)

वाक्यप्रचारः

  • न्यून असणे - कमी असणे.
  • मातीशी मसलत करणे - मातीची मशागत करणे.
  • अवाक होणे - चकित होणे.
  • अभ्यासाचे डोंगर पेलणे - खूप अभ्यास करणे.
  • कृतकृत्य होणे - समाधानी होणे.
  • अभिप्राय देणे - स्वत:चे एखादया लिखाणाविषयी किंवा कलाकृतीविषयी मत मांडणे.
  • CategoriesClass 11

वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार स्वाध्याय  | Vandmayin lenyacha shilpkari | Maharashtra State Board 11th Marathi Solution

सुमती देवस्थळे (१९२७ ते १९८२) : सुप्रसिद्ध लेखिका. चरित्रकार. ‘टॉलस्टॉय एक माणूस’, ‘मॅक्झिम गॉर्की’, ‘डॉ. अल्बर्ट श्वाइटझर’, ्‌‘एक विचारवंत’ (कार्ल मार्क्ससंबंधी), ‘छाया आणि ज्योती’ ही चरित्रे त्यांनी लिहिली. चरित्रलेखनाला आवश्यक असणारे परिश्रम, विषयासंबंधीचा जिव्हाळा, समरसता आणि प्रवाही शैली या वैशिष्ट्यांमुळे त्यांच्या लेखनाला आगळेपण प्राप्त झाले आहे. टॉलस्टॉय आणि श्वाइट्‌झर यांच्यासंबंधी मराठीत एवढे मार्मिक लेखन पहिल्यांदा प्रसिद्ध करण्याचे श्रेयही त्यांना मिळाले आहे. सत्य, शांती, त्याग, सेवा या मूल्यांचे उपासक असणारे थोर तत्त्वचिंतक, शिक्षणशास्त्रज्ञ आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक लिओ निकोल्विच टॉलस्टॉय हे विश्वशांतीचे मार्गदर्शक होते. सत्याग्रह व असहकार या शांततामय प्रतिकाराचे तत्त्वज्ञान त्यांनी मांडले. ‘टॉलस्टॉय एक माणूस’ या पुस्तकातून निवडलेल्या या चरित्रपर पाठात टॉलस्टॉय यांच्या लेखक म्हणून झालेल्या जडणघडणीचे आणि ‘वॉर ॲण्ड पिस’ या महान कादंबरीच्या निर्मितीप्रक्रियेचे प्रत्ययकारी चित्रण आले आहे. या कादंबरी लेखनासाठी टॉलस्टॉय यांनीपरिपूर्ण अभ्यास केला. कादंबरी दर्जेदार होण्यासाठीपुन: पुन्हा लेखन केले. त्यामुळे ‘वॉर ॲण्ड पिस’ हे जागतिक साहित्यातील वाङमय्‌ीन लेणे ठरले. मानवी जीवनातील जटील प्रश्न युद्धाने सुटत नाहीत तर ते शांती आणि प्रेमाच्या मार्गाने सुटतात हे टॉलस्टॉय यांनी या कादंबरीत सांगितले आहे.

वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार स्वाध्याय  | Vandmayin lenyacha shilpkari | Maharashtra State Board 11th Marathi Solution

जेमतेम दोन वर्षांचा मातृविहीन लिओ यास्नाया पोल्यानामधील प्रशस्त घरात वाढत होता. आत्याने आईची जागा इतकी मन:पूर्वक भरून काढली होती, की आपल्या जीवनात काही न्यून असल्याचे लिओला कधी जाणवलेच नाही. त्याची आई जरी त्याला मुळीच आठवत नसली तरी अगदी तान्हेपणीच्या दोन आठवणी त्याने आवर्जून लिहून ठेवल्या आहेत. अगदीपहिली आठवण अशी, की आपणास दुपट्यात घट्ट गुंडाळून ठेवले आहे. आपल्याला हातपाय हलवण्याचा मोकळेपणा हवा आहे. तो मिळत नाही. म्हणून आपण खूप जोरजोराने रडत आहोत. भोवती मोठी माणसे उभी आहेत; पण त्यांना बाळाची व्यथा समजू शकत नाही. आपण मात्र रडतोच आहोत! इतक्या तान्हेपणाची आठवण आजवर कोणीही निवेदन केलेली नाही. दुसरी आठवण अधिक बोलकी असून टॉलस्टॉयच्या तरल संवेदनांची सूचक आहे. 

‘‘मी अंघोळीसाठी एका टबमध्ये बसलो आहे. एका नवीन सुगंधी साबणाने दाई माझे अंग चोळत आहे. तो सुगंध सर्वपाण्यात मिसळलेला आहे. सुगंधाच्या नावीन्याची जाणीव मला उत्तेजित करते. प्रथमच मला माझ्या चिमुकल्या देहाचे अस्तित्व जाणवते अन्‌आवडतेही. मऊ काळाभोर लाकडी टब, बाह्या मागे दुमडलेला दाईचा हात, पाण्याच्या कढत वाफा, चिमुकल्या हातांनी पाण्याशी खेळताना होणारा आवाज, टबाच्या ओल्या कडांवरून माझे चिमुकले हात फिरवत असताना झालेली पृष्ठभागाच्या गुळगुळीतपणाची जाणीव, हे सारे सारे आठवते मला!’’ किती अर्थपूर्ण आहे ही आठवण! लिओच्या ज्ञानेंद्रियांची तीव्रता नि:संशय लक्षणीय आहे. लिओला दाईचे मोकळे हात दिसतात, सुगंधी द्रव्याचा वास येतो, पाण्याची उष्णता जाणवते, पाण्याशी खेळताना पाण्याचा आवाज ऐकू येतो, टबच्या आतील मऊ स्पर्श कळतो, आणि या सर्व संवेदनांची संकलित जाणीव आनंददायी वाटते.

 लिओच्या प्रत्येक ज्ञानेंद्रियाची संवेदना लहानपणापासूनच किती तल्लख होती ते या लहानशा आठवणीवरून स्पष्ट होते. निरनिराळ्या संकल्पनांशी खेळत बसण्याची व त्यांचे दृक्प्रत्यय मनाने अनुभवण्याची लिओची शक्ती अमर्याद होती. त्याचे कोवळे वय लक्षात घेता, ती शक्ती विलक्षण होती असेच म्हटले पाहिजे. लिओची बौद्‌धिक वाढ अगदी झपाट्याने होत होती. एकाच गोष्टीचा निरनिराळ्या दृष्टिकोनांतून विचार करण्याची क्षमता उत्पन्न होत होती.

इतक्या बालपणी अमूर्तासंबंधी विचार करण्याची त्याची प्रवृत्ती केवळ चकित करणारी होती. हीच प्रवृत्ती मोठेपणी भूमिती श्रेणीने वाढत गेली. प्रत्येक घटनेच्या हेतूचा विचार करणे, सतत आत्मशोधन करणे, स्वत:च्या विचारांचे अंत:स्रोत ओळखण्याचा प्रयत्न करणे यांचा त्याला जणू छंदच जडला होता. त्याच्या मनाची पाटी कोरी किंवा निर्विकार अशी कधीही राहू शकली नाही. विचारांची गुंतागुंत नसली तर लिओला अगदी चुकल्याचुकल्यासारखे वाटे. एकदा तो स्वत:शीच म्हणाला, ‘मी आता कसला विचार करतो आहे बरं? हो! मी कसला विचार करतोय या प्रश्नाचा मी विचार करतोय.’ त्याच्या मनात सतत विचारांची पिंजण चालू असे. साध्या घटनांच्यासुद्धा असंख्य प्रतिमा त्याच्या मन:पटलावर एकदम दृश्यमान होत. अगदी शोभादर्शकाप्रमाणे! लिओ स्वत:च्या मनाचे पृथक्करण करी-चिंतन करी.

 आपल्या मनाच्या प्रगतीचा (आणि परागतीचा) संपूर्ण आलेख त्याने टिपून ठेवायला सुरुवात केली. दररोज दैनंदिनी लिहिण्याचा परिपाठ ठेवला. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे मूलस्रोत समजून घेण्यास या दैनंदिन्या खूपच उपयुक्त आहेत. दैनंदिनी लिहून ठेवण्याची कल्पना आत्मनिरीक्षणाच्या व आत्मपरीक्षणाच्या आवश्यकतेतून स्फुरली. या वयापासूनच आपण इतरांसारखे सामान्य जीवन जगण्यासाठी जन्माला आलेलो नाही ही त्याची खात्री होती. त्याचा आपल्या सुप्तशक्तींवर विश्वास होता. त्या शक्तींचा वेध घेण्यासाठी दैनंदिनी लिहिणे त्याला अत्यंत अगत्याचे वाटत होते. टॉलस्टाॅयला वाचनाची आवड जबरदस्त होती. 

त्याचा वाचनाचा वेग उत्तम होता. टॉलस्टॉयने भरपूर वाचन व मनन केले. पुष्किन, टर्जिनिव्ह, डिकन्स, व्हॉल्टेअर, रूसो इत्यादी ग्रंथकारांचा मन:पूर्वक अभ्यास केला. त्यामुळे अभिजात साहित्याची आवड संस्कारित झाली. लेखनवाचनाच्या बाबतीतही खूप चिकित्सा सुरू होती. सपाटून वाचन सुरू होते. ललित साहित्य, तात्त्विक साहित्य, राजकारण, इतिहास... बडेबडे ग्रंथराज सेवेस हजर होते. यास्नायाहून सारखी पुस्तके मागवत होता तो. सारे काही त्याला अगदी आदर्शातले आदर्श असे हवे होते. प्रत्येक वाचलेल्या पुस्तकावर निसटता तरी अभिप्राय नोंदला जात होता.

 अधलेमधले, सामान्य, सुवर्णमध्य गाठणारे असे काही एक त्याला आवडत नव्हते. तडजोड नको होती. शुद्ध आदर्शाचा अट्टहास होता. युरोपच्या प्रवासात असताना निसर्गसुंदर परिसरात तो अगदी वेडावून गेला होता. ‘बाहेरचे सौंदर्य माझ्या डोळ्यांतून अंतरात्म्यात ओतले जाते... माझ्या अंतरंगात आनंद भरलेला आहे. मला जगायचे आहे-मला चिरंजीव व्हायचे आहे!’ हा निरागस आनंद मनात गोड हुरहुर निर्माण करत होता. निसर्गसौंदर्यातून निसर्गसान्निध्याची ओढ निर्माण झाली. मग या धरतीच्या लेकराने मातीशी मसलत करायला सुरुवात केली. कापणी, लावणी, खुरपणी, निंदणी इत्यादी सर्व कामांत तो रस घेऊ लागला. गवत झपाझप काढण्याचे काम त्याच्या खास आवडीचे होते. शेतीचे काम म्हणजे नवनिर्मिती! हा नवनिर्मितीचा आनंद तो अगदी दमछाक होईपर्यंत अनुभवत असे.

 कामाशी इतका समरस होऊन जाई, की स्वत:चा विसर पडे. हात अगदी यंत्रासारखे झपाट्याने चालू राहत. तो जणू नुसता साक्षित्वाने खुरप्यावर वाकलेला असे. निढळाच्या घामावर वाऱ्याच्या झुळकी आल्या म्हणजे तो गारवा विलक्षण सुखद वाटे, त्याला कशाची सर येणार? सपाटून काम केले, की अगदी कृतार्थ भावनेने, सुखासमाधानाने तो शेतकऱ्यांबरोबर न्याहारी करायला बसे. त्यांच्याशी भरपूर गप्पा, अगदी घरगुती गप्पा करी. अशा प्रकारे कालक्रमणा सुरू असताना दिवसेंदिवस सक्तीच्या एकाकीपणापायी टॉलस्टॉयच्या मनात एक प्रकारची अवघड अस्वस्थता निर्माण झाली होती. अंगभर फुलांनी डवरलेली झाडे पाहिली, निसर्गाच्या अजोड कलाकृती पाहिल्या, की त्याला अापले एकाकीपण फारच बोचत राही. सर्व भावभावनांशी खऱ्या अर्थाने समरस होणारी सहचरी मिळते की नाही या शंकेने त्याच्या मनाचा नुसता छळ मांडला होता. या शंकेला एक दिवस पूर्णविराम मिळाला.

 गृहस्थाश्रमात प्रवेश करताच विलक्षण सुखाच्या वर्षावात टॉलस्टॉय चिंब भिजून गेला. त्याची पत्नी सोन्या म्हणजे केवळ आनंदाची मूस! लग्नानंतरची १५-१६ वर्षे टॉलस्टॉयचा जीवनप्रवाह फारशी वाकणे-वळणे न घेता अनिरुद्धपणे वाहत राहिला. गृहस्थाश्रमात त्याने चांगले रमून जावे अशी सर्व दृष्टींनी अनुकूल व समृद्ध परिस्थिती होती. याच काळात ‘युद्ध आणि शांती’ व ‘ॲना कॅरॅनिना’ या सुप्रसिद्ध कादंबऱ्या लिहिल्या गेल्या.

१८६३ च्या अखेरीस ‘युद्ध आणि शांती’ या कादंबरीच्या लेखनास सुरुवात झाली. प्रत्यक्ष लेखनास पुरी सहा वर्षे लागली. असंख्य व्यक्तिरेखा, अनेक लहान मोठ्या घटनांचा भव्य विस्तार, नेपोलियनची रशियावर स्वारी, युद्धातील चित्तथरारक प्रसंग, तत्कालीन खानदानी रशियन लोकांचे कौटुंबिक जीवन, सामान्य लोकांचे वैयक्तिक जीवन, लष्करी कारवाया, नृत्ये, मेजवान्या, शिकारी इत्यादी असंख्य घटनांच्या तपशिलाने हे भव्य वाङ्‌मयीन शिल्प आकार घेऊ लागले. 

साहित्यक्षेत्रात ही कादंबरी म्हणजे ‘न भूतो न भविष्यति!’ अशा स्वरूपाचे कैलास लेणे आहे. ‘‘मानवी जीवनाचे संपूर्ण चित्रण, तत्कालीन रशियाचे प्रत्ययकारी वर्णन, तत्कालीन ऐतिहासिक महत्त्वाच्या घटना व मानवी संघर्षयांचा संपूर्ण आलेख, आनंद-उदात्तता-यातना-अवमान- महत्त्वाकांक्षा इत्यादी नानाविध मानवी भावतरंगांचे जिवंत प्रत्ययकारी चित्रण म्हणजे ‘युद्ध आणि शांती’ ही कादंबरी’’, हा स्ट्रॅकॉव्हसारख्या तज्ज्ञ टीकाकाराचा अभिप्राय म्हणजे या कादंबरीच्या शिफारशीचा एक ताम्रपटच! मोहरीएवढ्या बिजापासून प्रचंड अश्वत्थ वृक्ष उभा राहावा तशी ही कादंबरी वाढत गेली. मूळचा आराखडा तीन वेळा बदलला. नावसुद्धा अर्थातच तीन वेळा बदलले. 

कित्येक व्यक्तिरेखांना मूळच्या आराखड्यात स्थान नव्हते. नंतर प्रवेश मिळाला. जे चित्रित करण्याचे प्रारंभी ठरवले होते, त्याहून कितीतरी वेगळी, कितीतरी श्रेष्ठ, उदात्त अशी कलाकृती हळूहळू तयार होत गेली. कादंबरीच्या उत्क्रांतीच्या पायऱ्यासुद्धा पाहण्यासारख्या आहेत. त्यांतून टॉलस्टॉयची लोकोत्तर कल्पनाशक्ती, संवेदनशीलता, अभ्यासू वृत्ती आणि घटनांचा नेमका वेध घेणारी अंतर्भेदी प्रतिभा दिसून येते. या कादंबरीत आलेली निसर्गवर्णने कादंबरीच्या पोतात इतकी एकरूप झालेली आहेत, की त्यांना वेगळे- तुटक असे अस्तित्व नाही. 

निसर्गवर्णने मुख्यत: व्यक्तिचित्रणाच्या पार्श्वभूमीवर येतात, त्यामुळे ती बांडगूळवजा वाटत नाहीत. उलट कादंबरीचा तो एक अविभाज्य घटक ठरतो. लढायांचे किंवा इतर घटनांचे वर्णनही त्यामुळे कादंबरीतील व्यक्तींवर जो परिणाम साधला असेल, ते सांगण्याच्या संदर्भात येते. त्यामुळे सर्व प्रसंगांना एक प्रकारचा जिवंतपणा, अपरिहार्यता आलेली आहे. वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या ऐतिहासिक संदर्भांत व्यक्तिमनाचा ठाव घेण्यात टॉलस्टॉयने जी मानवी उकल करून दाखवली आहे ती केवळ विस्मयावह म्हटली पाहिजे. या कादंबरीच्या लिखाणासाठी टॉलस्टॉयने जी मेहनत घेतली, जे अभ्यासाचे डोंगर पेलले, ते पाहून मनुष्य अक्षरश: अवाक्होतो. 

अगणित संदर्भ ग्रंथांचा त्याने सतत अभ्यास चालवला होता. ज्या जमिनीत कथाबीज पेरायचे तिची खूप कसून नांगरणी चालली होती. अधिकृत इतिहास, रशियन व फ्रेंच इतिहासकारांनी लिहिलेला, त्या कालखंडाचा परामर्श घेताना एकाच घटनेतून दोन विरुद्ध पक्षांचे लोक कसा काय अर्थ काढतात त्याचे सबंध अन्वयार्थ त्याने समजावून घेतले. नेपोलियनविषयी प्रसिद्ध झालेले अपरंपार लिखाण, हे सारे काही त्याने अक्षरश: घुसळून काढले. १८६३ ते १८६९ या सहा वर्षांत मनाने तो नेपोलियनच्या काळातच जगत होता, असे म्हटल्यास हरकत नाही. युद्धाच्या वर्णनात संपूर्ण प्रत्ययकारिता आणण्यासाठी त्याने बोरोडिनोच्या युद्धभूमीस प्रत्यक्ष भेट दिली. अवतीभोवती राहणाऱ्या वयस्कर लोकांच्या अनौपचारिक मनमोकळ्या मुलाखती घेतल्या. एकंदर युद्धाचा रशियातील सामान्य लोकांच्या जीवनप्रवाहावर काय परिणाम झाला ते समजावून घेतले. ते युद्ध पाहिलेला एक माणूस वेड्याच्या इस्पितळात होता. त्याचे वेड काही विशिष्ट बाबतीत असून बाकी तो ठीक होता. हे कळल्याबरोबर वेड्याच्या इस्पितळात जाऊन त्या वेड्या म्हाताऱ्याचे युद्धविषयक स्मृतिकण वेचण्यासाठी टॉलस्टॉयने कमी केले नाही. 

मिळेल तेथून मिळेल तितकी माहिती तो आपल्या स्मृतिमंजुषेत साठवून ठेवत होता. एकंदर या प्रवासामुळे खूपच प्रत्ययकारी तपशील मिळाला. टॉलस्टॉयच्या भाेवती तपशिलांचा अक्षरश: महासागर हेलावत होता. त्याचे समुद्रमंथन करून मानवी जीवनविषयक तत्त्वज्ञानाचा अमृतकुंभ काढणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. त्याच्या जोडीला आधीच्या भागांचे भागश: प्रकाशन सुरू होते. एवढ्या प्रचंड कादंबरीचे परिष्करण करण्यात तो सतत कार्यमग्न होता. या संदर्भात त्याने आपल्या कविमित्रास कळवले, ‘‘साहित्यनिर्मिती म्हणजे

एक प्रकारची प्रसूतीच असते.’’ एखाद्या वेळी मनाजोगते लिखाण झाले, की त्याला अगदी कृतकृत्य वाटे. अभ्यासिकेच्या बाहेर येऊन तो म्हणे, ‘आज माझ्या अस्तित्वाचा एक अंश शाईच्या समुद्रात टाकून आलो आहे बरं!’ कल्पनासृष्टीमुळे उलगडलेला ऐतिहासिक काळ लवकरच बारीकसारीक तपशिलांसह जिवंत होऊ लागला. कादंबरीतली पात्रे जणू देहधारण करून त्याच्याशी बातचीत करू लागली. प्रत्यक्षात वावरणाऱ्या व्यक्तीपेक्षा कल्पनासृष्टीतली पात्रे त्याला अधिक जवळची वाटू लागली. 

चोवीस तास ती मानसचित्रे त्याच्या सान्निध्यात वावरत-शब्दरूपाने अभिव्यक्त होण्याचा अट्टहास धरत. निर्मितीची प्रक्रिया शक्य तेवढ्या वेगाने सुरू होती; पण मूळच्या अति चोखंदळपणापायी रचलेला पुष्कळसा आकृतिबंध विस्कटून जात होता. धड काही जमत नव्हते. कादंबरीची सुरुवात कशी करावी हा यक्षप्रश्न सुटता सुटेना! बारा-पंधरा वेळा सुरुवात केली अन्‌दूर सारली. त्याला काही पसंत पडत नव्हते. 

मनातल्या व्यक्तींना तर शब्दरूपाने अभिव्यक्त होण्याची निकड! मनावर फार ताण पडत होता. सुरुवातीला सूर जुळला तरी नंतरचा भाग सलग लिहिला गेला नाही. नेमक्या आराखड्याच्या अभावी किंवा बदलत्या आराखड्यांमुळे म्हणा हवे तर-लेखनाची हमालीसुद्धा खूप वाढली. इतके परिष्करण की त्याला खरोखर उपमा नाही! शब्दसंहती, परिच्छेद रचना, पात्रयोजना, कथानकाची गुंफण, ऐतिहासिक नेमके संदर्भ-सारेकाही अगदी नेटके- बरोबर जमायला हवे होते. रोज दिवसभर लिहिलेला भाग संध्याकाळी तो सोन्याच्या टेबलावर आणून ठेवी. रात्री सोन्याचे काम सुरू व्हायचे. टॉलस्टॉयने लिहिलेल्या भागाची सुवाच्य नक्कल उतरवून काढणे हे तिचे काम. ते ती अत्यंत मन:पूर्वक करी. 

ती आपण लिहिलेले टॉलस्टॉयच्या टेबलावर नीट रचून ठेवी आणि मग झोपी जाई. सोन्याने लिहून काढलेली प्रकरणे सकाळी तो नजरेखाली घालत असे. त्यात पुनश्च असंख्य फरक करी. सारे कागद पुनश्च खाणाखुणा, वाक्यखंड, रेघा इत्यादी तपशिलाने चिताडले जात. मग ते दुखावलेले घायाळ कागद संध्याकाळी नव्या सोबत्यांसह पुनश्च सोन्याच्या टेबलावर स्थानापन्न होत असत. मग रात्री तिचा उद्योग सुरू व्हायचा. अशा रीतीने सोन्याने ती २००० पृष्ठांची कादंबरी जवळजवळ सात वेळा लिहून काढली. टॉलस्टॉय काही इतिहास लिहीत नव्हता. कादंबरी हे त्याचे माध्यम. ऐतिहासिक घटनांच्या पार्श्वभूमीवर मानवी जीवनदर्शन हा कादंबरीचा खरा विषय. 

या कादंबरीत सुमारे ५०० हून अधिक व्यक्तिरेखा रंगवल्या आहेत. विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळे, स्वयंपूर्ण, सुस्पष्ट व्यक्तिमत्त्व आहे. व्यक्तींनाच काय-कुत्र्याला सुद्धा स्पष्ट व्यक्तिमत्त्व आहे. केवळ व्यक्तिचित्रणांकडे पाहिले तरीसुद्धा या कादंबरीने फार मोठे यश साध्य केले आहे. त्या दृष्टीने टॉलस्टॉय हा पहिल्या दर्जाचा कलावंत ठरतो. १८६९ च्या डिसेंबरअखेरी टॉलस्टॉयने ‘युद्ध आणि शांती’ ही प्रचंड कादंबरी पूर्ण केली. ही अवाढव्य कादंबरी प्रसिद्ध झाल्यावर टॉलस्टॉयला कृतकृत्य वाटले. 

खूप हलकेहलके वाटले. विलक्षण मानसिक ताण पडला होता. फारच थोड्या लोकांना कादंबरीची झेप समजली होती. टर्जिनिव्हसारख्या मुरलेल्या साहित्यिकालासुद्धा कादंबरीचे स्वारस्य समजण्यास वेळ लागला होता; पण जेव्हा संपूर्ण पुस्तक वाचले तेव्हा मात्र तो खूश झाला. त्याने नमूद केले, की ‘‘रशियन भाषा जिवंत असेपर्यंत ही कादंबरी वाचली जाईल.’’
 

वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार स्वाध्याय  | Vandmayin lenyacha shilpkari | Maharashtra State Board 11th Marathi Solution

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.
Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार
11th Marathi Digest Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार Textbook Questions and Answers

वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार स्वाध्याय  | Vandmayin lenyacha shilpkari | Maharashtra State Board 11th Marathi Solution

भाग-1
Chapter 1 मामू
Chapter 2 प्राणसई
Chapter 3 अशी पुस्तकं
Chapter 4 झाडांच्या मनात जाऊ
Chapter 5 परिमळ
Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं

 भाग-२

Chapter 7 ‘माणूस’ बांधूया!
Chapter 8 ऐसीं अक्षरें रसिके
Chapter 9 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला
Chapter 10 शब्द
Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार
Chapter 12 पैंजण

भाग-३ साहित्यप्रकार

Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय
Bhag 3.1 हसवाफसवी
Bhag 3.2 ध्यानीमनी
Bhag 3.3 सुंदर मी होणार

भाग-४ उपयोजित मराठी

Bhag 4.1 सूत्रसंचालन
Bhag 4.2 मुद्रितशोधन
Bhag 4.3 अनुवाद
Bhag 4.4 अनुदिनी (ब्लॉग) लेखन
Bhag 4.5 रेडिओजॉकी

भाग-५ व्याकरण

Bhag 5.1 शब्दशक्ती
Bhag 5.2 काव्यगुण
Bhag 5.3 वाक्यसंश्लेषण
Bhag 5.4 काळ
Bhag 5.5 शब्दभेद

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post