वेगवशता मराठी स्वाध्याय | Veshavanti Marathi Svaadhyaay | वेगवशता स्वाध्याय इयत्ता 12वी

वेगवशता मराठी स्वाध्याय | Veshavanti Marathi Svaadhyaay

 विद्यार्थी मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी  इयत्ता बारावी मधील वेगवशता मराठी याचा स्वाध्याय तुमच्यासाठी घेऊन आलो आहे यामध्ये आम्ही सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला अगदी सोप्या आणि साध्या शब्दांत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहेत तरी तुम्ही या प्रश्न उत्तरांचा लाभ घ्या आणि आपल्या बारावीच्या वर्षासाठी चांगल्या प्रकारे अभ्यास करुन चांगले मार्क्स मिळवा.

 खाली आम्ही सर्व प्रश्नांची उत्तरे पुस्तकाच्या स्वाध्याययानुसार क्रमानेटाकली आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर लवकरात लवकर शोधेल चला तर पाहूया वेगवशता मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तर .

वेगवशता मराठी स्वाध्याय | Veshavanti Marathi Svaadhyaay |

(१)(आ) पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा - वेगवशता मराठी स्वाध्याय

1) जीवन विभागणारे घटक- ____________

SOLUTION
जीवन विभागणारे घटक – स्थिती , गती

2) विचारांची गती म्हणजे- ____________
SOLUTION
विचारांची गती म्हणजे - प्रगती

3)अधोगती म्हणजे - ____________
SOLUTION
अधोगती म्हणजे - दिशाहीनगती

4) अक्षम्य आवेग म्हणजे - ____________
SOLUTION
अक्षम्य आवेग म्हणजे – विकृती

कृती करा. - वेगवशता मराठी स्वाध्याय
कृती करा.
1) गतीबाबतची लेखकाने वर्णिलेली विकृती म्हणजे
SOLUTION
 (१) अप्रमाण गती
(२) अवास्तव गती
(३) अनावश्यक गती

2) लेखकाच्यामते, जीवनअर्थपूर्णतेव्हाहोते, जेव्हा
SOLUTION
 (१)कामापुरते व कामासाठी वाहन वापरले जाते.
(२) वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला.

3) लेखकाने सांगितलेली वाहन खरेदी करण्याची कारणे
SOLUTION
(१)  मानसिक स्पर्धा करणे.
(२) स्वत:च्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवणे.

4) वाहनाचा वेग अनिवार झाला तर
SOLUTION
(१) शरीर-मनावर ताण येतात.
(२) चित्ताची व्यग्रता वाढते.
(३) शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात.
(४) हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात

कारणे शोधा व लिहा.
1) अमेरिकेतील माणसांचे जीवन वेगवान असते, कारण ___________
SOLUTION
अमेरिकेतील माणसांचे जीवन वेगवान असते; कारण वेगवेगळ्या ठिकाणांमधील अंतर खूपच असते आणि दरडोई वाहन उपलब्ध असते

2) लेखकांच्या मते, गरजेच्या वेळी वाहनांचा वापर करायला हवा; कारण ___________
SOLUTION
लेखकांच्या मते, गरजेच्या वेळी वाहनांचा वापर करायला हवा; कारण रस्त्यावर अडचणी निर्माण होणार नाहीत.

कृती (२) योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा.

1) जीवन अर्थ पूर्ण होईल, जर ____________
OPTIONS
  1. वाहन कामापुरतेच वापरले तर.
  2. वाहन आवश्यक कामासाठी वापरले तर
  3. वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला तर.
  4. वाहन कामापुरतेच वापरले तर, वाहन आवश्यक कामासाठी वापरले तर, वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला तर या तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर.
SOLUTION
जीवन अर्थ पूर्ण होईल, जर वाहन कामापुरतेच वापरले तर, वाहन आवश्यक कामासाठी वापरले तर आणि वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला तर या तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर.

2) निसर्गविरोधी वर्तन नसणे, म्हणजे' _______________.
OPTIONS
  1. स्वत:ला वाहनाशी सतत जखडून ठेवणे.
  2. वाहनाचा अती वेग अंगीकारणे.
  3. तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणे.
  4. गरज नसताना वाहन वापरणे.
SOLUTION
निसर्गविरोधी वर्तन नसणे, म्हणजे' तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणे.

कृती (२) वाहन वापरातील फरक स्पष्ट करा.

SOLUTION

अमेरिका

भारत

घरोघर, दरडोई वाहन उपलब्ध असते.

 अंतरे कमी आहेत.

रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न व एकमार्गी

 माणसे खूप आहेत.

कामांची वेगवेगळी ठिकाणे किमान शंभर मैल अंतरावर असतात.

 कामे फारशी नसतात.

दूरदूरची ठिकाणे गाठण्यासाठी वेगाचा आश्रय घ्यावा लागतो.

 महानगरे रेल्वेने जोडलेली आहेत.



कृती (३) खालील वाक्यांचा अर्थ सोदाहरण स्पष्ट करा.
1) यथाप्रमाण गती ही गरज आहे; पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे.
SOLUTION
योग्य त्या प्रमाणात, आवश्यक त्या प्रमाणात वाहन वापरण ही माणसाची गरज आहे. योग्य त्या प्रमाणात वाहन न वापरणे, अव्यवहार्य रितीने वापरणे आणि गरज नसताना वापरणे हे अनैसर्गिक आहे.

2) आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात. मग वाहने माणसांवर स्वार होतात.
SOLUTION
सुरुवातीला लोक गाडी जपून चालवतात. थोड्या काळासाठीच जपून चालवतात. मात्र हळूहळू त्यांना गाडीची चटक लागते. मग ते गरज असतानाच नव्हे, तर केवळ मौजमजा करण्यासाठीसुद्धा गाडीचा वापर करतात. हळूहळू त्यांना गाडीशिवाय कुठे जाताही येत नाही. पूर्णपणे ते गाडीवरच अवलंबून राहतात. हे सिगारेटच्या व्यसनासारखेच आहे. सुरुवातीला फक्त एकदाच, मग फक्त एकच. असे करता करता दिवसाला एक पाकीट कधी होते हे कळतच नाही. नंतर नंतर सिगारेट मिळाली नाही तर त्या व्यक्तीचे मन:स्वास्थ्यच नाहीसे होते. सिगारेटशिवाय ती राहू शकत नाही. ती व्यक्ती सिगारेटचा गुलाम होऊन जाते. तद्वतच माणसेही गाड्यांचे गुलाम होतात. त्यांच्या वापराबाबत माणसांना कोणतेही तारतम्य राहत नाही.

3) उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नय
SOLUTION
वाहन हे सोयीसाठी असते. ते साधन आहे. आपला वेळ व आपले श्रम वाहनामुळे वाचतात, आपली कामे भराभर होतात. वाहनाचे हे स्थान ओळखले पाहिजे. यापलीकडे
आपल्या भावना गुंतवू नयेत. वाऱ्यासोबत त्याच्या वेगाने धावू लागलो तर काही क्षण आनंद मिळतो. उत्साह, उल्हास शरीरात सळसळतो. म्हणजे आपल्या भावना उचंबळून येतात. या भावनांवर आपण आरूढ झालो, तर आपला वाहनावर ताबा राहत नाही आणि अपघातांची शक्यता निर्माण होते.

कृती (४) समानार्थी शब्द लिहा
1) निकड-  _________
SOLUTION
निकड = गरज

2) उचित-  _________
SOLUTION
उचित = योग्य

3) उसंत -  _________
SOLUTION
उसंत = सवड

4)व्यग्र -  _________
SOLUTION
व्यग्र = गर्क

कृती (४) खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा.

1) ताणतणाव -

SOLUTION

सामासिकशब्द

विग्रह

समास

ताणतणाव

= ताण, तणाव वगैरे

→ समाहार द्वंद्व

2) दरडोई -

SOLUTION
सामासिकशब्द

विग्रह

समास

दरडोई

= प्रत्येक डोईला (माणसाला)

→ अव्ययीभाव

3) यथाप्रमाण -

SOLUTION

सामासिकशब्द

विग्रह

समास

यथाप्रमाण

= प्रमाणाप्रमाणे

→ अव्ययीभाव

4) जीवनशैली -

SOLUTION
सामासिकशब्द

विग्रह

समास

जीवनशैली

= जीवनाची शैली

→ विभक्ती तत्पुरुष



कृती (४)  कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.

1) आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. (उद्गारार्थी करा.)
SOLUTION
किती विलक्षण वेगवानता आढळते आजच्या जीवनात!

2) आपल्याकडे कामाच्या ठिकाणाची अंतरे कमी आहेत. (नकारार्थी करा.)
SOLUTION
आपल्याकडे कामाच्या ठिकाणांची अंतरे जास्त नाहीत.

3) निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत? (विधानार्थी करा.)
SOLUTION
माणसांनी निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी जायला हरकत नाही.

कृती (५) स्वमत - वेगवशता
1) ‘वाहनांच्या अतिवापराने शरीर व्यापारात अडथळे निर्माण होतात’, तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
SOLUTION
अलीकडच्या काळात जीवन विलक्षण गतिमान झाले आहे. एकाच माणसाला अनेक कामे पार पाडावी लागतात. तीसुद्धा कमी अवधीत. कामांशी संबंधित ठिकाणी अनेक माणसांना अनेक ठिकाणी गाठावे लागते. मोठमोठी अंतरे कापावी लागतात. चालत जाऊन ही कामे करता येणे शक्य नसते. साहजिकच वाहनांचा उपयोग अपरिहार्य ठरतो. फक्त एका-दोघांना किंवा फक्त काहीजणांनाच वाहन वापरावे लागते असे नाही. सामान्य माणसांनाही वाहन वापरणे गरजेचे होऊन बसले आहे. सतत वाहन वापरण्याचे दुष्परिणाम खूप होतात, आपण चालत चालत जाऊन कामे करतो, तेव्हा शरीराच्या सर्व प्रकारच्या हालचाली होतात. इकडे-तिकडे वळणे, खाली वाकणे, वर पाहणे, मागे पाहणे, हात वर-खाली करणे, पाय दुमडून बसणे. पाय लांब करून बसणे, उकिडवे बसणे अशा कितीतरी लहान लहान कृतींतून शारीरिक हालचाली घडत असतात. या हालचालींमुळे शरीराच्या सगळ्याच स्नायूंना आणि सांध्यांना भरपूर व्यायाम मिळतो. शरीर लवचीक बनते. आपण या हालचाली सहजगत्या, एका लयीत करू शकतो. एक सुंदर, नैसर्गिक लय शरीराला लाभते. मात्र, सतत वाहनांचा उपयोग करावा लागल्यामुळे हालचालींना आपण मुकतो. शरीराला लवचिकता प्राप्त होत नाही. शरीराच्या अनेक व्याधींना सुरुवात होते. दुःखे, कटकटी भोगाव्या लागतात. पैसा, वेळ खर्च होतो. दैनंदिन जीवन विस्कळीत होते. जगण्यातला आनंद नाहीसा होतो. म्हणजे आपल्या शरीर व्यापारात अनेक अडथळे निर्माण होतात.

2) ‘वाढता वेग म्हणजे ताण’, याविषयी तुमचे मत सविस्तर लिहा.
SOLUTION
माणसे वाहनात बसली की ते दृश्य पाहण्यासारखे असते. सर्वजण उल्हसित मनःस्थितीत असतात. सगळ्यांच्या बोलण्याच्या कोलाहलामुळे वातावरणात आनंद भरून जातो. वाहनचालकाला हळूहळू सुरसुरी येते. तो हळूहळू वेग वाढवू लागतो. सर्वजण उत्तेजित होतात. गाडीचा वेग वाढतच जातो. मागे पडत जाणाऱ्या वाहनांकडे सगळेजण विजयी मुद्रेने पाहू लागतात. चालक हळूहळू बेभान होतो. अन्य गाडीवाले सामान्य आहेत, कमकुवत आहेत, आपण सम्राट आहोत, अशी भावना मनातून उसळी घेऊ लागते. अशा मन:स्थितीत माणूस विवेक गमावतो. गाडी सुरक्षितपणे चालवण्यासाठी ही मन:स्थिती अनुकूल नसते. गाडी सुरक्षितपणे चालवण्यासाठी चित्त एकवटून वाहनावर केंद्रित करावे लागते. हात आणि पाय यांच्या हालचाली अचूक जुळवून घेण्यासाठी सतत मनाची तयारी ठेवावी लागते. क्लच, ब्रेक, अॅक्सलरेटर, यांच्याकडे बारीक लक्ष ठेवावे लागते. त्याच वेळी पाठीमागून व बाजूने येणारी वाहने आणि आपण यांच्यात सुरक्षित अंतर ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करावा लागतो. अन्य एखादे वाहन मध्येच आडवे येईल का, आपल्या वाहनाला धडकेल का, आपल्याला जिथे वळायचे आहे तिथे वळता येईल का, त्या वेळी बाकीच्या वाहनांची स्थिती कशी असेल, त्यांच्यापैकी कोणीही स्वत:ची दिशा बदलण्याचा संभव आहे का इत्यादी अनेक बाबींचा विचार काही क्षणांत करावा लागतो. त्या अनुषंगाने सतत विचार करीत राहावे लागते. वाहन आणि वाहनाची गती यांखेरीज अन्य कोणतेही विचार मनात आणता येत नाहीत. एकाच विचाराला जखडले गेल्यामुळे डोळ्यांवर, शरीरावर व मनावर विलक्षण ताण येतो. अपघाताची भीती मनात सावलीसारखी वावरत असते. तासन्तास तणावाखाली राहावे लागल्याने मनावर विपरीत परिणाम होतात. वाहनाचा वेग जास्त असल्यामुळे अगदी बारीकशा खड्ड्यानेसुद्धा वाहनाला हादरे बसतात. सांधे दुखतात. ते कमकुवत होतात. अशा प्रकारे वाढता वेग म्हणजे ताण, हे समीकरण तयार होते.

3) ‘वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते. ते वेळ घालवण्यासाठी नसते’, हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
SOLUTION
खरे तर प्राचीन काळापासून वाहन निर्माण करणे, हे माणसाचे स्वप्न होते. त्याच्या मनात खोलवर रुजलेले हे स्वप्न प्राचीन कथांमधून, देवदेवतांच्या कथांमधून सतत व्यक्त होत राहिले आहे. माणसाच्या मनातल्या या प्रबळ प्रेरणेतूनच वाहनाची निर्मिती झाली आहे. वेळ आणि श्रम वाचवणे हाच वाहनाच्या निर्मितीमागील हेतू आहे.

अलीकडच्या काळात जीवनाचा वेग प्रचंड वाढला आहे. वेळ थोडा असतो. कामे भरपूर असतात. कामाची ठिकाणेसुद्धा दूर दूर असतात. अनेक ठिकाणी जावे लागते. अनेक माणसांना भेटावे लागते. म्हणूनच वाहनांची निर्मिती झाली आहे. वाहनांमुळे माणसाची प्रचंड प्रगती झाली आहे. त्यामुळे वाहनाला माणसाच्या जीवनात फार मोठे स्थान मिळालेले आहे. अशी ही अत्यंत महत्त्वाची वस्तू आपल्याकडे असावी, असे सगळ्यांना वाटू लागते.
माणसे धडपडून वाहने प्राप्त करतात. प्रतिष्ठा मिळवतात. पण वेळ व श्रम वाचवणे हा उद्देश मात्र त्यांच्या मनातून केव्हाच दूर होतो. वाहन हे साधन आहे. ते आपला वेळ वाचवते यात शंकाच नाही. परंतु काहीही केले तरी किमान वेळ हा लागतोच. शून्य वेळामध्ये आपण कुठेही पोहोचू शकत नाही. वाहन ही अखेरीस एक वस्तू आहे. वस्तूला तिच्या मर्यादा असतात. हे लक्षात न घेता आपण जास्तीत जास्त वेग वाढवून कमीत कमी वेळात पोहोचण्याचा हव्यास बाळगतो. अतिवेगामुळे आपलेच नुकसान होते. अनेक शारीरिक व्याधी आपल्याला जडतात. शारीरिक क्षमता उणावते. जगण्यातला आनंद कमी होतो. हे सर्व आपण सतत लक्षात ठेवले पाहिजे.

पण हे कोणीही लक्षात घेत नाही. केवळ हौसेसाठी, गंमत-जंमत करण्यासाठी, आपल्याकडे गाडी आहे, ऐश्वर्य आहे हे दाखवण्यासाठी लोक गाडीचा उपयोग करतात. हळूहळू गाडीचे गुलाम बनतात. गाडी हे एक साधन आहे, हे आपण सतत लक्षात ठेवले पाहिजे.

4) वाहनाची अतिगती ही विकृती आहे’, स्पष्ट करा.
SOLUTION
वाहनाची अतिगती ही विकृती आहे, हे विधान शंभर टक्के सत्य आहे. हे विधान मला पूर्णपणे मान्य आहे. विकृती म्हणजे जे सहज नाही, नैसर्गिक नाही ते.

कल्पना करा. आपल्याला चॉकलेट खप आवडते. सर्व जगात असे किती जण आहेत, जे सकाळी, दुपारी, संध्याकाळी व रात्री आवडते म्हणून फक्त चॉकलेटच खातात? समजा एखादयाला पांढरा रंग खूप आवडतो, म्हणून तो घरातल्या सर्व माणसांना फक्त पांढऱ्या रंगाचेच कपडे घेतो. घराला पांढरा रंग देतो. अंथरुणे-पांघरुणे पांढरी, खिडक्यांचे पडदे पांढरे, भांडीकुंडी, फर्निचर पांढऱ्या रंगाचे. हे असे करणारा जगामध्ये एक तरी माणूस असेल का? सर्वजण पायांनी चालतात. उलटे होऊन हातांवर तोल सावरत प्रयत्नपूर्वक चालता येऊ शकते. पण अशा तऱ्हेने नियमितपणे जाणारा एक तरी माणूस सापडेल का?

जे सहज आहे, नैसर्गिक आहे तेच साधारणपणे माणूस करतो. तीच खरे तर प्रकृती असते. याच्या विरुद्ध वागणे म्हणजे विकृती होय. रोजच्या जेवणात वरण-भात आणि भाजी-पोळी असणे, घरात विविध रंगसंगती योजणे, पायांनी चालणे हे सर्व सहज, नैसर्गिक आहे. सर्व माणसे तसेच वागतात. हाच न्याय वाहनांनासुद्धा लागू पडतो. मर्यादित वेगाने वाहन चालवत, अपघाताची शक्यता निर्माण होऊ न देता, सुरक्षितपणे, वेळेत पोहोचणे हा वाहनाने प्रवास करण्याचा हेतू असतो. हा हेतू आपण अतिवेगाचा हव्यास बाळगला नाही तरच यशस्वी होतो. म्हणून अतिवेग ही विकृती होय, हेच खरे.

कृती (६) अभिव्यक्त - वेगवशता
1) रस्त्यावरील वाहतूक कोंडीत सापडल्यावर तुमची भूमिका काय असेल ते लिहा.
SOLUTION
सध्या वाहनांची प्रचंड गर्दी झाली आहे. रस्ते मात्र पूर्वीएवढेच आहेत. रस्त्यांची संख्या पूर्वीइतकीच आणि त्यांची लांबी-रुंदीसुद्धा पूर्वीइतकीच. गाड्यांची संख्या मात्र प्रचंड वाढली आहे. कमी वेळात पोहोचण्याच्या इच्छेने वाहन खरेदी केले जाते खरे; पण वाहतूक कोंडीतच तासन्तास वाया जातात. या परिस्थितीमुळे मनाचा संताप होतो. वाहन आपल्या मालकीचे असते. पण रस्ता आपल्या मालकीचा नसतो. मग वाहतूक कोंडीच्या ठिकाणी प्रचंड गदारोळ माजतो. प्रत्येकजण स्वत:ची गाडी वाटेल तशी पुढे दामटत राहतो. सर्व गाड्या एकमेकांच्या वाटा अडवून उभ्या राहतात. कोणीही पुढे जाऊ शकत नाही की मागे परतू शकत नाही. गाड्यांचे हॉर्न कर्कश आवाजात मोठमोठ्याने कोकलत असतात. काही जणांची भांडणे सुरू होतात. पोलीस हतबल होतात.
अशा प्रसंगात मी सापडलो तर? सर्वप्रथम हे लक्षात घेईन की परिस्थिती माझ्या नियंत्रणात नाही. मी पूर्णपणे शांत राहीन. मनाची चिडचिड होऊ देणार नाही. अस्वस्थ होणार नाही. हॉर्न तर मुळीच वाजवणार नाही. मध्ये मध्ये घुसून पुढे जाण्याचा प्रयत्न करणार नाही. तसे करणाऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीन. कारण अशा पद्धतीने कोणीही पुढे जाऊ शकत नाही. उलट अडचणींमध्ये भर पडण्याची शक्यता जास्त. आपण स्वत: पुढे होऊन रहदारीचे नियंत्रण करू लागलो तर लोक आपले ऐकणार नाहीत. पण आणखी एका दोघांशी बोलून दोघे-तिघे जण तिथल्या पोलीस काकांना भेटू. आमची मदत करण्याची इच्छा बोलून दाखवू. त्यांच्याशी चर्चा करून काय काय करायचे ते ठरवून घेऊ. कामांची आपापसांत वाटणी करून घेऊ आणि पोलीस काकांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण सुरू करू.

2) वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी, ते तुमच्या शब्दांत लिहा.
SOLUTION
गाडी चालवताना काळजी घेतली आणि वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले तर प्रवास सुखाचा, सुरक्षित आणि कमीत कमी वेळेत पूर्ण होतो.
गाडी चालवायला बसण्यापूर्वीची पूर्वतयारी :
(१) प्रत्येक वेळी गाडी चालवायला बसण्यापूर्वी वाहन चालवण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), अन्य आवश्यक कागदपत्रे (विमा, पीयुसी इत्यादी) घेतल्याची खात्री करून घ्यावी.
(२) टायरमधील हवा आणि गाडीतील इंधन पुरेपूर असल्याची खात्री करावी.
(३) गाडीतील प्रवाशांना वाहतुकीच्या सामान्य नियमांची कल्पना द्यावी. आणीबाणीच्या प्रसंगी काय करावे त्याची माहिती द्यावी.
प्रत्यक्ष गाडी चालवताना घ्यायची काळजी :
(१) गाडीवर पूर्ण लक्ष ठेवावे.
(२) गाडीतील प्रवाशांच्या गप्पांत सामील होऊ नये.
(३) गाडीचा वेग पन्नास-साठ किलोमीटरच्या पलीकडे जाऊ देऊ नये; कारण आपल्याकडील रस्ते अजूनही साठ किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने जाण्यास योग्य बनवलेले नाहीत.
(४) जास्त वेगामुळे सतत हादरे बसतात आणि सर्वांनाच त्रास होतो.
शारीरिक व्याधी जडतात. म्हणून जास्त वेगाचा मोह टाळावा.
(५) गाडीतील प्रवाशांना गप्पा मारण्यास बंदी घालता येत नाही.
तरीही गप्पांच्या ओघात अचानक मोठ्याने ओरडणे किंवा हास्यस्फोटक विनोद करणे या गोष्टी टाळण्याच्या सूचना द्याव्यात.
(६) स्वत:ची लेन सोडून जाऊ नये.
(७) लेन बदलताना, वळण घेताना, रस्ता बदलताना खूप आधीपासून तयारी करावी. योग्य ते सिग्नल दयावेत.
(८) वाटेत जागोजागी लावलेल्या वाहतुकीच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.
(९) गाडीत धूम्रपान, मद्यपान करू नये. गाडी चालकाने तर मुळीच करू नये.
अशा प्रकारे काळजी घेतल्यास आपला प्रवास सुखाचा होतो.

वेगवशता मराठी स्वाध्याय | Veshavanti Marathi Svaadhyaay

वेग हे गतीचे एक रूप आहे. आपले जीवनही स्थिती  आणि गती यांत विभागलेले आहे. थांबणे, चालणे, धावणे  असे हे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही  गती असते, िजला आपण प्रगती म्हणतो. ती विचारांची  गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या  संज्ञेला पात्र ठरते. दिशाविहीन गती ही अधोगती ठरते.  आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात. माणसे घरांत राहतात म्हणूनच  अल्पकाळ तरी स्थिर राहतात. एरवी गतीपायी अगतिक  होतात. अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली  म्हणजे आश्चर्य वाटते. ही आली कोठून? आली कशी  आणि कशासाठी? पूर्वी देशोदेशींचा इतिहास घडला.  लोकांनी जगप्रवासही केला; पण आजच्या एवढी अवखळ वाहने कोठे दिसत नसत. आता माणूस घरातून दारात आला, की वाहनावर  आरूढ होतो. वेळ थोडा असतो. कामे बरीच असतात.  पायी चालत ती उरकता येत नाहीत. जीवन हे दशदिशांना  विभागलेले आहे. मुलांची शाळा एका टोकाला, आपले  कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला तर दवाखाना

दूर, कुठल्या तरी दिशेला. जीवनाची ही टोके सांधणार  कशी? जोडणार कशी? शेवटी गती ही घ्यावीच लागते.  यथाप्रमाण गती ही गरज आहे; पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. आपली कामे  यथासांग पार पाडावीत, एवढा वेग जीवनाला असावा.  त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा  लागेल. तो आत्मघातकी ठरतो. अमेरिकेसारख्या विकसित  देशात माणसे वेगाने जीवन जगतात. घरोघर आणि दरडोई  वाहन उपलब्ध असते. रस्तेरुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी असतात. घरे, कार्यालये, बाजारपेठा यांत निदान  शंभर मैलांचे किमान अंतर असते. जवळच्या जवळ सगळे  असे सहसा नसते. 

अंतरावरच्या गोष्टींशी जवळीक  साधण्यासाठी दूरवर जावे लागते. यातून माणसामाणसांत  दुरावा निर्माण होतो. तो जाचदायक आणि असह्य होऊ नये  म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. वेगामुळे माणसे बेभान  होतात. भान हरपले म्हणजे अस्वस्थता विरून जाते. वेगात  एक बेहोषी असते. भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचे कारण  नाही. आपल्याकडे अंतरे कमी आहेत. माणसे खूप आहेत.  कामे फारशी नाहीत. जीवनाची टोके सहज सांधता येतात.  थोडी त्वरा करावी लागते; पण भरधाव वेगाने अंतर काटावे  अशी स्थिती नसते. मुंबईसारखे विस्तीर्ण नगर गाड्यांनी  सांधलेले असते. गाड्या रूळावरून चालतात. त्यात  भरकटणे फारसे नसते. गाडीत चढले म्हणजे माणसांचे  धावणे थांबते.

खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या- जाणाऱ्या दोन आणि चारचाकी वाहनांची. त्यांचा वेग  मर्यादित ठेवला तर ती साधने म्हणून उपयोगी पडतात. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो; पण  अनेकदा असे घडते, की वाचलेला वेळ घालवावा कसा हे  कळेनासे होते आणि मग तो घालवण्यासाठी पुन्हा माणसे  वाहनांच्या आहारी जातात. आरंभी माणसे वाहनांवर स्वार  होतात. मग वाहने माणसांवर स्वार होतात. कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात  राहील एवढाच वेग, हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला  यावे, ते कृतार्थतेने जगता, अनुभवता यावे, त्यासाठी उसंत  लाभावी म्हणून वाहनांचा वापर करायला हवा. प्रत्यक्षात  घडते ते वेगळे. 

इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी,  आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी, गरज नसताना  कर्ज काढून वाहने खरेदी करणारी माणसे समाजात  आढळतात. कोणतेही महत्त्वाचे काम नसताना पत्नीला  मागच्या बाजूला बसवून आधुनिक दुचाकीने सहज फेरफटका मारून आले म्हणजे अनेकांना बरे वाटते; पण  आहेच वाहन तर चार-सहा मैलांवरचे एखादे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहाण्यासाठी ही माणसे का जात नाहीत?  एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली  महाराज रस्ताच का पसंत केला जातो? देहू, आळंदी,  सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडीकडचे रस्ते का दिसत  नाहीत? वाई, सातारा, फलटण, कराड अशा गावी वाहनांची  एवढी निकड आहे का? शेतमळ्यात जायचे असेल, तर  तातडीचा भाग म्हणून कधी तरी वाहन लागेल. आपले  राहणे गावाबाहेर होत असेल, तर वाहनाचा उपयोग होईल;  

पण सहज आणि सुखाने येणे-जाणे सोडून वेगाने येरझारा  कशासाठी घालावयाच्या? आहेच गाडी तर मारूया  चक्कर, अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण  करणारे रसिक संख्येने वाढत चालले आहेत. वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते. ते वेळ घालवण्यासाठी नसते. त्याचा वेग बेताचा असणे अगत्याचे  असते. माणसे चालू आणि पळूही शकतात; पण रस्त्याने  कोणी चालण्याऐवजी पळू लागला तर त्याचे कौतुक करावे  का? अपेक्षित स्थळी वेळेवर पोहोचता येईल, अशा बेताने  वाहने चालवण्याऐवजी उगाचच भरधाव वेगाने चालवण्यात  औचित्य ते कोणते? वाहनाचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावरचा ताबा  कमी होतो. पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अनेक अपघात होतात. रात्रीच्या वेळी  विलक्षण वेगाने धावणारी गाडी ही रातराणी म्हटली जाते.  रात्री भरघाव वेगाने प्रवास करून पार पाडावीत एवढी  महत्त्वाची कामे दरवेळी असतात का? वाहनाचा वेग अनिवार झाला, तर चित्ताची व्यग्रता  वाढते. 

डोळ्यांवर, मनावर, शरीरावर ताण पडतो. शरीरभर  अनावश्यक स्पंदने निर्माण होतात. हादरे बसून मज्जातंतू  आणि मणके कमकुवत होतात. कमरेची आणि पाठीची  दुखणी ही वाहनधारकांची व्यथा असते. बसणे, उठणे, चढणे, उतरणे, चालणे, वळणे, वर-खाली पाहणे या मुक्त हालचालींचे संगीत विसरून स्वत:ला वाहनाशी जखडून  ठेवणे आणि वाहनाचा वेग अंगीकारून आपल्या शरीरव्यापारात अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्गविरोधी  आहे. आरोग्याची हानी करणारे आहे. वाढता वेग म्हणजे  (जागर, खंड २) ताण. जीवनातले ताणतणाव वाढवून पोहोचणार तरी कोठे?  आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक  वेग कमी करणे, हे आपले कर्तव्य आहे. उगाच भावविवश  होऊन वेगवश होऊ नये. अनाठायी वेगामुळे पोचण्यापूर्वीच  अंत होण्याची शक्यता वाढते.

अनुक्रमणिका  / INDIEX

पाठ कविता स्वाध्याय LINK
01: वेगवशता Click Now
02: रोज मातीत Click Now
03: आयुष्य... आनंदाचा उत्सव Click Now
04: रे थांब जरा आषाढघना Click Now
05: वीरांना सलामी Click Now
* आत्मविश्वासासारखी शक्ती नाही Click Now
06: रंग माझा वेगळा Click Now
07: विंचू चावला Click Now
08: रेशीमबंध Click Now
09: समुद्र कोंडून पडलाय Click Now
10: दंतकथा Click Now
11: आरशातली स्त्री Click Now
12: रंगरेषा व्यंगरेषा Click Now
* जयपूर फूटचे जनक Click Now

भाग - 3

साहित्य प्रकार स्वाध्याय LINK
00: कथा-साहि त्यप्र कार-परिचय Click Now
01: शोध Click Now
02: गढी Click Now

भाग - 4

उपयोजित लेखन स्वाध्याय LINK
01: मुलाखत Click Now
02: माहितीपत्रक Click Now
03: अहवाल  Click Now
04: वृत्तलेख  Click Now

भाग - 5

व्याकरण लेखन स्वाध्याय LINK
0: व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार Click Now
0: निबंध लेखन Click Now

4 Comments

Thanks for Comment

Previous Post Next Post