अहवाल लेखन - Maharashtra State Class 12 | Ahaval Lekhan Marathi

अहवाल लेखन - Ahaval Lekhan Marathi 

विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत अहवाल लेखन बारावीची सर्व प्रश्न उत्तर आणि तसेच अहवाल लेखन म्हणजे काय अहवाल लेखनाचा नमुना अहवाल लेखन कसे करायचे अहवाल लेखन करत असताना घ्यावयाची काळजी या सर्व बाबी आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण पूर्ण करणार आहोत तरी आपल्यालाही अहवाल लेखन मराठी ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चला तर पाहूया अहवाल लेखन म्हणजे काय 

अहवाल लेखन -Maharashtra State Class 12 | Ahaval Lekhan Marathi

अहवाल लेखन - Ahaval Lekhan Marathi 

कृती | Q 1 | Page 103
1) अहवालाचे स्वरूप स्पष्ट करा.
SOLUTION
कोणत्याही संस्थेच्या कार्यक्रम/सभांची योग्य पद्धतीने सविस्तर नोंद करून ठेवणे म्हणजे अहवाललेखन होय. कार्यक्रम/ समारंभाच्या प्रत्यक्ष सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत सर्व बाबींच्या नोंदी अहवालात केलेल्या असतात. अहवालात कार्यक्रमाचा हेतू, तारीख, वेळ, सहभागी व्यक्ती, विचार मांडणी, प्रतिसाद इत्यादी मुद्द्यांचा समावेश केलेला असतो. कोणत्याही संस्थेसाठी अहवाललेखन दस्तऐवज मानले जाते. संस्थेच्या भविष्यकालीन नोंदींसाठी अहवाललेखन महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. संस्थेचे कार्यक्षेत्र, विषय इत्यादींनुसार अहवाललेखनाचे स्वरूप वेगवेगळे असू शकते. तसेच संस्थेच्या कार्यक्षेत्रानुसार अहवाललेखनाचा आराखडा भिन्न असू शकतो. अहवालातील नोंदी अचूक आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या असतात. अहवालाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अहवालाची विश्वसनीयता होय. अनेक गुंतागुंतीच्या समस्येत अहवालाचा पुरावा म्हणूनही वापर करता येतो. अहवाल निःपक्षपातीपणे लिहिला जातो. वास्तवदर्शी वर्णन हा अहवालाचा आत्मा असतो.

कृती | Q 2 | Page 103
2) अहवालाची आवश्यकता लिहा.
SOLUTION
अहवाल हा कोणत्याही कार्यक्रमाचा आरसा असतो. कार्यक्रमातील बारीकसारीक गोष्टींची नोंद अहवाललेखनात घेतली जाते. संस्थेच्या कामकाजात अहवाल विश्वसनीय घटक मानला जातो. संस्थेच्या कार्यक्रमाच्या सभेच्या नोंदी ठेवणे आवश्यक असते. संस्थेच्या भविष्यकालीन योजना, उपक्रम यासाठी निश्चितच याचा उपयोग केला जातो. अहवालाच्या साहाय्याने भविष्यकाळात संस्थेचा विकास, परंपरा इत्यादींची माहिती मिळवणे शक्य होते. भविष्यातील नियोजनासाठी अहवालाचा उपयोग होऊ शकतो. विविध संस्था, लघु उद्योग ते मोठमोठे उद्योगधंदे आणि ग्रामपंचायत ते महानगरपालिका अशा सर्व ठिकाणी होणाऱ्या घडामोडींना अधिकृतता प्राप्त व्हावी यासाठी अहवालाची गरज असते. एखाद्या क्षेत्रात महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करायचा असेल, तर आरंभी त्यासंदर्भात योग्य ती माहिती घेऊन अहवाल तयार करणे गरजेचे असते.

कृती | Q 3 | Page 103
3) वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे, हे विधान स्पष्ट करा.
SOLUTION
अहवालात कार्यक्रमातील घटनांची विश्वसनीय नोंद असते. संस्थेच्या सभा/कार्यक्रमांचा हेतू, तारीख, वेळ, सहभागी मान्यवरांचे विवेचन, प्रतिसाद, समारोप इत्यादींचा तपशील क्रमाक्रमाने अहवालात सांगितलेला असतो. 'जसे घडले तसे सांगितले' असे अहवालाचे स्वरूप असते. काल्पनिक गोष्टी, लेखकाच्या मनातील विचार या बाबींचा अहवालात समावेश नसतो. वस्तुनिष्ठपणे घटनेचे वर्णन अहवालात केलेले असते. अहवाल कुठल्याही संस्थेचा असो वा कुठल्याही कार्यक्रमाचा सर्वांमध्ये एकसामायिक वैशिष्ट्य असते ते म्हणजे, निःपक्षपातीपणा. अहवाललेखकाला स्वतःच्या मर्जीनुसार लेखन करता येत नाही. त्या त्या सभेमध्ये, संशोधनामध्ये अहवाल लेखकाने काय अनुभव, पाहिले, ऐकले यांविषयीचे खरेखुरे लेखन अहवालात करणे आवश्यक असते. अहवालावर संस्थेच्या भविष्यातील नियोजनाचा आराखडा निश्चित होत असतो. सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी अहवालाचा उपयोग होत असतो. वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.

अहवाललेखनाची वैशिष्ट्ये पुढील मुद्द्यांना अनुसरून स्पष्ट करा:

कृती | Q 4.1 | Page 103
1) वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता.
SOLUTION
एखाद्या घटना/प्रसंगाची योग्य पद्धतीने नोंद करून ठेवणे म्हणजे अहवाल होय. अहवाललेखनात संस्थेच्या कामकाजाचे प्रतिबिंब उमटत असते. भविष्यातील निरनिराळ्या योजनांच्या नियोजनासाठी अहवाल आवश्यक असतो. अहवालाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता आहे. अहवालाच्या स्वरूपानुसार कार्यक्रमाचा विषय, तारीख, वेळ, ठिकाण, सहभागी मान्यवर, लोकांचा सहभाग, प्रतिसाद, निष्कर्ष, सांख्यिकीय माहिती इत्यादी अनेक बाबींच्या नोंदी केलेल्या असतात. त्या नोंदी वस्तुनिष्ठ असणे आवश्यक असते. अहवालात नोंदवलेल्या माहितीच्या बाबतीत संदिग्धता असून चालत नाही. अहवालातील वाक्यरचना स्पष्ट असणे आवश्यक असते. सहज अर्थबोध होणे अभिप्रेत असते. माहितीचे स्वरूप सुस्पष्ट असावे. अहवाललेखकाला स्वतःच्या विचारांचा परामर्श अहवालात घेता येत नाही. कार्यक्रम प्रसंगी जे जे घडले आणि जे जे पाहिले, ऐकले त्याचे खरे रूप अहवालात येणे प्रधान असते.

2) शब्दमर्यादा.
SOLUTION
अहवालाच्या विषयावर अहवालाची शब्दमर्यादा अवलंबून असते. स्थानिक पातळीवरील अहवाल आकाराने लहान असतात, शब्दमर्यादा आटोपशीर असते. सहकारी संस्था, वार्षिक सर्वसाधारण सभा यांचे अहवाल तुलनेने विस्तृत असतात. साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे अहवालाची शब्दमर्यादा कमी असते. कार्यक्रमाचा संपूर्ण गाभा अहवालात मांडायचा असल्याने शब्दमर्यादा हा घटक महत्त्वाचा मानला जातो. अहवालात कार्यक्रमातील घटनांचे वर्णन पाल्हाळीक असू नये. एकाच मुद्द्याची पुनरावृत्ती असू नये. एखाद्या समस्येच्या संदर्भात संशोधनात्मक अहवाल, सार्वजनिक क्षेत्रातील उदयोगव्यवसाय यांच्या संदर्भातील अहवाल खूपच विस्ताराने लिहिले जातात. अशा अहवालात भरपूर माहिती, आकडेवारी, निरीक्षणे, तपशील, निष्कर्ष नोंदवलेले असतात. एखाद्या समारंभाचा अहवाल तीन-चार पृष्ठांचा असू शकतो, तर एखाद्या आयोगाचा अहवाल सुमारे १००० किंवा अधिक पृष्ठांचा असू शकतो.

3)  नि:पक्षपातीपणा.
SOLUTION
कोणत्याही अहवालाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नि:पक्षपातीपणा होतो. अहवाल लेखन कुठल्याही एककल्ली विचारांचा अवलंब करीत नसते. अवास्तव व्यक्ती/घटना यांच्या वर्णनाला अहवालात स्थान नसते. अहवाल घडलेल्या कार्यक्रमाचा आरसा असतो. त्यामुळे अहवालात कुठल्याही अतार्किक, कल्पनारम्य गोष्टींना स्थान नसते. अहवाललेखकाला स्वतःच्या विचारांचे रोपण अहवालात करता येत नाही. वास्तवदर्शी लेखन हे अहवालाचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. निःपक्षपातीपणा अहवालात केंद्रस्थानी असतो.

कृती | Q 5 | Page 103
1) अहवाललेखन करताना लक्षात घ्यावयाच्या दोन बाबी सोदाहरण स्पष्ट करा.
SOLUTION
अहवाल लेखन ही एक कला आहे. अहवाल लेखन तांत्रिकपणे करणे आवश्यक असले, तरी अहवालाच्या भाषेत लालित्यपूर्णता आणता येऊ शकते. अहवाललेखनात दोन महत्त्वपूर्ण बाबींचा विचार विस्तृतपणे करता येऊ शकतो.
(१) अहवाललेखकाचे भाषेवरील प्रभुत्व : अहवाललेखकाचे भाषेवर प्रभुत्व असणे महत्त्वाचे असते. अहवालात घडून गेलेल्या घटनेचे शब्दरूपात सजीव आणि बोलके चित्र उभे करण्याची कला अहवाललेखकाकडे असणे आवश्यक असते. अहवाल सादर केला जातो; त्यामुळे वाचन करणाऱ्या व्यक्तीलाही तेवढेच महत्त्व आहे. वाचक लक्षात घेऊन अहवालाची भाषा सहज, सोपी चटकन आशय लक्षात येईल अशी असावी. अतिशयोक्तीपूर्ण वर्णन नसावे. अहवाललेखकाला विशिष्ट पारिभाषिक शब्द, संज्ञा इत्यादींची माहिती असली पाहिजे व योग्य ठिकाणी तिचा उपयोग करता आला पाहिजे.
उदा., अहवाललेखनात भाषेतील शब्दांचे संदर्भानुसार उपयोजन माहीत नसेल, तर मजकुराचा अर्थ भेद होऊ शकतो. एखाद्या कार्यक्रमाच्या अहवालात 'प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित राहून शोभा वाढवली' या वाक्यरचना ऐवजी 'प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित राहून शोभा केली' अशी वाक्यरचना जर लिहिली गेली, तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो.
(२) सारांश रूप : अहवाल हा कार्यक्रमाचा गाभा असतो. कार्यक्रम झाल्यानंतर संपूर्ण कार्यक्रम संक्षिप्तपणे कागदावर अहवालाच्या माध्यमातून चित्रित केला जात असतो. सर्व घटना/प्रसंग शब्दांत मांडणे शक्य नसते. कार्यक्रम प्रसंगी घडलेल्या घटनांचा क्रमबद्धरीतीने सारांश रूपाने आढावा घेण्याचे काम अहवाल करीत असतो. अहवाललेखनात पाल्हाळ असता कामा नये. मोजक्या परंतु नेमक्या घटनांची समर्पक शब्दांत मांडणी करता येणे अपेक्षित असते.
उदा., महाविद्यालयातील वक्तृत्व स्पर्धेच्या अहवाललेखनात पारितोषिक प्राप्त विदयार्थ्यांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे नावासहित उद्धृत करणे अपेक्षित असते. सर्व विद्यार्थ्यांचे संपूर्ण भाषण नमूद करणे योग्य नाही. सारांश रूपाने विषय मांडणी करणे अभिप्रेत असते.

पुढील विषयांवर अहवालाचे लेखन करा :

कृती | Q 6.1 | Page 103
1) तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील स्नेहसंमेलन.
SOLUTION
चेतना कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय
नागपूर
वार्षिक स्नेहसंमेलन २०१९ - २०२०
अहवाल
 शनिवार, दिनांक ४ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात सन २०१९ - २०२० या शैक्षणिक वर्षाचे वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात संपन्न झाले. समारंभाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. गणेश दिघे यांनी भूषवले होते. सुप्रसिद्ध डबिंग कलाकार श्रीमती कार्तिकी दाते या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. स्नेहसंमेलनास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व अध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचा आरंभ 'तू बुद्धी दे, तू तेज दे' या प्रार्थनेने करण्यात आला. कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावी विज्ञान शाखेतील मोहिनी काळे या विद्यार्थिनीच्या सुमधुर गीताने सर्वांची मने जिंकली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर प्रा. कुमार दाढे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. समारंभात सादर होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा त्यांनी सांगितली. प्रा. दीप्ती राणे यांनी उपस्थित मान्यवरांचे शाल आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले.
सर्वांच्या सत्कारानंतर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश देशपांडे यांनी सन २०१९ - २०२० या शैक्षणिक वर्षातील कनिष्ठ महाविद्यालयात झालेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक, कला क्रीडाविषयक घडामोडींचा थोडक्यात आढावा घेतला. सर्व अध्यापकांच्या कामाचे आणि विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक केले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या अकरावी (अ) मधील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व शाखांमधील निवडक विद्यार्थ्यांना मिळून राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित नाटिका सादर केली. लागोपाठ समूह नृत्य आणि एकल गीत गायन मिळून चार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुप्रसिद्ध डबिंग कलाकार श्रीमती कार्तिकी दाते यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. डबिंग क्षेत्रातील संधी समजावून सांगितल्या. संभाषण कौशल्यासोबत वाचनाचे महत्त्वही सांगितले. प्रात्यक्षिकांच्या साहाय्याने आवाजातील वैविध्य विद्यार्थ्यांना दाखवले. यानंतर उच्च माध्यमिक परीक्षेत सर्वांत अधिक गुण मिळवून यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कारकरण्यात आला. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये महाविदयालयाची नाममुद्रा उमटवणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन कौतुक करण्यात आले होते. वादविवाद, कवितावाचन, वक्तृत्व, निबंध, टी-शर्ट पेंटिंग या स्पर्धांची पारितोषिके अनुक्रमे वितरीत करण्यात आली. दरवर्षी स्नेहसंमेलनात सर्वांच्या उत्सुकतेचा विषय म्हणजे कनिष्ठ महाविद्यालयाचा 'आदर्श विद्यार्थी पुरस्कार'. बारावी (अ) कला शाखेच्या कपिल बोरसे या विद्यार्थ्यांना २०१९ - २०२० या वर्षातील 'आदर्श विद्यार्थी पुरस्कार' देण्यात आला. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले.

अध्यक्षीय भाषणात मा. श्री. गणेश दिघे यांनी अध्यक्षीय भाषणात आपल्या महाविद्यालयीन जीवनातील विविध प्रसंगांना उजाळा दिला. शिक्षकांची विद्यार्थ्यांप्रत असणारी मायेची भावना सांगितली. सामाजिक कार्यातील अनेक उदाहरणे सांगून विद्यार्थ्यांना सदय सामाजिक प्रश्नांची जाणीव करून दिली. पारितोषिक प्राप्त करणाऱ्या सर्व विद्यार्थांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पारितोषिक प्राप्त विदयार्थ्यांच्या यादीचे वाचन विद्यार्थी प्रतिनिधी मंदार भावे आणि अश्विनी भोसले यांनी केले. प्रा. माणिक कढे यांनी सर्वांचे आभार मानले. तीन तास रंगलेल्या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

प्रा. दीप्ती राणे
अर्थशास्त्र विभागप्रमुख

दि. ………   सचिव    अध्यक्ष


2) तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील वृक्षारोपण कार्यक्रम.
SOLUTION
नालंदा शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालय आणि कला, विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय नांदेड

जागतिक पर्यावरण दिन : वृक्षारोपण कार्यक्रम
अहवाल
दरवर्षीप्रमाणे यंदाही 'जागतिक पर्यावरण दिन बुधवार दि. ५ जून २०२० रोजी सकाळी आठ वाजता महाविद्यालयात साजरा करण्यात आला. यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कनिष्ठ महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या मागच्या बाजूस असणाऱ्या पटांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. 
वृक्षारोपण कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शीतल देवस्थळी यांनी अध्यक्षस्थान भूषवले. शहरातील पर्यावरण प्रेमी आणि निवृत्त प्रशासकीय अधिकारी मा. श्री. अर्जुन नवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कनिष्ठ महाविदयालयातील अध्यापक, शहरातील निमंत्रित नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या 'गुलाब' फुलाच्या रोपाला पाणी देऊन कार्यक्रमाला आरंभ करण्यात आला. महाविद्यालयाचे जीवशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. अनिल राऊत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व प्रास्ताविकात नमूद केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आकाश परांजपे यांनी प्रमुख पाहुण्यांना शाल आणि तुळसीचे रोप देऊन स्वागत केले. बारावी कला शाखेची विद्यार्थी मृण्मयी बडे हीने प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.

यानंतर प्रमुख पाहुणे मा. श्री. अर्जुन नवले यांनी विदयार्थ्यांशी संवाद साधला. सर्वप्रथम त्यांनी उपस्थितांना पर्यावरण दिनाची माहिती सांगितली. वेगवेगळ्या वृक्षांची नावे, उपयोग सांगितले. वृक्षांचे पर्यावरणातील महत्त्व ऐकताना उपस्थित श्रोते भारावून गेले

अहवाल लेखन - Ahaval Lekhan Marathi 

± प्रास्ताविक
शाळा-महाविद्यालयांमध्येवक्तृत्वस्पर्धा, क्रीडास्पर्धा, स्नेहसंमेलने असे अनेक कार्यक्रम संपन्न होत असतात.  तसेच शासकीय, सामाजिक, आर्थिक संस्थांचेही कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमानंतर त्यांचे अहवाल लिहिले  जातात. असे अहवाल भविष्यकाळात विविध प्रकारे उपयुक्त ठरतात. अहवालामुळे वाचकाला समारंभाचा,  कार्यक्रमाचा तपशील माहीत होतो. म्हणूनच अहवाल म्हणजे काय, अहवालाची आवश्यकता का असते, अहवालाचा  आराखडा कसा असतो, अहवाल लिहिताना कोणती काळजी घ्यावी इत्यादी संबंधीची माहिती आपणाला असायला  हवी. त्यामुळे अहवालाचे वाचन आणि लेखन करणे सुलभ होते.

± स्वरूप
एखाद्या कार्यालयात, संस्थेत झालेल्या कार्यक्रमांची, समारंभाची योग्य पद्धतीने नोंद करून ठेवणे म्हणजे  ‘अहवाल लेखन’ होय. ही नोंद करताना त्यात कार्यक्रमाचा हेतू, तारीख, वेळ, सहभागी व्यक्ती, प्रतिसाद, समारोप  अशा विविध मुद्‌द्यांचा समावेश केलेला असतो. कार्यक्रम, समारंभ प्रत्यक्षात सुरू झाल्यापासून ते थेट तो समारंभ,  कार्यक्रम संपेपर्यंत क्रमाक्रमाने कसा पूर्ण होत गेला याची आवश्यक तेवढ्या तपशिलांसह लेखी नोंद अहवालात केली  जाते. 
एखाद्या विषयातील समस्येच्या संबंधाने माहितीच्या संकलनाचे, सर्वेक्षणाचे, विशिष्ट विषयासंबंधी नेमलेल्या आयोगाचे अहवाल असतात. तसेच प्रगती अहवाल (प्रोग्रेस रिपोर्ट), तपासणी अहवाल (इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट),  चौकशी अहवाल, आढावा अहवाल, मासिक अहवाल आणि वार्षिक अहवाल अशा स्वरूपाचे अनेकविध अहवाल  असतात.

± आवश्यकता
कार्यक्रमांच्या, समारंभांच्या नोंदी ठेवल्या नाहीत तर भविष्यकाळात संस्थेचा विकास, परंपरा इत्यादींची माहिती  मिळवण्यात अडचणी येतात. तसे होऊ नये यासाठी अहवाल लिहिणे आवश्यक ठरते. भविष्यकालीन नियोजनासाठीही  अहवाल आवश्यक असतात. विविध संस्था, लघुउद्योग ते मोठमोठे उद्योगधंदे अाणि ग्रामपंचायत ते महानगरपालिका  अशा सर्व ठिकाणी होणाऱ्या घडामोडींना अधिकृतता प्राप्त व्हावी यासाठी अहवालाची गरज असते. एखाद्या समस्येच्या संदर्भात योग्य निर्णय घ्यायचा असेल, सार्वजनिक क्षेत्रात एखादा महत्त्वाकांक्षी उद्योग किंवा उपक्रम सुरू  करायचा असेल तर अगोदर त्या संदर्भात योग्य ती माहिती घेऊन अहवाल तयार करणे आवश्यक असते. 

± अहवालाचा आराखडा
अहवाल नेमका कशाचा लिहायचा आहे यावर त्या अहवालाचा आराखडा अवलंबून असतो. एखाद्या संस्थेचे  कार्यक्षेत्र, विषय इत्यादींनुसार अहवालाच्या आराखड्याचे मुद्दे बदलतात. महाविद्यालयातील एखाद्या वक्तृत्व स्पर्धेचा अहवाल आणि क्रीडास्पर्धेचा अहवाल यांच्या आराखड्यातील मुद्दे वेगवेगळे असू शकतात. कारण स्पर्धांचे  स्वरूप वेगळे वेगळे असते.  विषयाच्या स्वरूपानुसार अहवालांचे लेखन, त्यांची रचना, त्यांचे घटक, मुद्दे, क्रम, म्हणजे एकूणच आराखडा  काही प्रमाणात वेगळा असतो.

± अहवालाची प्रमुख चार अंगे 
(१) प्रास्ताविक (अहवालाचा प्रारंभ)
(२) अहवालाचा मध्य (विस्तार)
(३) अहवालाचा शेवट (समारोप)
(४) अहवालाची भाषा 
एक नमुना म्हणून आपण एका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अहवाल लेखनाचा आराखडा नेमका कसा असू  शकेल, ते मुद्‌द्यांच्या स्वरूपात पाहूया.  अहवालाचा विषय : ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ समारोप समारंभाचा अहवाल. या पंधरवड्यात आयोजित  केलेल्या विविध उपक्रमांचा एकत्रित अहवाल लिहावा.

(१) प्रास्ताविक- इथे खालील बाबींचा (मुद्दे, विषय) समावेश असणे अपेक्षित आहे. समारंभाचा विषय,  समारंभाचे स्थळ, दिनांक, वार, वेळ, स्वरूप, अध्यक्षांचे नाव-पद, प्रमुख पाहुण्यांचे नाव-पद. समारंभाच्या आयोजकांचे नाव-पद, अन्य उपस्थितांचा उल्लेख. या सर्वांचे शाब्दिक स्वागत. दीपप्रज्वलन प्रतिमापूजन/ ईशस्तवन/स्वागतगीत यांचाही उल्लेख प्रास्ताविकात केला जातो. 

(२) मध्य- मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा हेतू, पंधरवड्याचे नियोजन, कोणाकोणाचा सहभाग होता, नेमके  कोणकोणते उपक्रम झाले, त्या उपक्रमांचे फलित काय मिळाले, या संदर्भात पुढील योजना, नियोजन काय  असणार आहे, यांबाबत क्रमबद्ध, मुद्देसूद विवेचन करणे अपेक्षित असते. संबंधित कार्यक्रमात सहभागी  झालेल्या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे मनोगतही इथे लिहिणे अपेक्षित असते. प्रमुख पाहुण्यांचे विचार,  अध्यक्षांचे भाषण, निवडक दोन-तीन उपक्रमांच्या सादरीकरणावरील भाष्य, पारितोषक वितरण समारंभ  यांचा उल्लेख अपेक्षित असतो. 

(३) समारोप- मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा हेतू कितपत साध्य झाला हे लोकांच्या प्रतिसादावरून  आजमावून त्याचा उल्लेख अहवालात करावा.  याचप्रमाणे कोणत्याही कार्यक्रमातील उल्लेखनीय बाबी, त्रुटी आणि यशस्विता यासंबंधीचा  निष्कर्षाच्या स्वरूपातील अभिप्राय समारोपात नोंदवून अहवाल पूर्ण करणे अपेक्षित असते.

(४) अहवालाची भाषा- मराठी भाषेचे स्थान, महत्त्व, सद्यःस्थिती याबाबतीत या पंधरवड्यात आयोजित  केलेले उपक्रम आणि कार्यक्रम यांना अनुसरून योग्य त्या औपचारिक भाषेत अहवाल लिहावा.  संस्थेचे कार्यक्षेत्र, विषय, कार्यक्रमाचे स्वरूप इत्यादींनुसार अहवालात विशिष्ट संज्ञा, पारिभाषिक  शब्दयोजना करावी लागते. त्यानुसार त्या-त्या क्षेत्रातील अहवालाची ठरावीक भाषा विकसित झालेली  असते. अशा ठरावीक भाषेचा वापर अहवाल लेखन करताना केला जातो. 

± अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये
(१) वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता- अहवालाच्या स्वरूपानुसार त्यामध्ये तारीख, वार, वेळ, ठिकाण,   सहभाग घेणाऱ्यांची नावे, पदे, घटना, हेतू, संख्यात्मक माहिती, निष्कर्ष इत्यादी अनेक महत्त्वाच्या वस्तुनिष्ठ बाबींच्या नोंदी आवर्जून आणि अचूकतेने केलेल्या असतात. त्या नोंदी पूर्णत: सुस्पष्ट असतात. 

(२) विश्वसनीयता- अहवालातील विश्वासार्ह माहिती आणि तथ्यांच्या नोंदीमुळे अहवालाला विश्वसनीयता  प्राप्त होते. या विश्वसनीयतेमुळेच अनेकदा गुंतागुंतीच्या समस्यांमध्ये असे अहवाल पुरावा म्हणूनही  वापरले जातात. हे त्या अहवालांचे खास वैशिष्ट्य असू शकते. 

(३) सोपेपणा- शक्यतोवर सर्वसामान्य व्यक्तीलाही अहवालाचा आशय समजावा अशी अपेक्षा असते. हे  गृहीत धरून जेव्हा अहवाल लिहिला जातो तेव्हा साहजिकच त्याची भाषा ही सोपी असते. गरज नसेल तर त्यात बोजड शब्द, फारसे तांत्रिक शब्द वापरले जात नाहीत. विनाकारण अालंकारिक वर्णनशैली,  नाट्यपूर्णता, अतिशयोक्ती इत्यादी गोष्टी अहवालात टाळल्या जातात; परंतु अहवालात त्या त्या क्षेत्राशी  संबंधित संज्ञा, प्रक्रिया याविषयीचे पारिभाषिक शब्द वापरले जातात.

(४) शब्दमर्यादा- अहवालाच्या विषयावर/स्वरूपावर अहवालाची शब्दमर्यादा अवलंबून असते. सांस्कृतिक,  साहित्यिक, क्रीडाविषयक इत्यादी प्रकारचे स्थानिक पातळीवरील अहवाल आटोपशीर असतात.  सहकारी संस्थांचे, वार्षिक सर्वसाधारण सभांचे अहवाल तुलनेने विस्तृत असतात. त्यांचे स्वरूप निश्चित  असते.
एखाद्या समस्येच्या/उपक्रमाच्या संदर्भात संशोधनात्मक अहवाल, सार्वजनिक क्षेत्रातील  उद्योगव्यवसाय, सार्वजनिक सेवा (शहरातील बस वाहतूक) यांच्यासंदर्भातील अहवाल खूपच विस्ताराने  लिहिले जातात. त्यात भरपूर माहिती, आकडेवारी, निरीक्षणे, तपशील, निष्कर्ष नांेदवलेले असतात.  एखाद्या समारंभाचा अहवाल तीन-चार पृष्ठांचा असतो, तर एखाद्या आयोगाचा अहवाल सुमारे १०००  किंवा अधिक पृष्ठांचा असू शकतो.

(५) नि:पक्षपातीपणा- अहवालाचा विषय कोणताही असो, प्रकार कुठलाही असो सर्वच प्रकारच्या अहवालांचे एक सामाईक वैशिष्ट्य म्हणजे त्या अहवालाचा नि:पक्षपातीपणा. अहवाल लेखकाला  संबंधित विषयाला बाध आणणारी स्वत:ची एकांगी मते, एककल्ली विचार अहवालात आणता येत  नाहीत. स्वत:च्या मर्जीनुसार अहवाल लेखन करता येत नाही. वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे. त्या त्या समारंभामध्ये, सभेमध्ये, संशोधनामध्ये अहवाल लेखकाने काय काय अनुभवले, पाहिले,  ऐकले याविषयीचे खरेखुरे लेखन अहवालात आलेले असते.

± अहवाल लेखन करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी
अहवाल लेखन हा जरी एखादा लालित्यपूर्ण साहित्यप्रकार नसला तरी अहवाल लेखन ही एक कला आहे.  शिक्षणाच्या संदर्भात सुप्रसिद्ध कोठारी कमिशनच्या अहवालातील पहिलेच वाक्य ‘द डेस्टिनी ऑफ इंडिया इज बीईंग  शेप्ड्‌ इन हर क्लासरूम्स!’ (भारताच्या भवितव्याची जडणघडण शाळांमधील वर्गखोल्यांमध्ये होत आहे!) असे आहे.  अशा प्रकारची लालित्यपूर्ण, मार्गदर्शक व प्रेरक वाक्ये, विचार यांमुळे अहवाल लेखनाला लालित्याचा स्पर्श होतो.  गरजेनुसार त्यांचा उपयोग करता येतो.  

अहवाल लेखन करताना पुढील बाबी विचारात घ्याव्यात.

(१) अहवाल लिहिणाऱ्या व्यक्तीला संबंधित विषयाची चांगली जाण हवी. 
(२) जे घडले, जसे घडले त्यावर आधारित अहवाल लेखन करता आले पाहिजे.
(३) अहवाल लेखनासाठी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक असते. विशेषत: सांस्कृतिक कार्यक्रमांचे अहवाल  लेखन करताना बोलके आणि सजीव चित्र उभे करता आले पाहिजे, तर संशोधनात्मक स्वरूपाच्या अहवालात योग्य पारिभाषिक शब्दावली आणि वस्तुनिष्ठता महत्त्वाची असते.
(४) सारांशरूपाने संक्षिप्त लेखन करता आले पाहिजे.
(५) सहज, सोपी, स्वाभाविक लेखनशैली असावी. अति आलंकारिक, नाट्यपूर्ण, अतिशयोक्तिपूर्ण वर्णन  नसावे.
(६) व्यक्तींची नावे, व्यक्तींची पदे चुकीची दिली जाऊ नयेत. तसेच घटनाक्रमही चुकवू नये. अहवाल लिहिताना  आवश्यक त्या तांत्रिक गोष्टींचा (मथळा, तारीख, वेळ, स्थळ, प्रमुख पाहुणे, अध्यक्ष, नावे, पदे इत्यादी) 
विसर पडता कामा नये.
(७) अहवालाच्या विषयाचे स्वरूप, वेगळेपण, वैशिष्ट्य बारकाव्याने टिपता आले पाहिजे. यासाठी अहवाल 
लेखकाकडे सूक्ष्म आकलन आणि निरीक्षणशक्ती असली पाहिजे.
(८) अहवाल लेखनात विषयाला विसंगत असलेले स्वमत, स्व-विचार लिहू नयेत.
(९) अहवाल हा संबंधित कार्यक्रम आणि विषयाच्या स्वरूपानुसार लिहिलेला असावा. तो अपुरा, अर्धवट,  विस्कळीत असू नये. 
(१०) अहवाल लिहून झाल्यानंतर त्याखाली संबंधित अध्यक्ष आणि सचिव यांची मान्यतेस्तव स्वाक्षरी केलेली 
असावी.

± समारोप
अहवाल हे त्या-त्या संस्थेतील कार्यक्रमांचे महत्त्वाचे दस्तऐवज असतात. म्हणून त्यांचे लेखन योग्य ती दक्षता  घेऊनच करावे लागते. संस्था, कार्यालयाच्या कार्याचा दीर्घकालीन आढावा घेण्यासाठीही त्यांचा उपयोग होतो.  त्यामुळे ते जतन करून ठेवावे लागतात.

अहवाल लेखन - Ahaval Lekhan Marathi 

अहवाल लेखनाचा नमुना
भारत शिक्षण संस्थेचे, साने गुरुजी माध्यमिक विद्यालय आणि कला, वाणिज्य, विज्ञान उच्च  माध्यमिक विद्यालय, भुसावळ, जिल्हा जळगाव वार्षिक पारितोषक वितरण समारंभ सन २०१९-२० अहवाल गुरुवार, दिनांक १२ डिसेंबर २०१९ रोजी दुपारी चार वाजता विद्यालयाच्या भव्य प्रांगणात सन २०१९-२० या  शैक्षणिक वर्षाचा वार्षिक पारितोषक वितरण समारंभ मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला.  समारंभाचे अध्यक्षस्थान जिल्ह्यातील शिक्षणप्रेमी उद्योगपती मा. श्री. बाबासाहेब शिंगाडे यांनी भूषवले होते.  मुंबई येथील नामवंत लेखिका श्रीमती हेमाताई रणपिसे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. समारंभास भारत  शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, खजिनदार व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व अध्यापक, निमंत्रित नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारंभाच्या सुरुवातीला प्रा. लक्ष्मण जाधव यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी समारंभात संपन्न होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली. त्यानंतर प्रा. माधवी कुलकर्णी यांनी समारंभास उपस्थित असलेल्या सर्वांचे स्वागत  केले. स्वागतगीताच्या माध्यमातून इयत्ता बारावी कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे संगीतमय स्वागत केले.  स्वागतगीतानंतर इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे सेवक समीर सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.  उपस्थित पाहुण्यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या हृद्य सत्कारानंतर विद्यालयाचे प्राचार्य विद्यानंद सोनटक्के यांनी सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात उच्च माध्यमिक विद्यालयात  झालेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडाविषयीच्या घडामोडींचा वृत्तान्त सादर केला. यावेळी त्यांनी उच्च माध्यमिक विद्यालयातील अध्यापक आणि विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आढावा सादर केला. 

यानंतर मैदानी क्रीडास्पर्धा, सर्वोत्कृष्ट विद्यार्थी खेळाडू, सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी खेळाडू, सर्वोत्तम संघ तसेच  सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धांची पारितोषके वितरित करण्यात आली. या वर्षाची सर्वोत्तम सांघिक कौशल्याची  ढाल बारावीच्या कबड्डीच्या संघाने पटकावली, तर सर्वोत्तम खेळाडूच्या सुवर्ण चषकावर अकरावीच्या भारती शहा  या विद्यार्थिनीचे नाव कोरले गेले. क्रीडा स्पर्धांच्या पाठोपाठ वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा इत्यादी विविध  स्पर्धांची पारितोषके वितरित करण्यात आली. सलग अर्धा तास चाललेल्या पारितोषक वितरण समारंभात सुवर्ण,  रौप्य, कांस्य अशी एकूण वीस सांघिक, चाळीस वैयक्तिक तसेच इतर विभागांची पंधरा अशी एकूण पंचाहत्तर  पारितोषके देण्यात आली. ढोल, ताशा आणि लेझीमच्या तालावर पारितोषक प्राप्त विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्या माननीय हेमाताई रणपिसे आणि अध्यक्ष बाबासाहेब शिंगाडे यांच्या हस्ते पारितोषके स्वीकारली. पारितोषक वितरणानंतर माननीय हेमाताईंनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्या म्हणाल्या,  ‘काळ झपाट्याने बदलतो आहे. सर्वक्षेत्रांत स्पर्धा तीव्र झाली आहे. अशा वेळी परीक्षेतल्या गुणांबरोबरच आता  तुमचे व्यक्तिमत्त्व, वर्तन, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, संवाद कौशल्य, नेतृत्वगुण, संवेदनशीलता या गोष्टींनाही  खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. उत्तुंग यश मिळवण्यासाठी तुमच्याजवळ प्रबळ आत्मविश्वासाचे पाठबळ असले  पाहिजे.’’  आपल्या अध्यक्षीय भाषणात मा. बाबासाहेब शिंगाडे यांनी त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील संघर्षयात्रा विद्यार्थ्यांपुढे उलगडून दाखवली. त्यानंतर ते म्हणाले, ‘‘तुम्ही सातत्याने प्रयत्न करत राहा. कितीही प्रतिकूल  परिस्थितीशी झगडावे लागले तरी संघर्ष करा. कृतिवंत व्हा. धडपडे व्हा. ‘केल्याने होत आहे रे’ हा मंत्र सतत  आचरणात आणा, मग तुम्ही विजयश्री नक्कीच खेचून आणाल. देशाचे उत्तम नागरिक व्हा. स्वतःबरोबर आपले  मातापिता, गुरुजन आणि देशाचे नाव उज्ज्वल करा.’’  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पारितोषकप्राप्त विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन विद्यार्थी प्रतिनिधी माधवी परांजपे  आणि महेश देशमुख यांनी केले. आभारप्रदर्शन संस्कृत विभागाचे प्रा. देशमाने यांनी केले.  अडीच तास रंगलेल्या या कार्यक्रमाची सांगता सायंकाळी साडेसहा वाजता झाली.
दि. ............ सचिव अध्यक्ष

अनुक्रमणिका  / INDIEX

पाठ कविता स्वाध्याय LINK
01: वेगवशता Click Now
02: रोज मातीत Click Now
03: आयुष्य... आनंदाचा उत्सव Click Now
04: रे थांब जरा आषाढघना Click Now
05: वीरांना सलामी Click Now
* आत्मविश्वासासारखी शक्ती नाही Click Now
06: रंग माझा वेगळा Click Now
07: विंचू चावला Click Now
08: रेशीमबंध Click Now
09: समुद्र कोंडून पडलाय Click Now
10: दंतकथा Click Now
11: आरशातली स्त्री Click Now
12: रंगरेषा व्यंगरेषा Click Now
* जयपूर फूटचे जनक Click Now

भाग - 3

साहित्य प्रकार स्वाध्याय LINK
00: कथा-साहि त्यप्र कार-परिचय Click Now
01: शोध Click Now
02: गढी Click Now

भाग - 4

उपयोजित लेखन स्वाध्याय LINK
01: मुलाखत Click Now
02: माहितीपत्रक Click Now
03: अहवाल  Click Now
04: वृत्तलेख  Click Now

भाग - 5

व्याकरण लेखन स्वाध्याय LINK
0: व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार Click Now
0: निबंध लेखन Click Now

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post