मुलाखत - Mulakhat | Mulakhat Lekhan In Marathi | मुलाखत लेखन 12th

मुलाखत - Mulakhat | Mulakhat Lekhan In Marathi

मुलाखत - Mulakhat | Mulakhat Lekhan In Marathi | मुलाखत लेखन

खालील मुद्द्यांविषयी माहिती लिहा.
1) मुलाखतीची पूर्वतयारी.
SOLUTION
मुलाखत यशस्वी होण्यासाठी मुलाखतीच्या पूर्वतयारीची आवश्यकता असते. पूर्वतयारीमुळे मुलाखतकाराचा आत्मविश्वास ते रसिक-श्रोत्यांची कौतुकाची थाप इथपर्यंतचा मुलाखतीचा प्रवास सुकर होतो. मुलाखत त्यांचे संपूर्ण नाव, जन्मस्थळ, आवडीनिवडी, शिक्षण, कौटुंबिक माहिती, कार्यकर्तृत्व, पुरस्कार, लेखन, वैचारिक भूमिका इत्यादी आवश्यक ती सर्व माहिती मुलाखतकाराला आधीच तयार ठेवावी लागते. मुलाखतीचा विषय, उद्दिष्ट, मुलाखत ऐकणारा, बघणारा, वाचणारा वर्ग आणि मुलाखतीचा कालावधी यांचाही अभ्यास मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला करावा लागतो. मुलाखतीतील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलाखतीतील प्रश्नावली. पूर्वतयारीत विषयाला समर्पक अशी प्रश्नावली करणे आवश्यक असते. मुलाखतीचे माध्यम कोणते आहे याचाही मुलाखतीपूर्वी विचार करणे आवश्यक असते. मुलाखतकार आणि मुलाखतदाता यांची मुलाखतीपूर्वीची भेट निश्चितच मुलाखत यशस्वी करण्यात साहाय्यभूत ठरते.

2) मुलाखतीचा समारोप.
SOLUTION
बदलत्या काळात व्याख्यानाऐवजी मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्तीचे विचार ऐकण्यास रसिकांची पसंती मिळू लागली आहे. मुलाखत क्षेत्राला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. मुलाखतकाराला मुलाखत त्यांचे संपूर्ण कार्यकर्तृत्व रसिकांसमोर प्रश्नांच्या आधारे उलगडून दाखवायचे असते. मुलाखतकारासमोर हे मोठे आव्हानच असते असे म्हणता येते. मुलाखतीच्या यशस्वितेसाठी मुलाखतकाराला तीन टप्प्यांवर मुलाखतीचे विभाजन करणे आवश्यक असते. ते असे : मुलाखतीचा आरंभ, मध्य आणि समारोप. हे टप्पे रसिकांना प्रत्यक्ष जाणवू न देणे हे मुलाखतकाराच्या संभाषण कौशल्यावर अवलंबून असते. मुलाखतीचा आरंभ जेवढा आकर्षक अपेक्षित असतो, तेवढाच समारोप परिणामकारक असणे गरजेचे असते. मुलाखतीच्या समारोपाच्या टप्प्यावर प्रश्नांऐवजी ठळक वक्तव्य अपेक्षित असते. समारोपात मुलाखतकाराने मुलाखतीचा अर्क रसिकांसमोर मांडणे आवश्यक असते. हे करताना समारोपात मुलाखतीचा कालावधी लक्षात घेऊन मुलाखतकाराने मुलाखत सकारात्मक सूत्रावर सादर करणे योग्य ठरते. या टप्प्यावर मुलाखत रेंगाळू न देण्याची खबरदारी मुलाखत करायला घ्यावी लागते. मुलाखतीच्या उद्दिष्टाचे साफल्य या टप्प्यावर दिसून येते. मुलाखतकाराने या समारोपादरम्यान निवेदनासाठी थोडासा वेळ घेतला तरी चालू शकते. मुलाखतकाराचे रसिकांसोबत अविस्मरणीय संवाद या टप्प्यावर होणे आवश्यक असते. 'गोडी अपूर्णतेची' या सूत्रावर मुलाखत संपणे हे मुलाखतीच्या यशाचे श्रेय मानले जाते. 'या हृदयीचे त्या हृदयी' पोहोचले ना, हे तपासण्यासाठी मुलाखतीत समारोपाचा टप्पा वैशिष्ट्यपूर्ण असतो.

कृती (२) थोडक्यात उत्तरे लिहा

कृती (२) | Q 1 | Page 91
1) मुलाखतीचे प्रमुख हेतू तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
SOLUTION
आजचे युग संवादाचे आहे. संवादाची अनेक उद्दिष्टे बघायला मिळतात. मुलाखत हेदेखील असेच विचार विनिमयाचे एक संवादी रूप आहे. विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींचा परिचय सर्वांना व्हावा, या हेतूने मुख्यत्वे मुलाखत घेतली जाते. मुलाखतीच्या माध्यमातून अशा व्यक्तींच्या कार्यावर प्रकाश टाकणे हे प्रधान असते. सामान्यांचा असामान्य प्रवास मुलाखतीतून उलगडणे शक्य असते. कितीतरी व्यक्तींचे आयुष्य म्हणजे एक संघर्षपट असतो. हा पट जाणून घेण्याची अनेकांना इच्छा असते. यासाठी मुलाखत महत्त्वाचा मंच असतो. विचारवंतांची विविध मते, तज्ज्ञांचे विषयज्ञान जाणून घेण्यासाठी विशेषतः मुलाखतीचे आयोजन केले जाते. मुलाखतीतून विशिष्ट व्यक्तीची जडणघडण जाणून घेता येते; यासोबतच काळ, परिसर यांवरही प्रकाश टाकणे शक्य असते. मुलाखतीच्या माध्यमातून कलास्वाद घेता येतो. समाजाचे प्रबोधन करणे, जनजागृती करणे, एखादी घटना सविस्तर समजून घेणे, विविध कलांविषयी जाणून घेणे अशा अनेक हेतुपूर्ततेसाठी मुलाखत घेतली जाऊ शकते.

2) व्यक्तीमधील 'माणूस' समजून घेण्यासाठी मुलाखत असते, हे स्पष्ट करा.
SOLUTION
मुलाखतीच्या माध्यमातून मुलाखत त्याचे अंतरंग रसिक- श्रोत्यांसमोर उलगडत असते. मुलाखतीत मुलाखतदाता संघर्षमय जीवनाचा कथापट उत्तरांतून मांडत असतो. विशिष्ट ध्येय गाठत असताना वाटेत आलेल्या खाचखळग्यांचा केलेला सामना, त्या त्या वेळी दाखवलेली जिद्द अशा विविध प्रसंगांचे जणू स्मरणच मुलाखतदाता सर्वांसमक्ष करीत असतो. मुलाखतीत आपले अनुभव सांगत असताना आनंद आणि वेदना यांचे मिश्रण शब्दरूपातून अवतरत असते. मुलाखतदाता आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना, व्यक्ती, कार्य यांचा आढावा उत्तरांतून घेत असतो. थोडक्यात, व्यक्तीच्या आयुष्याचा काळपट जाणून घेणे म्हणजे व्यक्तीमधील माणूस समजून घेणे होय. मुलाखतीतून हे शक्य होते.

3) मुलाखत म्हणजे पूर्वनियोजित संवाद, हे स्पष्ट करा.
SOLUTION
मुलाखत म्हणजे संवाद. हा संवाद पूर्वनियोजित असतो. मुलाखतीतील संवाद हेतुपूर्वक घडवून आणला जातो. मुलाखतकार, मुलाखतदाता आणि मुलाखत ऐकणारे, पाहणारे वा वाचणारे रसिक श्रोते यांच्या सहभागातून मुलाखत आकाराला येत असते. स्वतःच्या क्षेत्रात महत्त्वाचा ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींचा कार्यप्रवास लोकांपर्यंत पोहोचावा हा मुलाखतीचा हेतू असतो. मुलाखत त्यांचे कार्य संघर्ष आणि जीवनसंघर्ष उलगडून दाखवण्याचे कार्य मुलाखतीत होत असते. मुलाखतकाराला प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडून दाखवण्याचे कौशल्यपूर्ण काम करायचे असते. मुलाखतकार आणि मुलाखतदाता या दोन व्यक्तींना ठरवून नियोजनपूर्वक वैचारिक, भावनिक संवाद साधावा लागतो. मुलाखतीसाठी विषय, व्यक्ती, व्यक्तींमधील संवादासाठी प्रश्नावली याचे पूर्वनियोजन करणे आवश्यक असते. यासोबतच मुलाखतीचे औचित्य, दिवस, वेळ, स्थळ, कालावधी, उपस्थित असणारा रसिक वर्ग यांचाही विचार पूर्वनियोजनात महत्त्वाचा असतो. उत्तम पूर्वनियोजन हे मुलाखतीचे अर्धे यश असते.

4) मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी लिहा.
SOLUTION
मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्तीचा जीवनप्रवास जाणून घेता येतो. दोन व्यक्तींच्या संवादाने मुलाखत फुलत असते. मुलाखतकार मुलाखतीत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. मुलाखतीत रसिकांना गुंगवून ठेवण्याचे कौशल्य मुलाखतकाराकडे असणे अपरिहार्य असते. मुलाखत घेताना काही गोष्टींचा अवलंब करणे आवश्यक असते. मुलाखत त्याला सहज, सोपे प्रश्न विचारणे गरजेचे असते. मुलाखत त्याला अधिकाधिक बोलते करण्याचा प्रयत्न मुलाखतकाराने करणे अपेक्षित असते. मुलाखतदात्याचा अवमान होईल, उत्तर देताना संभ्रमाची स्थिती निर्माण होईल असे प्रश्न टाळावेत. मुलाखतीचा हेतू लक्षात घेऊन प्रश्नावली बनवणे केव्हाही उचित ठरते. अपेक्षित उत्तर सूचित होईल असेच प्रश्नांचे स्वरूप असावे. वेळेची मर्यादा लक्षात घेऊन मुलाखत घेताना प्रश्नांची निवडही तितकीच महत्त्वाची असते. प्रश्नांची पुनरावृत्ती टाळावी. प्रश्नांची निवड करताना उपस्थित श्रोतृवर्ग लक्षात घेणे गरजेचे असते. मूळ विषय सोडून असंबद्ध प्रश्न टाळावे. ज्याद्वारे तणाव, संघर्ष निर्माण होईल असे मुद्दे उपस्थित करू नये. मुलाखत प्रवाही होईल अशा पद्धतीने संवाद साधत राहावे. मुलाखतीदरम्यान मुलाखतकाराने अनावश्यक हातवारे, हालचाली टाळाव्यात. मुलाखत नियोजित वेळेत पूर्ण करणे आवश्यक असते.

5) उमेदवार 'आतून' जाणून घेणे अत्यंत गरजेचे असते, सोदाहरण स्पष्ट करा.
SOLUTION
आधुनिक काळात दिवसेंदिवस स्पर्धा वाढत आहे. स्पर्धा जशी तंत्रज्ञानाची आहे, तशीच ती दोन व्यक्तींमध्येसुद्धा आहे. आज नोकरीसाठी तसेच विशिष्ट अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुलाखत हा महत्त्वाचा घटक मानला जातो. बदलत्या काळात मुलाखतीचे स्वरूप बदलू लागले आहे. उमेदवाराची पदवी, विषयज्ञान, भाषिक कौशल्ये यासोबतच उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व आज केंद्रस्थानी आले आहे. उमेदवार बोलतो कसा, पोशाख कसा आहे यापेक्षा स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी आवश्यक कौशल्ये उमेदवाराजवळ आहेत का याची चाचपणी केली जाते. विविध कंपन्यांमध्ये मुलाखतीदरम्यान उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू जाणून घेण्याचा प्रयत्न प्रथमतः केला जातो. कंपनीचे अपेक्षित उद्दिष्ट, कामाचे तास, सहकाऱ्यांशी असणारे मैत्रीपूर्ण संबंध, गटप्रमुख वा गटकार्याची क्षमता, कामाची विभागणी, वेळेचे बंधन, नियोजित बैठका, समूह सदस्यांचे प्रश्न, प्रसंगी करावे लागणारे समुपदेशन इत्यादी अनेक बाबी नजरेसमोर ठेवून उमेदवाराची मुलाखत घेतली जाते. सहकाऱ्यांच्या भावना, विचार, सूचना, समस्या याबद्दल उमेदवाराकडे असलेली स्वीकारार्हता आणि मार्ग काढण्याची तत्परता, विवेकबुद्धी, प्रसंगावधान अशा गोष्टींना मुलाखतीत महत्त्व दिले जाते. मुलाखतीला आलेला उमेदवार दिसतो कसा, बोलतो कसा यापेक्षा 'विचार कसा करतो याकडे अधिक लक्ष दिले जाते. उमेदवार भावनिक, वैचारिक, मानसिक पातळीवर जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. उमेदवाराच्या 'बाह्यरंगा'पेक्षा 'अंतरंग' जाणून घेणे आवश्यक असते.

6) मुलाखत ही व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाची ओळख असते, हे स्पष्ट करा.
SOLUTION
सामान्यांत असामान्य कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचे आयुष्य जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. विशिष्ट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची मुलाखत घेतली जाते. प्रश्नांच्या माध्यमातून अशा व्यक्तिमत्त्वांना बोलते करण्याची जबाबदारी मुलाखतकारावर असते. गृहिणी, विद्यार्थ्यांपासून ते डॉक्टर, वकील, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, संपादक, पत्रकार, कवी, लेखक, गिर्यारोहक, समुपदेशक, खेळाडू, तंत्रज्ञ, शेतमजूर, कामगार अशा कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीच्या कार्याचा प्रवास मुलाखतीतून जाणून घेता येतो. मुलाखतीत अशा कार्यसिद्ध व्यक्तिमत्त्वांचा जीवनप्रवास त्यांच्याच तोंडून ऐकता येतो. यशाच्या शिखरावर जाण्यासाठी भोगाव्या लागणाऱ्या यातना, संघर्ष, जिद्द, परिस्थितीशी झुंज, सोबतीचे स्नेहीजन अशा कितीतरी गोष्टींवर मुलाखतीच्या माध्यमातून प्रकाश टाकता येतो. 'जया अंगी मोठेपण तया यातना कठीण' ही ओळ काही व्यक्तींच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. अशा व्यक्तींचा जीवनप्रवास संघर्षमय असतो. हे जाणून घेण्याची इच्छा जनसामान्यांच्या मनात असते. मुलाखतीतून असा खडतर जीवनप्रवास जाणून घेता येतो. जगावेगळी आव्हाने पेलून स्वतःच्या कार्याने 'स्व' सिद्ध केलेल्या व्यक्ती मुलाखतीतून समोर येतात.

मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, ते पुढील मुद्द्यांच्या आधारे लिहा :

1)मुलाखतदात्याची वैयक्तिक माहिती.
SOLUTION
मुलाखत मुलाखतकार आणि मुलाखतदाता यांच्यात संवाद होत असतो. प्रश्नांच्या साहाय्याने मुलाखत त्याला बोलते करण्याचे कार्य मुलाखतकार करीत असतो. मुलाखतदात्याची वैयक्तिक माहिती मुलाखतकाराला मिळवावी लागते. मुलाखत त्यांचे संपूर्ण नाव, पत्ता, जन्मतारीख, शिक्षण, आवडीनिवडी, कौटुंबिक माहिती, कर्तृत्व, हुद्दा, लेखनकार्य, पुरस्कार, वैचारिक पार्श्वभूमी, वैचारिक भूमिका इत्यादींची सविस्तर माहिती मुलाखतकाराकडे असणे आवश्यक असते. या माहितीमुळे मुलाखतीतील संवाद सहज होऊ शकतो.

2) मुलाखतदात्याचे कार्य.
SOLUTION
ज्या व्यक्तींनी आपल्या क्षेत्रात अमूल्य ठसा उमटवला आहे अशा व्यक्तींची मुलाखत घेतली जाते ज्यांच्याजवळ काहीतरी 'सांगण्यासारखे' आहे आणि ज्यांच्याकडून 'ऐकण्यासारखे' काहीतरी आहे अशा व्यक्तींची मुलाखत ऐकणे लोकांनाही आवडते. मुलाखत त्यांचे कार्य हे मुलाखतीत केंद्रस्थानी असते. मुलाखतीच्या पूर्वतयारीत मुलाखतकाराला मुलाखतदात्याचे कार्यकर्तृत्व पूर्णपणे जाणून घ्यावे लागते. मुलाखत त्यांचे कार्यक्षेत्र, स्वरूप, संघर्ष, कार्यसिद्धीसाठी जिद्द अशा कितीतरी गोष्टी ची सखोल माहिती मुलाखतकाराला मिळवावी लागते. संदर्भ लक्षात घेऊन, चिंतन करणे गरजेचे असते. रसिक श्रोत्यांना, प्रेक्षकांना किंवा वाचकांना मुलाखत त्यांचे कार्य प्रवास उलगडून दाखवणे हे मुलाखतीचे प्रमुख कार्य असते. मुलाखतीच्या पूर्वतयारीत ही महत्त्वाची बाब मानली जाते.

3) मुलाखतीच्या अनुषंगाने वाचन.
SOLUTION
मुलाखत संवाद कौशल्य आहे. मुलाखतकाराचे संभाषण कौशल्यावर प्रभुत्व असणे आवश्यक असते. मुलाखत त्याच्या लेखनकृती मुलाखतकाराने वाचणे गरजेचे असते. अशा वाचनातून मुलाखत त्याची वैचारिक भूमिका स्पष्ट होते. मुलाखतकाराला या वाचनाधारे प्रश्नांची तयारी करता येणे सहज शक्य होते. केवळ मुलाखत विषयाच्या अनुषंगाने वाचन न करता मुलाखतकाराचे वाचन चौफेर असावे. साहित्यिक, सामाजिक घडामोडींचे वाचन मुलाखतकाराने सातत्याने करणे गरजेचे असते. मुलाखतीचा उद्देश लक्षात घेऊन मुलाखतकाराने वाचन करणे अपेक्षित असते. मराठी, हिंदी, इंग्रजी साहित्यातील मैलाचा दगड ठरलेल्या साहित्यकृतींचा परिचय मुलाखतकाराला असणे आवश्यक आहे. मुलाखतीच्या पूर्वतयारीत मुलाखतकारासाठी वाचन हा घटक अदृश्य परंतु महत्त्वाचा आहे.

4) प्रश्नांची निर्मिती.
SOLUTION
मुलाखतीत प्रश्नांचे स्वरूप फार महत्त्वाचे असते. मुलाखतीची पूर्वतयारी हा एकप्रकारे मुलाखतीचा गृहपाठ असतो. त्यामुळे मुलाखत त्याची सर्व आवश्यक माहिती मुलाखतकाराला मिळवावी लागते. प्रश्नांच्या साहाय्याने मुलाखतकाराकडून कार्यप्रवास अधिकाधिक जाणून घेता येईल, अशी प्रश्नांची तयारी करणे महत्त्वाचे असते. प्रश्नांची निर्मिती उपलब्ध माहितीच्या आधारे करणे गरजेचे असते. मुलाखतीत विचारायचे प्रश्न पूर्वतयारीत मुलाखतकाराला क्रमवार लिहून काढावे लागतात. प्रश्नांच्या ओघावर मुलाखतीतील संवादाचे प्रवाहीपण अवलंबून असते. मुलाखतीचे हे प्रवाहीपण लक्षात घेऊन प्रश्नांची निर्मिती करणे आवश्यक असते. प्रश्नांचे स्वरूप सहज आकलन होईल असे असावे. चुकीचे, अप्रस्तुत, भावना दुखावणारे, तणाव निर्माण करणारे, विषयाशी असंबद्ध, प्रभावहीन प्रश्न मुलाखतीत नसतील, याची काळजी पूर्वतयारीत घेणे गरजेचे असते. मुलाखतीत प्रश्नांची संख्या लक्षात घ्यावी लागते. प्रश्नांमध्ये वैविध्य असावे. कधीकधी एका प्रश्नातून दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मुलाखत दात्याकडून येऊ शकते

5) भाजीवाला.
SOLUTION
प्रश्नावली:
(१) भाजीविक्रीचा व्यवसाय किती वर्षांपासून करता?
(२) नोकरीऐवजी भाजीविक्रीचा व्यवसाय करावा असे तुम्हांला का वाटले?
(३) तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या भाज्यांची विक्री करता?
(४) दिवसाचे किती तास या व्यवसायात तुम्ही खर्च करता?
(५) भाजीविक्रीच्या व्यवसायात कुटुंबातील सदस्यांचे कशा प्रकारे सहकार्य मिळते?
(६) लोकांची वर्तणूक कशी असते?
(७) नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी (अतिवृष्टी, दुष्काळ, रोगराई इत्यादी) भाजी विक्री वर काय परिणाम होतो?
(८) भाजीविक्रीच्या व्यवसायातून दिवसभरात साधारण किती नफा मिळतो?
(९) तुमच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण कोणते?
(१०) भाजीविक्रीदरम्यान स्मरणात राहिलेला अनुभव कोणता?

6) पोस्टमन.
SOLUTION
प्रश्नावली :
(१) स्थिर जागेऐवजी सतत फिरत राहाव्या लागणाऱ्या नोकरीचा स्वीकार का केलात?
(२) लोकांच्या भावना, सुख-दुःखे बंदिस्त पाकिटातून घेऊन जाताना काय वाटते?
(३) लोक तुमची आतुरतेने वाट बघत असतात अशा वेळी तुमची काय प्रतिक्रिया असते?
(४) कामाचे स्वरूप म्हणून सतत फिरावे लागते तेव्हा शारीरिक, मानसिक थकवा जाणवतो का?
(५) आधुनिक काळात तंत्रज्ञानाने पत्राचे स्वरूप डिजिटल केले आहे, याबद्दल तुम्हांला काय वाटते?
(६) पत्र ही संकल्पना बदलत्या काळात कालबाह्य होऊ लागली आहे, तुम्हांला याचे वाईट वाटते का?
(७) तुम्ही स्वतः ई-मेल, एसएमएस यांसारख्या डिजिटल संवादाच्या साधनांचा वापर करता का?
(८) डिजिटल माध्यमाने तुमच्या कामाचा भार कमी केला असे तुम्हांला वाटते का?
(९) तुम्हांला कामाचे समाधान वाटते का?
(१०) या व्यवसायातील तुमचे कटू व सुखावणारे अनुभव कोणते आहेत?

7) परिचारिका.
SOLUTION
प्रश्नावली:
(१) व्यवसायाचे विविध पर्याय असताना परिचारिकेचा व्यवसाय का निवडला?
(२) परिचारिकेचा व्यवसाय केवळ नोकरी म्हणून स्वीकारला की सेवावृत्ती म्हणून?
(३) या व्यवसायात कार्यरत आहात त्याला किती वर्ष झाली? कामाप्रमाणे मोबदला मिळतो का?
(४) कामाच्या ठिकाणच्या सोयी कशा आहेत?
(५) काम केल्याचे समाधान मिळते का?
(६) लोकांचे सहकार्य मिळते का?
(७) लोक सन्मानाने वागवतात का?
(८) रुग्ण व नातेवाईक यांची वर्तणूक कशी असते?
(९) तुमच्या आयुष्यातील एखादा कटू तसेच आनंददायी प्रसंग कोणता?
(१०) या व्यवसायात असलेल्यांना किंवा नव्याने येऊ इच्छिणाऱ्यांना काय सल्ला देऊ इच्छिता?

मुलाखत - Mulakhat | Mulakhat Lekhan In Marathi |


प्रास्ताविक

आजच्या स्पर्धेच्या युगात जागतिकीकरणामुळे आणि व्यापारीकरणामुळे ग्राहक अधिक चौकस आणि चिकित्सक  झाले आहेत. कोणताही व्यवहार करताना आता लोकांना संबंधित व्यवहाराबद्दलची सखोल माहिती हवी असते,  बारीकसारीक तपशील हवा असतो. हा तपशील घरबसल्या, लिखित स्वरूपात मिळाला तर लोकांना ते हवेच असते. 

लोकांची ही मानसिकता आता व्यावसायिकांनी, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक व्यवहार करणाऱ्यांनी; तसेच  उत्पादक आणि विक्रेत्यांनी ओळखली आहे. या मानसिकतेचे समाधान करण्यासाठी जे काही निरनिराळे मार्ग उत्पादक, व्यावसायिक हाताळतात, त्यातलाच एक प्रभावी मार्ग आहे ‘माहितीपत्रक’.

माहितीपत्रकाचे स्वरूप

माहितीपत्रक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे परिचयात्मक पत्रक होय. माहितीपत्रक हे एक प्रकारे उत्पादने,  सेवा, संस्था लोकांपर्यंत पोहोचवण्याचे साधन आहे. नवनव्या योजनांकडे, उत्पादनांकडे, संस्थांकडे लोकांनी डोकावून  पाहावे यासाठीची ती एक खिडकी आहे. जनमत आकर्षित करण्यासाठी ते एक लिखित स्वरूपाचे जाहीर आवाहन  असते. माहितीपत्रकामुळे माहिती देणारा आणि माहिती घेणारा यांच्यात एक नाते निर्माण होण्यास मदत होते. नवीन  ग्राहक मिळवण्याची, नवीन बाजारपेठ काबीज करण्याची ती पहिली पायरी आहे. माहितीपत्रकामुळे ग्राहकाला हवी  असलेली माहिती ग्राहकाकडे सतत उपलब्ध राहू शकते. माहितीपत्रक कमी वेळात, कमी खर्चात ग्राहकांपर्यंत  घरबसल्या पोहोचवता येते. माहितीपत्रक हे अप्रत्यक्षपणे जाहिरातीचे कार्य करते. माहितीपत्रक वाचताक्षणीच  लोकांच्या मनात कुतूहल, उत्कंठा, औत्सुक्य जागे झाले, की समजावे माहितीपत्रकाचा हेतू साध्य झाला आहे. 

माहितीपत्रकाची गरज

माहितीपत्रकाची गरज सर्वत्र असते. अगदी फळफळावळ आणि भाजीपाला विक्रेत्यांपासून ते थेट लक्षावधी  रुपयांच्या आलिशान कार विक्रेत्यांपर्यंत सर्वांना माहितीपत्रकाची आवश्यकता भासतेच. दिवाळी फराळ, रेडिमेड  कपडे, साड्या, खेळणी, किराणा माल, दिवाळी अंक, पुस्तके, स्टेशनरी, हॉटेल्स, डायनिंग हॉल, मंगल कार्यालये,  फर्निचर, विद्युत उपकरणे, यंत्रसामग्री, घरगुती वापराची उपकरणे, वाहने, कारखाने, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, औषधे,  दूधदुभते, खाद्यपदार्थ इत्यादींची माहितीपत्रके पाहावयास मिळतात.  नाट्यगृहे, सिनेमागृहे, सहकारी संस्था, आर्थिक आणि शैक्षणिक संस्था, सामाजिक आणि साहित्यिक संस्था,  सांस्कृतिक आणि क्रीडासंस्था, कंपन्या, हॉस्पिटल्स, पर्यटन संस्था, एलआयसी, पोस्ट, बँका, पतपेढ्या, बचतगट  इत्यादी ठिकाणी माहितीपत्रकाची गरज असते.  कला, संगीत, छोटे मोठे अभ्यासक्रम, शेती अवजारे, बांधकाम साहित्य, प्रवासी कंपन्या, रोपवाटिका  यांसारखीच इतरही अनेकानेक क्षेत्रे आहेत. जिथे जिथे लोकमत आकर्षित करण्याची गरज असते तिथे तिथे माहितीपत्रक आवश्यक ठरते. आपले वेगळेपण, आपले वैशिष्ट्य, आपल्याकडून ग्राहकाला होणारा फायदा, या गोष्टी जिथे  अधोरेखित करायच्या असतील तिथे माहितीपत्रकाची गरज हमखास असते.

 माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये


(१) ‘माहिती’ला प्राधान्य- नावच ‘माहिती’पत्रक असल्याने माहितीपत्रकात ‘माहिती’ला सर्वांत जास्त प्राधान्य दिले जाते. ज्या हेतूने माहितीपत्रक तयार केले जाते, त्या हेतूशी सुसंगत, अचूक माहिती दिली  गेली पाहिजे. माहिती आटोपशीर, संक्षिप्त असावी. संस्थेशी संबंधित अत्यावश्यक आणि कायदेशीर  मािहती (उदा.,संस्था नोंदणी क्रमांक, संस्था नोंदणी दिनांक, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल, वेबसाइट, संस्थेचे  बोधचिन्ह, घोषवाक्य, पत्ता, पदाधिकाऱ्यांची नावे, कामकाजाची वेळ इत्यादी.) माहितीपत्रकात दिली  गेलीच पाहिजे. मुख्य म्हणजे माहितीपत्रकातील माहिती वस्तुनिष्ठ, सत्य, वास्तवच असली पाहिजे.  तिच्यात अतिशयोक्त, चुकीची माहिती असता कामा नये. माहितीपत्रकातील माहिती वाचनीयही असली  पाहिजे. तथापि त्यात माहितीचा अतिरेक नसावा.

(२) उपयुक्तता- आपले माहितीपत्रक उपयुक्त, परिणामकारक कसे होईल याचीही दक्षता घेतली पाहिजे.  वाचून झाल्यानंतर ते चुरगाळून फेकून न देता जपून ठेवण्याची, वापरण्याची इच्छा झाली पाहिजे. असे  उपयोगमूल्य माहितीपत्रकाला केव्हा प्राप्त होईल; तर जेव्हा माहितीपत्रकात वाचकाच्या (ग्राहकाच्या)  जिव्हाळ्याची माहिती दिली जाते तेव्हा. ‘माझ्या दैनंदिन जीवनातील समस्या, अडचणी, प्रश्न यांच्या सोडवणुकीसाठी हे माहितीपत्रक मला उपयोगी पडेल’ असे ग्राहकाला वाटायला लावणारे माहितीपत्रक  उपयुक्तच असते. माहितीपत्रकातील ‘तुमच्या पालेभाज्यांवर अतिरिक्त कीटकनाशके मारली आहेत  का?’, ‘दुधातली भेसळ ही अशी ओळखा’ अशा वाक्यांकडे वाचकांचे लक्ष गेले, की शहरी व्यक्तींनाही  कृषिप्रदर्शनाविषयीचे माहितीपत्रक उपयोगी वाटू लागते.

(३) वेगळेपण- इतरांच्या माहितीपत्रकांपेक्षा आपले माहितीपत्रक वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण कसे असेल  याचीही काळजी घेतली पाहिजे. हे वेगळेपण माहितीपत्रकाच्या मजकुरात आणि रचनेत आणले पाहिजे.  इतरांपेक्षा वेगळी, नवी, रोचक, उपयोगी माहिती देणे आणि वेगळा लेआऊट, वेगळा आकार, वेगळी  रचना आणि वेगळा दृष्टिकोन ठेवणे याद्वारे माहितीपत्रकात वेगळेपण आणता येते.

(४) आकर्षक मांडणी (लेआऊट)- माहितीपत्रकातील माहितीची मांडणी आकर्षक असली पाहिजे. मांडणी  सरधोपट असू नये. माहितीपत्रक दिसताक्षणी ते ‘वाचावेच’ असे वाटले पाहिजे. त्याचा कागद दर्जेदार  असावा, छपाई रंगीत असावी, पहिले पृष्ठ तर खूपच चित्ताकर्षक असावे. त्याचा आकार योग्य असावा.  त्याचे शीर्षक, बोधवाक्य ठसठशीतपणे दिसणारे असावे. माहितीपत्रकाची मांडणी वेधक करण्यासाठी  गरजेनुसार त्या क्षेत्रातले कुशल कलाकार, चित्रकार, संगणक तज्ज्ञ मदतीला घ्यावेत.

(५) भाषाशैली- ‘माहितीपत्रक’ केवळ पाहिले जात नाही, तर ते ‘वाचले’ही जाते. म्हणूनच ते वाचावेसे  वाटावे यासाठी त्याची भाषा आकर्षक आणि वेधक असली पाहिजे. उदा., ‘आमच्या कृषिपर्यटन केंद्रात’  राहायला आलात तर तुम्ही खूप सुखी व्हाल; इथे तुम्ही इतके रंगून जाल, की तुम्हांला दु:ख करत  बसायला वेळच मिळणार नाही’ एवढी सगळी माहिती ‘आता तणावाला वेळ नाही’ एवढ्या चारच शब्दांत  सांगणे म्हणजेच मनाला भिडणारी शब्दयोजना करणे होय! थोडक्यात, भाषाशैली पाल्हाळीक नको तर  मनाची पकड घेणारी हवी.

माहितीपत्रकासाठी आवश्यक मुद्‌द्यांचा नमुना

समजा, एका कनिष्ठ महाविद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षापासून विज्ञानशाखा नव्याने सुरू करायची आहे. ही  बाब जास्तीत जास्त प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवायची आहे. कारण तसे झाले  तरच विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी त्या कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधतील. तर मग कशी पोहोचवता येईल ही  बाब त्यांच्यापर्यंत...  अर्थातच माहितीपत्रकाच्या माध्यमातून. कोणकोणते मुद्दे असले पाहिजेत या माहितीपत्रकात...

(१) ते कनिष्ठ महाविद्यालय ज्या शैक्षणिक संस्थेमार्फत चालवले जाते त्या संस्थेचे बोधचिन्ह/बोधवाक्य,  संस्थेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची नावे. 
(२) त्या संस्थेचे नाव/पत्ता/स्थापना वर्ष/दूरध्वनी क्र./मोबाईल क्र./ई-मेल/वेबसाईट.
(३) त्या कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव/पत्ता/स्थापना वर्ष/दूरध्वनी क्र./मोबाईल क्र./ ई-मेल/वेबसाईट.
(४) संस्था व कनिष्ठ महाविद्यालयास असलेली शासकीय मान्यता/मंजुरी विषयक संक्षिप्त माहिती.
(५) कनिष्ठ महाविद्यालयाशी संबंधित प्राथमिक माहिती (उदा., शासकीय/खाजगी/अनुदानित/विना  अनुदानित इत्यादी.)
(६) कनिष्ठ महाविद्यालयाची थोडक्यात पार्श्वभूमी.
(७) आवश्यक ती सांख्यिकीय माहिती.
(८) कनिष्ठ महाविद्यालयातील सुविधा. (उदा., स्वच्छतागृहे, प्रयोगशाळा, क्रीडांगण, सभागृह, ग्रंथालय,  अभ्यासिका, वसतिगृह, वाहनतळ, उपाहारगृह इत्यादी.)
(९) कनिष्ठ महाविद्यालयाची इतर वैशिष्ट्ये.
(१०) कनिष्ठ महाविद्यालयात होणारे उपक्रम. (उदा., कमवा व शिका, एन.एस.एस., सहली इत्यादी.)
(११) पूरक फोटो.
(१२) संस्थेच्या इतर शाखांमधील परीक्षांचे निकाल.
(१३) कनिष्ठ महाविद्यालयाच्या भविष्यकालीन योजना.
(१४) विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती इत्यादी.
(१५) कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत जाणाऱ्या रस्त्यांची माहिती/नकाशा.
(१६) प्रवेशप्रक्रियेबद्दलची माहिती, प्रवेश क्षमता, प्रवेशाच्या अटी, आवश्यक ती कागदपत्रे, प्रवेशाबाबतची  पात्रता, प्रवेशाची अंतिम तारीख, प्रवेश अर्जाचा नमुना, फी, सुरुवातीला भरायची रक्कम, संबंधित  कोर्सचा कालावधी, प्रवेशाच्या कामकाजाची वेळ, सुट्ट्या केव्हा असतील, संबंधित अधिकाऱ्याचे  नाव, त्यांचा फोन क्र., प्रवेश निश्चित केव्हा होणार त्याची तारीख (यादी जाहीर करणे.) कनिष्ठ महाविद्यालय सुरू होण्याची तारीख याबद्दलची माहिती.

समारोप

आजच्या काळात आकर्षक आणि नेमकी माहिती पुरवणारे माहितीपत्रक तयार करणे ही व्यावसायिकांची गरज आहे आणि ते वेळेवर उपलब्ध होणे ही ग्राहकांची गरज आहे. त्यामुळे माहितीपत्रक तयार करणे या गोष्टीला व्यावसायिक मूल्य प्राप्त होत आहे.

अनुक्रमणिका  / INDIEX

पाठ कविता स्वाध्याय LINK
01: वेगवशता Click Now
02: रोज मातीत Click Now
03: आयुष्य... आनंदाचा उत्सव Click Now
04: रे थांब जरा आषाढघना Click Now
05: वीरांना सलामी Click Now
* आत्मविश्वासासारखी शक्ती नाही Click Now
06: रंग माझा वेगळा Click Now
07: विंचू चावला Click Now
08: रेशीमबंध Click Now
09: समुद्र कोंडून पडलाय Click Now
10: दंतकथा Click Now
11: आरशातली स्त्री Click Now
12: रंगरेषा व्यंगरेषा Click Now
* जयपूर फूटचे जनक Click Now

भाग - 3

साहित्य प्रकार स्वाध्याय LINK
00: कथा-साहि त्यप्र कार-परिचय Click Now
01: शोध Click Now
02: गढी Click Now

भाग - 4

उपयोजित लेखन स्वाध्याय LINK
01: मुलाखत Click Now
02: माहितीपत्रक Click Now
03: अहवाल  Click Now
04: वृत्तलेख  Click Now

भाग - 5

व्याकरण लेखन स्वाध्याय LINK
0: व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार Click Now
0: निबंध लेखन Click Now

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post