रेशीमबंध संपूर्ण स्वाध्याय कृति | Reshambandh Marathi 12th [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

रेशीमबंध संपूर्ण स्वाध्याय कृति | Reshambandh Marathi 12th

  विद्यार्थी मित्रांनो आज या ब्लॉग पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी रेशीम बंद या पाठाचे सविस्तर वर्णन तसेच या पाठाचे प्रश्न उत्तर देखील घेऊन आलो आहेत या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण प्रथमता बघणार आहोत या रेशीम बंद या संपूर्ण पाठाचे प्रश्न उत्तर आणि त्यानंतर आम्ही तुमच्यासाठी पुस्तकांमधील रेशीम बंद हा धडा टाकलेला आहेत जेणेकरून प्रश्न उत्तरे वाचून झाल्यानंतर तुम्हाला धडा वाचण्या साठी पुस्तकाची गरज पडणार नाही या दृष्टिकोनाने आम्ही हा पाऊल उचलला आहे

निर्मळे अकॅडमी ऑफिशियल वेबसाइट तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न उत्तरं तसेच इयत्ता बारावी साठी लागणारे महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात तुमची मदत करत आहेत तरी तुम्ही आमच्या या निर्मळ अकॅडमी वेबसाईटला भेट जेणेकरून आमची मनोबळ वाढण्यासाठी मदत होईल आणि आम्ही अजून चांगल्या प्रकारे तुमची मदत करण्यासाठी तुमच्यासोबत उभे राहू

रेशीमबंध संपूर्ण स्वाध्याय कृति | Reshambandh Marathi 12th [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

कृती (१)  कृती करा.

कृती (१) | Q 1 | Page 38
1] उत्तररात्रीच्या आगमनाची वैशिष्ट्ये
SOLUTION
 (१) उत्तररात्र हलकेच आकाशात पाऊल ठेवते.
(२) तिची मुलायम पावले हळुवारपणे व अलगद पडतात.
(३) तिच्या पावलांची मंद मंद नाजूक स्पंदने निर्माण होतात.
(४) तिच्या आगमनाची कोणालाही चाहूलसुद्धा लागत नाही.

2) घाणेरीच्या फुलांची वैशिष्ट्ये
SOLUTION
(१) किरमिजी रंग
(२) निळसर रंग
(३) पिवळसर रंग
(४) इवलासा आकार

3) चाफ्याच्या फुलांची वैशिष्ट्ये
SOLUTION
(१) रक्त चंदन रंग
(२) मंद मंद गंध

4) उत्तररात्रीच्या वेळी खिडकीतून बाहेर पाहताना फुलांविषयी लेखकाच्या मनात निर्माण होणारे प्रशन
SOLUTION
(१) आपले या फुलांशी कोणते नाते आहे?
(२) फुलांना भेटण्याची असोशी आपल्याला का वाटत राहते?
(३) हे रेशीमबंध आपल्याला आदिमत्वाकडे ओढून नेतात का?
(४)या आदिम ऋजू स्नेहबंधामुळेच माणसाला निसर्गाची ओढ लागते का?

कृती (२) कारणे शोधा व लिहा.

कृती (२) | Q 1 | Page 38
1) पाखरांचा चिवचिवाट सुरू झालेला नसतो, कारण...
SOLUTION
पाखरांचा चिवचिवाट सुरू झालेला नसतो; कारण नुकते कुठे तीन-साडेतीन वाजलेले असतात.

2) मानवाला निसर्गाची ओढ लागते, कारण...
SOLUTION
मानवाला निसर्गाची ओढ लागते; कारण माणसाच्या मनात आदिमत्वही भरून राहिलेले असते.

3) पहाटेच्या वेळी बागेत प्रवेश केल्यानंतर लेखकाला खालील फुलांसंदर्भात आलेले अनुभव लिहा.
सायली -
SOLUTION
सायलीच्या इवल्या इवल्या पानांतून एक वेगळीच हिरवाई वाहू लागते.

3) पहाटेच्या वेळी बागेत प्रवेश केल्यानंतर लेखकाला खालील फुलांसंदर्भात आलेले अनुभव लिहा.
गुलमोहोर -
SOLUTION
गुलमोहोराजवळ जावं तर त्यानं स्वागतासाठी, केशरी सडाच शिंपून ठेवलेला असतो

4) पहाटेच्या वेळी बागेत प्रवेश केल्यानंतर लेखकाला खालील फुलांसंदर्भात आलेले अनुभव लिहा.
जॅक्रांडा -
SOLUTION
जॅक्रांडाची निळीजांभळी फुलं रक्तचंदनी चाफ्याशी बिलगून गप्पागोष्टी करत असतात.

5) पहाटेच्या वेळी बागेत प्रवेश केल्यानंतर लेखकाला खालील फुलांसंदर्भात आलेले अनुभव लिहा.
चाफा -
SOLUTION
चाफ्यांजवळ जावं तर त्यांच्या फुलांचा एक वेगळाच मंद मंद गंध येत असतो; पण तो निशिगंधासारखा मात्र नसतो.

कृती (३) वर्णन करा.

कृती (३) | Q 2.1 | Page 38
1) उत्तररात्रीचे आगमन
SOLUTION
मध्यरात्र उलटली की उत्तररात्र हलकेच आकाशात पाऊल टाकते. उत्तररात्रीची पावले मुळातच मुलायम, त्यात ती रात्र आपली मुलायम पावले हळुवारपणे, अलगद ठेवीत येते. कुणालाही चाहूल लागणे कठीण. मात्र लेखकांचे उत्तररात्रीशी अत्यंत जवळिकेचे नाते आहे. त्यामुळे तिच्या पावलांची मंद मंद नाजूक स्पंदने लेखकांच्या मनात उमटत राहतात. लेखकांना झोप लागत नाही. आपली झोप जणू पूर्ण झाली आहे, असेच त्यांना वाटत राहते.

2) पहाट व पाखरे यांच्यातील नात
SOLUTION
लेखकांना भोवतालचा निसर्ग माणसासारखाच भावभावनांनी भरलेला भासतो. पहाटेची घटना तशी साधीशीच. पहाट होत आहे. पाखरांचा बारीक बारीक आवाज सुरू झाला आहे. त्यांच्या हालचालींना सुरुवात होत आहे. पहाट हळूहळू पुढे सरकत आहे. या प्रसंगात लेखकांना मानवी भावभावनांचे दर्शन घडते. पाखरांचा बारीक बारीक आवाज म्हणजे त्यांची कुजबुज होय. ती जणू एकमेकांना विचारताहेत, " पहाट आली का? " पहाटेचे हळुवार येणे पाहून लेखकांना वाटते की, पाखरांना त्रास होऊ नये म्हणूनच जणू पहाट हळूच पाखरांना विचारते की, "मी येऊ का?" त्या दोघांमधले हळुवार कोमल नातेच लेखकांना या वाक्यातून व्यक्त करायचे आहे.

कृती (३) खालील घटकांच्या संदर्भात पाठात आलेल्या मानवी क्रिया लिहा.

कृती (३) | Q 3.1 | Page 38
1) वृक्ष-
SOLUTION
वृक्ष - डोळा लागलेला असतो.

2) वेली-
SOLUTION
वेली - डोळा लागलेला असतो.

3) पाखरे-
SOLUTION
पाखरे - गाढ झोपलेली असतात

कृती (४)  व्याकरण.

कृती (४) | Q 1.1 | Page 38

अ) खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

1) मन समेवर येणे-
SOLUTION
अर्थ - मन शांत व एखाद्या गोष्टीशी एकरूप होणे.
वाक्य - राहुल रात्रभर भरकटणारे मन प्रभातफेरीसाठी बाहेर पडल्यावर एकदम समेवर आले.

2) साखरझोपेत असणे-
SOLUTION
अर्थ - पहाटेच्या गाढ स्वप्निल निद्रेत असणे.
वाक्य - पहाटे मोहन साखरझोपेत असताना बाहेर पाऊस पडत होता.

आ) खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.

1) खरं तर पहाटच त्यांना विचारत असते की मी येऊ का तुम्हांला भेटायला
SOLUTION
खरं तर पहाटच त्यांना विचारत असते, की 'मी येऊ का तुम्हांला भेटायला?'

कृती (५) स्वमत.

कृती (५) | Q 1 | Page 39
1) ‘मानवाला निसर्गाची जी ओढ युगानुयुगांपासून लागून राहिली आहे, ती या आदिम, ॠजु, स्नेहबंधांमुळे तर नाही?...’ या विधानासंबंधी तुमचे मत लिहा.
SOLUTION
उत्तररात्रीचे दृश्य खरोखरच विलक्षण असते. सर्वत्र, सर्व काही शांतनिवांत असते. दिवसा इकडेतिकडे सतत धावणारी, कोणती ना कोणती कामे करीत राहणारी, एकमेकांशी बोलणारी, एकमेकांशी भांडणारी, एकमेकांवर प्रेम करणारी ही माणसे निवांत झोपलेली असतात. काहीजण दिवसा चिंतांनी ग्रासलेली असतात. काहीजण मिळालेल्या यशामुळे आनंदाच्या, सुखाच्या शिखरावर असतात. या सर्व भावभावना, सर्व सुखदु:खे उत्तररात्रीच्या क्षणांमध्ये विरून गेलेल्या असतात. दुष्ट विचार, दुष्ट भावना आणि चांगल्या माणसांच्या मनातले चांगले विचार, चांगल्या भावना हे सर्व काही त्या क्षणी दूर निघून गेलेले असते. माणसे भांडतात तेव्हाचे त्यांचे भाव आठवून पाहा. सर्व त्वेष, द्वेष, राग, संताप उफाळून आलेला असतो. तीच माणसे उत्तररात्री या सर्व भावभावनांचे गाठोडे बाजूला ठेवून निवांत झालेली असतात. सज्जन व दुर्जन दोघेही शेजारी शेजारी झोपलेले असतील, तर त्यांच्यातला चांगला कोण व वाईट कोण हे नुसते पाहून ठरवताच येणार नाही. त्या क्षणी सर्वांचे मन निर्मळ, शुद्ध झालेले असते.

सर्व प्राणिमात्रांमध्ये, वनस्पतींमध्ये हाच शुद्ध भाव वसत असतो. आणि हा शुद्ध भाव अनादी काळापासून सर्वांच्या मनात वस्ती करून आहे. माणसाचे मन या मूळ भावनेकडेच धाव घेत असते. आदिम खूप खूप पूर्वीचे. ऋजू म्हणजे साधे, सरळ, निर्मळ, पारदर्शी. त्यात कोणतेही किल्मिष, वाईट भावनेचा लवलेशही नसतो. सगळ्यांच्याच ठायी हा भाव असल्याने सर्वजण एकमेकांशी हसतखेळत बोलू शकतात. एकमेकांच्या मदतीला धावतात. एकमेकांवर प्रेम करतात. त्या शुद्ध, निर्मळ भावनेने एकमेकांशी बांधले जातात. लेखकांना या वाक्यातून हेच सांगायचे आहे.

2) ‘रेशीमबंध’ या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत लिहा.  
SOLUTION
लेखकांचे निसर्गाशी अत्यंत कोमल, हळुवार, नाजूक नाते आहे. त्यांच्या मते, सर्व माणसांचेच तसे नाते असते. या हळुवार, कोमल नात्याचे दर्शन लेखक या पाठात घडवतात. हे नाते रेशमासारखे तलम, मुलायम आहे. म्हणून ते रेशीमबंध.

हे रेशीमबंध लेखकांनी अत्यंत मुलायमपणे, हळुवारपणे उलगडून दाखवले आहेत. नीरव शांततेत उत्तररात्र हळुवारपणे कोमल पावले टाकत येते. कोणाला चाहूलही लागत नाही. पण लेखकांच्या मनात त्या मुलायम पावलांची मंद मंद स्पंदने उमटतात. त्यांचे मन तितक्याच हळुवारपणे ती स्पंदने टिपते. त्यांच्या निसर्गाशी असलेल्या नात्याचा रेशमी मुलायम पण इथे जाणवतो.

साखरझोपेत जग विसावलेले असते. साऱ्या काळज्या-चिंता मिटून गेलेल्या असतात. मन सुखदुःखांच्या पलीकडे गेलेले असते. एक निर्मळ, शुद्ध असे स्वरूप मनाला प्राप्त होते. निसर्गाचा आत्माच त्यात असतो. लेखकांचे नाते या निर्मळपणाशी, त्या आत्म्याशी जडले आहे. त्यांना त्यांच्या नातीच्या शैशवातला नितळपणा जाणवतो. या नितळपणाचा संबंध निसर्गाच्या आत्म्याशी, निर्मळपणाशी आहे. कोणालाही चाहूल लागू न देता पहाट अलगद अवतरते, पण लेखक अत्यंत संवेदनशील असल्याने त्यांना चाहूल लागते. त्या अनोख्या, नाजूक, तरल क्षणाचा लेखकांना अनुभव येतो. बागेतल्या वृक्षवेलींच्या रूपांनी, त्यांचे विविध रंग व सुगंध यांच्या रूपांनी लेखकांना स्वत:चे आदिमतेशी असलेले नाते जाणवते.

या पाठात लेखक निसर्गाशी असलेल्या स्वत:च्या नात्याचा शोध घेत आहेत. स्वतः प्रमाणे सगळीच माणसे निसर्गाशी कोमल, नाजूक, हळुवार भावनांनी बांधली गेली आहेत. ते बंध सहजासहजी दिसत नाहीत; दाखवून देता येत नाहीत. ते सूक्ष्म, तरल, कोमल भावनांचे बंध असतात. ते रेशमाप्रमाणे तलम, मुलायम असतात. म्हणून लेखक या बंधांना रेशीमबंध म्हणतात. संपूर्ण पाठाच्या केंद्रस्थानी हे रेशीमबंधच आहेत. म्हणून या पाठाला रेशीमबंध' हे शीर्षक खूप साजते.

कृती (६) अभिव्यक्ती.

कृती (६) | Q 1 | Page 39
1) निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्परसंबंध तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
SOLUTION
मला कळू लागले तेव्हापासूनचे सर्व आठवते. कधीही फिरायला जाण्याची कल्पना आली, सहलीला जाण्याची वेळ आली की, मला प्रचंड आनंद होतो. खरे सांगायचे तर मला एकट्यालाच असे वाटते, असे नाही. आमच्या वर्गातल्या सर्व मित्रमैत्रिणींना सहलीचा विषय आला की, अमाप आनंद होतो. सहलीला गेलो, निसर्गात गेलो की, खूप आनंद मिळतो. नदीत डुंबायला मिळाले तर कितीही वेळ डुंबत राहावेसे वाटते. तेच रानावनात भटकतानाही वाटत असते. झाडांच्या सोबत वावरताना कंटाळा येतच नाही. हिरव्यागार वृक्षवेलींनी सजलेला डोंगर पाहताना मन सुखावते. हे असे का होत असावे?

वनस्पती या सजीव आहेत; त्यांना माणसांसारख्याच भावभावना असतात. वनस्पतींनाही आनंद होतो, दुःख होते. त्यांच्यावर प्रेमाने हात फिरवला, तर त्याही सुखावतात, हे सर्व आता लहानथोरांपासून सर्वांनाच ठाऊक झाले आहे. प्रत्येक ऋतूशी माणसाचे भावनिक नाते निर्माण झाले आहे. म्हणूनच तर झाडे सुकून जाऊ लागली की माणसाचे मन कळवळते. वृक्ष नष्ट होऊ लागले की माणसाला दुःख होते. वृक्षतोड होताना दिसली की, माणसे खवळतात. शहरात माणसाला स्वत:चे वृक्षप्रेम जपता येत नाही, म्हणून माणसे कुंड्यांमध्ये रोपटी लावतात आणि त्यांचा आनंद घेतात. अमाप वृक्षतोड होऊ लागली, तेव्हा सुंदरलाल बहुगुणा या वृक्षप्रेमीने 'चिपको आंदोलन' उभारले. त्याला देशभर प्रचंड प्रतिसाद मिळाला.

लोकांच्या मनात हे एवढे वृक्षप्रेम दाटून आले, याचे कारणच हे की निसर्ग आणि आपण यांच्यात एक खोलवरचे नाते आहे. ज्या निसर्गाने माणसांना निर्माण केले, त्यानेच प्राण्यांना आणि वनस्पतींना निर्माण केले आहे. आपण सर्व निसर्गाची लेकरे आहोत. आपण, अन्य प्राणी आणि वनस्पती ही सर्व भावंडेच आहेत. आपणा सर्वांमध्ये हे असे रक्ताचेच नाते आहे. निसर्गच आपले पालनपोषण करतो. तोच अन्नपाणी देतो. तोच हवाही देतो. आपल्याला तोच जिवंत ठेवतो. आपल्या जगण्याचा आधारच निसर्ग हा आहे. हेच निसर्ग व मानव यांच्यातले नाते आहे.

2) संत तुकाराम महाराज यांनी वृक्षवल्लींना ‘सोयरी’ असे म्हटले आहे, यामागील तुम्हांला समजलेली कारणे लिहा.
SOLUTION
थोडा वेळ बागेत बसले, रानात फेरफटका मारला की, मनाला खूप आल्हाद मिळतो. शहरात आखीव रेखीव रस्ते आणि तशाच आखीव रेखीव इमारती. इमारतीतल्या प्रत्येक घराचा चेहरा सारखाच. याउलट, रानावनात सौंदर्याची मुक्त उधळण असते. तिथे एक झाड दुसऱ्या झाडासारखे नसते. एक पान दुसऱ्या पानासारखे नसते. एक हिरवा रंग पाहा. त्या एका हिरव्या रंगांच्या शेकडो छटांचे दर्शन तिथे घडते. हजारो आकार, हजारो रंग, हजारो आवाज, हजारो गंध. तिथे पंचेद्रियांच्या सुखाची लयलूट असते. किती विविधता! पक्षी, प्राणी, किडेमुंग्या यांच्या हजारो जाती. त्यांच्यातही रंग, आकार, हालचाली यांचे हजारो प्रकार. निसर्गातली ही विविधता मनाला मोहवते. मन त्या सौंदर्यात बुडून जाते. कृत्रिमतेची चढलेली पुटे हळूहळू गळून पडतात. मन मोकळे होते. सौंदर्याचा, आनंदाचा अनुभव घेऊ लागते.

तुकाराम महाराजांनी विठ्ठलभक्तीसाठी वनाचाच आश्रय घेतला. माणसात असलेल्या सर्व कुभावनांपासून मुक्ती मिळावी; आपला आत्मा त्या कुभावनांपासून मुक्त व्हावा; ईश्वराचे निर्मळ, सोज्वळ रूप दिसावे; त्याच्याशी एकरूप होता यावे; म्हणून त्यांनी वन गाठले. वनात गेले की मन आपसूक मुक्त होते. मनाची ही अवस्था ईश्वराकडे जाण्यासाठी उत्तम अवस्था. वनाचे सौंदर्य म्हणजे ईश्वराचे एक रूपच, त्या रूपाच्या सान्निध्यात राहावे, षड्रिपू चा त्याग करावा म्हणजे आपण अलगद ईश्वराच्या जवळ जाऊन ठेपतो. आपल्याला सर्व सुंदर, निर्मळ, चांगलेच दिसते. या चांगुलपणाचाच आस्वाद घेत राहावा, असे वाटू लागते. म्हणजे ईश्वराच्या दर्शनातच, त्याच्या स्मरणातच आकंठ बुडून जावे अशी अवस्था होऊन जाते. तुकाराम महाराजांना वृक्षवल्ली सोयरी वाटली ती या कारणाने. या वृक्षवल्लींच्या ठायी माणसाचे दुर्गुण नसतात. ती ईश्वराची रूपे होत. त्यांच्या सहवासातच ईश्वरभक्ती फुलते. वृक्षवल्ली, सर्व वनश्री आपल्याला ईश्वराच्या वाटेवर आणून सोडतात. तुकाराम महाराज म्हणूनच वृक्षवल्लींच्या सान्निध्यात गेले. वृक्षवल्लींना सोयरी' मानले.

रेशीमबंध संपूर्ण स्वाध्याय कृति | Reshambandh Marathi 12th

      मध्यरात्र केव्हाच उलटून गेलेली असते. उत्तररात्रीनं  हलकेच आकाशात पाऊल ठेवलेलं असतं. इतकं हळूवारपणे, इतकं अलगद, इतकं मुलायम, की कुणाला  चाहूलदेखील लागू नये; पण ही चाहूल मला मात्र सहज लागते. तिच्या पावलांची मंद मंद नाजूक स्पंदनं माझ्या मनात मात्र कुठं तरी उमटत राहतात. जणू त्यामुळंच मग  माझा डोळा लागत नाही. पुरेशी झोप झाली आहे, असं  वाटत राहतं.

   मी हलकेच उठतो. चूळ भरतो. डायनिंग टेबलजवळ येतो. त्याच्याजवळची खिडकी हलकेच उघडतो. रात्रीच्या नीरव शांततेची निद्रा भंग होऊ नये म्हणून. बाहेर पाहतो तो  आसमंतात काळाकुळकुळीत अंधार दाटलेला. बागेतल्या साऱ्या झाडांचा, साऱ्या वेलींचादेखील डोळा लागलेला.  त्यांच्यावरची पाखरंदेखील गाढ झोपलेली. त्यांचा  चिवचिवाट अजून सुरू झालेला नसतो, कारण आता फक्त पहाटेचे तीन-साडेतीन तर वाजलेले असतात. का कुणास ठाऊक, ही वेळ मला फार आवडते. सारं जग साखरझोपेत  असतं. साऱ्या चिंता-काळज्या मिटल्या-विरलेल्या असतात. मन कसं समेवर आलेलं असतं. मला वाटतं,  आपलं खरंखुरं मन हेच असतं, जे सुखदु:खांच्या पलीकडे  कुठंतरी दूर दूर गेलेलं असतं. आपलंच नव्हे तर या दुधाळ सायलीचंदेखील. तांबडसर बोगनवेलीचंदेखील. केशरी  गुलमोहोराचंदेखील. जांभुळसर जॅक्रांडाचंदेखील.  किरमिजी-निळसर-पिवळसर इवलाल्या इंद्रधनुष्यी फुलांच्या घाणेरीचंदेखील. पांढऱ्याशुभ्र नि रक्तचंदनी  चाफ्याचंदेखील.

      या साऱ्यांमध्येनि माझ्यामध्ये असं कोणतं बरं नातं  आहे? कोणते रेशीमबंध आहेत? कोणती जवळीक आहे?  केव्हा पहाट होते नि केव्हा मी या साऱ्यांना भेटतो, अशी  असोशी मनाला का बरं लागून राहते? हे रेशीमबंध कुठं तरी  आदिमत्वाकडे तर मनाला ओढून नेत नाहीत? मानवाला  निसर्गाची जी ओढ युगानुयुगांपासून लागून राहिली आहे,  ती या आदिम, ॠजु, स्नेहबंधांमुळे तर नाही?... 

      मी डायनिंग टेबलजवळ येतो, तेव्हा भान येतं, की  आपण उघडलेल्या खिडकीतल्या काळोखात सायलीचा,  मोगऱ्याचा नि चाफ्याचा सुगंध शोधत होतो. जॅक्रांडाची  निळाई-जांभळाई शोधत होतो. बोगनवेलीची लाली शोधत  होतो नि केशरी गुलमोहोराई शोधत होतो! काळ्या अंधारात  हे सारेच विसावले होते, सुखावले होते. आणि माझं वेडं मन  मात्र त्यांना केव्हा जाग येते, याची आस लावून बसलं होतं.

     असं मला या वृक्षवेलींच्या बाबतीतच वाटत नाही तर  माझ्या लहानग्या नातीबद्दलही वाटतं. तिचं नाव ‘अल्विशा!’ माझ्या मुलीची-अल्मासची-ती लहान  मुलगी. तिचं नाव जसं जगावेगळं आहे तशीच तीही  मुलखावेगळी आहे. अजून वर्षभराचीदेखील झाली असेल- नसेल. अल्मास आमच्याकडे राहायला आली, की  अल्विशाही तिच्याबरोबर येते; पण दिवसभर असते ती  माझ्याच अंगाखांद्यावर. मला बिलगून बिलगून. ती रात्री आईजवळ गाढ झोपते, तेव्हा शैशवातील नितळता किती  मोहक असते ते जाणवतं. मी असा उत्तररात्री डायनिंग  टेबलवर लिहायला बसलो तरी तिची आठवण होते.  अल्विशा उठली की नाही, ते हळूच डोकावून पाहतो. ती  केव्हा उठेल नि खुदकन् हसत आपल्याकडे पाहून आपल्या अंगावर झेपावेल, असं वाटत राहतं; पण ही झाडं नि या  वेली जशा या वेळी निवांत झोपलेल्या असतात, तशीच  अल्विशादेखील गाढ झोपलेली असते. ही उत्तररात्रीची  नीरवता नि अल्विशाच्या गाढ झोपेतील निरागस शांतता  यात किती कमालीचं, आश्चर्यकारक साम्य आहे, नाही?  हे नातंदेखील आदिम नातंच नाही का? -निसर्गातलं नि मानवातलं? शेवटी ते दोघेही एकाच विश्वाचे दोन घटक  आहेत, हा विचार हे नाजूक नातं पाकळीपाकळीनं उलगडू  लागतो

       सर्वांत आधी जाग येते ती आमच्या बागेतल्या पाखरांना. मी पहिला चहा करून घेऊन त्याचे घोट घेत घेत 
‘काय लिहावं?’ याचा विचार करत काहीसा संभ्रमात  असतो, त्या वेळी ही इवली इवली पाखरं गुलमोहोराच्या घरट्यांतून, जॅक्रांडाच्या फांद्यांवरून हळूहळू डोळे  किलकिले करून पाहतात. पहाटेच्या प्रकाशकिरणांना  खुणावतात. आपापसात हलकेच कुजबुजू लागतात. ‘पहाट  झालीय काय?’ असं विचारू लागतात. खरं तर पहाटच  त्यांना विचारत असते, की ‘मी येऊ का तुम्हांला भेटायला?’  पहाटेचं नि या इवल्या इवल्या पाखरांचंदेखील असंच  काहीसं जवळकीचं नातं आहे. त्यांनी पंख फडफडल्याशिवाय  पहाटदेखील आकाशात येत नाही. त्यांच्या पंखांची फडफड  ऐकली, की पहाटेलादेखील राहावत नाही. मग ती  आकाशात हलकेच पाऊल टाकते. इतकं हळुवार, की  तुम्हांला त्याची गंधवार्तादेखील लागू नये! पहाट कशी  होते, हे देखील पाहण्याजोगं आहे. पाहण्याजोगंच नाही तर  अनुभवण्याजोगं आहे. मला तर तो नेहमीच एक अनोखा,  लोभसवाणा, नाजूक, तरल अनुभव वाटला आहे. तुम्ही केव्हा तरी असेच उठून बघा म्हणजे तुम्हांलाही त्यातला  आल्हाद जाणवेल. त्यातली तरलता जाणवेल. त्यातली  नजाकत जाणवेल.

     हा आल्हाद व्यक्त करण्यासाठीच जणू आमच्या बागेतील जॅक्रांडावरची नि गुलमोहोरावरची पाखरं  आपापसात कुजबुजू लागतात. त्यांचा चिवचिवाट  पहिल्यांदा किती मंद मंद असतो; पण जसजशी पहाट  उजाडते, तसतसा तो वाढत वाढत जातो. एखाद्या उत्सवासारखा. जणू त्या आल्हादाला, हर्षोल्हासाला एक  mअनावर भरती येते आणि हा चिवचिवाट ऐकूनच सायली  जागी होते. बोगनवेल सळसळू लागते. दोन्ही चाफे  mएकमेकांशी हितगुज करू लागतात. रंगीबेरंगी क्रोटन्सना फुलं कुठं येतात? पण त्यांच्या पानांचीच मग फुलं होतात!  नि ती हलू-डोलू लागतात. गुलमोहोराची सळसळ ऐकल्यावर जॅक्रांडाही पहाटवाऱ्यासंगे हसू-बोलू लागतो.  पहाट झाल्याचा आनंद जणू या साऱ्यांच्याच मनांतून  भरभरून ओसंडू लागतो.

    दार उघडून मी हलकेच बागेत येतो. पहाटेच्या किरणांनी मोगरा न्हाऊन निघालेला असतो. सायलीच्या इवल्या इवल्या पानांतून एक वेगळीच हिरवाई वाहू लागते.  गुलमोहोराजवळ जावं तर त्यानं स्वागतासाठी, केशरी  सडाच शिंपून ठेवलेला असतो. जॅक्रांडाची निळीजांभळी  फुलं रक्तचंदनी चाफ्याशी बिलगून गप्पागोष्टी करत  असतात.

     चाफ्यांजवळ जावं तर त्यांच्या फुलांचा एक वेगळाच  मंद मंद गंध येत असतो; पण तो निशिगंधासारखा मात्र  नसतो. निशिगंध म्हणजे निशिगंधच! त्याची सर इतर  कुणाला येणार? पण निशिगंधाच्या पलीकडे मोगऱ्याची  बहरलेली फुलं पाहिली, की त्यांच्या सुगंधाचा मोहदेखील  आवरत नाही. या वेगवेगळ्या सुगंधांचं नि माझं काही  आदिम नातं तर नाही? त्यांची इतकी अनिवार ओढ माझ्या मनाला का बरं लागून राहते?

      प्रकाश पसरू लागतो, तशी सकाळ होऊ लागते  आणि मग दिसतं, की वाफे तर कोरडेच आहेत. बागेतल्या नळाला रबरी पाईप लावून मी वाफ्यांमध्ये पाणी घालू  लागतो. कुंड्यांमध्ये पाईप लावू लागतो. चाफ्यांच्या, गुलमोहोराच्या, जॅक्रांडाच्या, सायलीच्या नि बोगनवेलीच्या गोल गोल आळ्यांना पाणी देऊ लागतो. पाण्याच्या थेंबांचा  स्पर्श झाल्यावर पानं कशी तरारतात, हे अनोखं दृश्य खरोखरीच अनुभवण्याजोगं असतं. आदल्या दिवशी  मोगऱ्याला पाणी घालायचं चुकून राहून गेलं तर तो कसा  रुसून बसतो, कोमेजू लागतो नि पाण्याचा शिडकावा झाला,  की दुसऱ्या दिवशी पहाटेच गोंडस कळ्यांच्या रूपानं  आपल्याकडे पाहून खुदूखुदू हसू लागतो! 

अबोला सोडून तो  सुगंधाची पखरण करू लागतो नि मग जाणवू लागतं, की  इवली इवली झाडं नि वेलीदेखील किती भावुक असतात!  कधीमधी थोडीफार रुसलीफुगली तरी आपण त्यांची  थोडीशी वास्तपुस्त केली, मायेनं त्यांच्यावरून हात फिरवला, त्यांचा तहानलेला जीव शांत केला, की ती  देखील ही गोंडस फुलं देऊन आपल्याला केवढा विरंगुळा,  केवढा तजेला देऊन जातात! आणि मग तुकोबांच्या त्या अभंगाचा खराखुरा अर्थ उकलू लागतो. त्यांनी वृक्ष आणि वल्ली यांना आपली  सोयरीधायरी का बरं म्हटलं असावं, यातलं इंगित उमलू  लागतं. त्यांच्यातलं नि आपल्यातलं हे नातं, हे रेशीमबंध  आजकालचे नसावेत तर ते आदिम असावेत, युगायुगांचे  असावेत, याची जाणीव उत्कटतेनं होऊ लागते. असं नसतं तर आपल्याला त्यांची नि त्यांना  आपली एवढी अनिवार ओढ का बरं लागली असती?

अनुक्रमणिका  / INDIEX

पाठ कविता स्वाध्याय LINK
01: वेगवशता Click Now
02: रोज मातीत Click Now
03: आयुष्य... आनंदाचा उत्सव Click Now
04: रे थांब जरा आषाढघना Click Now
05: वीरांना सलामी Click Now
* आत्मविश्वासासारखी शक्ती नाही Click Now
06: रंग माझा वेगळा Click Now
07: विंचू चावला Click Now
08: रेशीमबंध Click Now
09: समुद्र कोंडून पडलाय Click Now
10: दंतकथा Click Now
11: आरशातली स्त्री Click Now
12: रंगरेषा व्यंगरेषा Click Now
* जयपूर फूटचे जनक Click Now

भाग - 3

साहित्य प्रकार स्वाध्याय LINK
00: कथा-साहि त्यप्र कार-परिचय Click Now
01: शोध Click Now
02: गढी Click Now

भाग - 4

उपयोजित लेखन स्वाध्याय LINK
01: मुलाखत Click Now
02: माहितीपत्रक Click Now
03: अहवाल  Click Now
04: वृत्तलेख  Click Now

भाग - 5

व्याकरण लेखन स्वाध्याय LINK
0: व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार Click Now
0: निबंध लेखन Click Now

रेशीमबंध संपूर्ण स्वाध्याय कृति | Reshambandh Marathi 12th [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

 आपण ही ब्लॉग पोस्ट पूर्ण वाचली याबद्दल आपले मनापासून आभार   व्यक्त करतो आपल्याला रेशीम बंध संपूर्ण स्वाध्याय कृती कशी वाटली हे आम्हाला तुम्ही ब्लॉग पोस्ट च्या शेवटी कमेंट या शिक्षण मध्ये जाऊन कमेंट करून आम्हाला कळवू शकता जेणेकरून आमच्याकडून कळत नकळत काही चूक झाली असेल किंवा आपल्याला कोणत्याही प्रकारच्या प्रश्नाचे उत्तर चांगली किंवा वाईट वाटले असेल याची प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता आणि रेशिंबंध या सारखे इतर पाठाचे प्रश्न उत्तर तुम्हाला लागत असेल तर वरती आम्ही अनुक्रमानिका मध्ये सर्व पाठाचे प्रश्न उत्तर टाकली आहे ती तुम्ही एकदा बघून घ्या जेणेकरून इयत्ता बारावी मराठी विषयाचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला मदत होईल

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post